Thursday, September 25, 2014

व्यक्तिवादी दृष्टिकोन जिंकला, राज्य हरलं, रयत हरली!

 
राज्याचं व्यापक हित पाहण्याची सुवर्णसंधी सर्व पक्षांनी गमावली. कोण्या एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता नक्कीच कमी झाली आहे. निवडणुकीनंतर १४५ चा आकडा गाठण्यासाठी कोणत्या पातळीवर तडजोडी केल्या जातील ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही!

दिल्लीत गेले काही महिने राज्यसरकार अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सुद्धा त्याच वाटेवर जाणार की काय? राज्याच्या व्यापक हिताची जबाबदारी घेण्यासाठी हे सारे पक्ष जबाबदार नाहीत का?
शिवसेना - आदित्य ठाकरेसारख्या नवतरुणाला भाजपासारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षासोबत वाटाघाटीला पाठून शिवसेनेने काय साधलं? आदित्यची एक नेता म्हणून प्रतिमा उंचावणं हे त्यांना अधिक महत्वाचं वाटलं काय? आता मराठी माणसाच्या भावनांना साद घालून मतदान करण्याचं आव्हान बहुदा केलं जाईल. 

भाजप - काही दिवसापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल अगदी डोळ्याआड करणं चुकीचं आहे! गोपीनाथ मुंडेजीच्या प्रगल्भपणाची उणीव नक्कीच त्यांना जाणवली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने पूर्ण महाराष्ट्र काबीज केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मिळविलेली पकड ह्या विधानसभा निवडणुकीत घट्ट करण्याची सुवर्णसंधी ह्या दोन्ही पक्षांनी गमावली.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर बहुदा ह्या दोन घटक पक्षातील विश्वास पूर्ण मावळला आहे. आणि त्यामुळे अगदी शरद पवार आणि सोनिया गांधी ह्यांना सुद्धा वाटाघटीत भाग घेण्याची इच्छा झाली नाही.
मनसे - साधारणतः पाच वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने राज ठाकरे ह्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. परंतु सुरुवातीच्या झंझावातानंतर मात्र त्यांची अनुपस्थितीच जाणवत राहिली.

हे पाचही पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याची क्षमता बाळगून असतील सुद्धा, पण इतक्या कमी अवधीत त्यांना ते कितपत साध्य होईल हा प्रश्न आहे. दोन दिवसात मनसे सोडून बाकीचे चारजण जवळपास अडीचशेच्या आसपास उमेदवार शोधणार आणि अर्ज भरणार! एका प्रगल्भ लोकशाही नांदत असलेल्या देशातील प्रगतीपथावरील राज्यातील हे चित्र'नक्कीच उत्साहवर्धक नाही!

मी एक सामान्य माणूस! कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीशी बांधिलकी नसलेला! (हल्ली एका तरी पक्षाला राजकीय विचारसरणी शिल्लक राहिली आहे का हा वादाचा मुद्दा! थोड्याफार प्रमाणात भाजपचा त्याला अपवाद म्हणता येईल). राज्याचं हित पाहणारं सरकार सत्तेवर यावं अशी  माझी आणि माझ्यासारख्या अनेक सामान्य लोकांची इच्छा! त्यापलीकडे राजकारणाशी आणि त्या पक्षांची माझं देणघेणं नाही! केवळ स्थिर सरकार देऊ शकणारा एक खंबीर नेता ज्याच्याकडे ह्या त्या पक्षाला भारतीय जनतेने लोकसभेत निवडून दिलं. आज महाराष्ट्राला प्रकर्षाने उणीव जाणवत आहे ती आपल्या पक्षाच्या निर्णयाचे, कारभाराचे उत्तरदायीत्व स्वतःच्या डोक्यावर घेऊन जनतेपुढे येणाऱ्या एका नेत्याची! दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवबांच्या महाराष्ट्रात एकही नेता तसा डोळ्यासमोर येत नाही. शेवटी काय बुधवारी मतदान आल्यानं लोक मतदान मोठ्या संख्येने करतील. बहुदा उमेदवाराचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून मत देतील. पण शेवटी स्थिर राज्यसरकार येण्याची शक्यता सध्यातरी धुसर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या प्रगतीच्या चित्राने निर्माण झालेला आशावाद सध्यातरी पूर्ण लयाला गेला आहे!

No comments:

Post a Comment