Saturday, May 19, 2012

उम्र का हिसाब

 

सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर न थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण विचार करीत होते. विचार जर दृश्य असते तर? त्या डब्यात विचारांचा झंझावात दिसला असता. आता माणस अश्यावेळी कोणता विचार करीत असतील? तात्कालिक समस्या माणसाच्या विचारांना ग्रासणारा प्राथमिक घटक असेल. मग पाच - दहा मिनटांनी माणसाचे मन असंच मागे जात असावं .
तेव्हाच मला उमराव जान मधील गाण्यातील ह्या ओळी अचानक आठवल्या.
ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है
तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
असेच काही निवांत क्षण मिळतात, आणि आपल्या गतआयुष्याचा हिशोब मांडायला प्रवृत्त करतात .



Monday, May 7, 2012

ग्यान, गलका, शिराळा, कसाब

 
एखा द्या देशाच्या परिस्थितीचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांच्या मनोस्थितीवर होत असतो. आता आपल्या भारताचेच पहा ना! सर्व प्रसिद्धीमाध्यमांच्या मते आपण प्रगतीच्या वाटेवर कूच करीत आहोत. हे वाचून आपला आत्मविश्वास बळावतो. माझेच उदाहरण घ्या. मी स्वतःला ज्ञानी (ग्यानी म्हटले तर अजून प्रभाव पडतो!) समजू लागतो. ब्लोग लिहून जबरदस्तीने लोकांच्या ई मेल वर पाठवतो. चार लोक जमले की फंडे देतो. पण ई-मेल वर ज्ञान देणे आणि प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देणे यात फरक असतो. ई-मेल वरील ज्ञान लोक त्यांची खरोखर इच्छा असेल तर वाचतात अथवा बर्याच वेळा ई-मेलचा नाश करतात. परंतु प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देताना आपण समोरच्या व्यक्तीचा वेळ घेत असतो. इतकेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर अनुकूल हावभाव आणले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते.
हल्लीचा जमाना मात्र बदलला आहे. फुकटात कोणी ऐकून घेत नाही. FM रेडिओवर उद्घोषक ३-४ मिनिटाच्या गाण्यानंतर १० मिनिटे वायफळ गडबड करतो. त्या वेळी आपण दुसरे स्टेशन लावतो. माझी प्रत्यक्षातील ज्ञानवाणी ऐकून घेणारे फार कमी लोक; बायको, मुलगा आणि कार्यालयातील टीम. कार्यालयातील टीम ही माझी ज्ञानवाणी ऐकण्यासाठी बांधील असते. त्या बैठकीच्या वेळी त्यांना मी बंधक बनवितो. तेथील माझ्या प्रवचनास ग्यान हा अधिक उचित शब्द आहे. ग्यान म्हणजे आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी वरच्या पदावरील माणसाने उधळलेली मुक्ताफळे!
घरी मात्र परिस्थिती वेगळी असते. लोकशाही भारताच्या कानाकोपर्यात, सर्व वयोगटात पसरली आहे याचा अनुभव मला येतो. बाबा, पुन्हा पुन्हा तेच काय सांगता, मला माहितेय असे का मुलगा बोलला की मी आवरते घेतो. बायकोकडे तर हजार उपाय. प्रवचन चालू असताना अचानक अरे आज भाजी आणावी लागेल, किंवा बिल भरावे लागेल असे लक्ष विचलित करणाऱ्या घोषणा ती करते. मात्र हल्ली सर्वजण सुज्ञ बनले आहेत. माझ्याकडून काही करून घ्यायचे असले की मात्र माझे प्रवचन ऐकून घेतले जाते.
आता आपण प्रवचन का देतो तर मुलाची जडणघडण (अर्थात formatting ) करण्यासाठी. बायको ही formatting च्या पलीकडे असते ही गोष्ट वेगळी. बायको ही आपले formatting करू शकते हे लक्षात असू द्यावे. ती ज्या नवऱ्यास लवकर कळली त्याचा संसार सुखाचा झाला. असो मुलाच्या जडणघडणीचे मार्ग कालौघात बदलले. पाठीवर धपाटा हा पूर्वीचा राजमान्य आणि सर्वात सोपा मार्ग. ह्याद्वारे मुलाला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. इथे चर्चेला वाव नाही, मी इथला अधिकारी व्यक्ती आहे आणि बरेच काही. काळ बदलला, चर्चा करून, मन वळवून निर्णय घेण्याचे, ज्ञान देण्याचे दिवस आले. परंतु कधी कधी ह्याच्याही पुढे जावून प्रत्यक्ष कृतीतून धडा द्यावा लागतो.
आयुष्यात सदैव काही मनासारखे होणारे नाही. सुखानंतर दुःख हे येणारच सगळ्याला तोंड देता यायला पाहिजे, असे ज्ञान आपण सर्व तासनतास देवू शकतो. परंतु आपण हे ज्ञान स्वयंपाकघरातून सुद्धा देवू शकतो. रविवारी ,सुग्रास जेवणावर ताव मारल्यावर सोमवार, मंगळवार मुलावर गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्यांचा मारा करावा. त्यात मीठ, मसाला कमी टाकावा. जर आपला मुलगा ह्या भाज्या खाऊ शकला तर तो जीवनात कोठेही समाधानाने राहू शकेल. आता बघा मुलाला ह्या भाज्यांच्या महत्त्वाविषयी ग्यान देण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा, त्यातून एक पुढे आयुष्यात कामास येणारा महत्वाचा उपदेश मुलास मिळतो. वरिष्ठ पदावरील व्यक्ती न बोलता सुद्धा कृतीतून आपली वाट लावू शकतो. गलका, शिराळ्याच्या भाजीतून असा काही उपदेश देता येऊ शकतो हे ज्यावेळी मला जाणवले त्यावेळी मी एकदम धन्य झालो. बाकी ह्या भाज्या घेवून ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेल्यास एकच गलका होतो ही गोष्ट वेगळी!
कसाबला भारत देशाचे सर्व नागरिक पोसतात. मला खूप संताप येतो. असाच एकदा मी संतापलो होतो पण मग एक विचार डोक्यात आला. मृत्यूचे भय तर दहशतवाद्यांना नसणारच, पण तुरुंगात खिचपत पडण्याचा विचार त्यांना झेपत असेल का? मानसिक स्थिती झपाट्याने बिघडू शकते. आपले अधिकारी मुद्दाम तर त्याला जिवंत ठेवत नसावेत ना? असो.. तुरुंगात कसाबला गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्या देवून त्याचे फोटो पेपरात छापले तर?


 

Friday, April 20, 2012

Level1, Level2...

 


गेल्या महिन्याभरातील या काही घटना! म्हणायला गेलं तर असंबंधित पण अचानक त्यात काहीतरी समान सूत्र असल्याची जाणीव झाली.
  1. महाबळेश्वरला जाताना वाईपर्यंतचा सपाट भूभागावरील प्रवास आणि मग माथ्यावर घेवून जाणारा चढणीचा, वळणावळणाचा रस्ता.
  2. कंपनीने एका शैक्षणिक सत्राला पाठविले. विषय होता नेतृत्वमार्गातील विविध टप्पे आणि त्यातील वळणे
  3. गेल्या आठवड्यात काहीश्या चिंतीत स्वरात पत्नी म्हणाली, हल्ली सोहम कसा बदललाय, शाळेतून आल्याआल्या न सांगता अभ्यासाला बसला आणि रात्री शेवटी त्याला सांगावे लागले की बस झाले आता, राहिला असेल तर उद्या पूर्ण कर. सोहमचा अल्लडपणा संपण्याची प्रक्रिया सुरु झाली की काय हे तिच्या चिंतेचे मुख्य कारण होते.
अजून थोडा मागे गेलो. सोहमला संगणकीय खेळांनी झपाटून टाकले होते. Level1, Level2 ची संकल्पना त्याला भारी आवडली, संगणकावरून जबरदस्तीने उठवल्यावर गडी खेळण्यातील गाड्या घेवून शर्यतीचा रस्ता बनवे आणि मग त्यात अडथळ्याचे प्रमाण वाढवीत नेत त्याचे level1 , level2 चे पुराण पुन्हा चालू होई.
आयुष्याचा प्रवासही काहीसा असाच. कधी सपाट भूप्रदेशावरील प्रवासासारखा, एका दिशेतील, न चढणीचा, एका वेगाचा, तर कधी शिखरमाथ्यावर घेवून जाणार्या चढणीच्या रस्त्याप्रमाणे वळणावळणाचा! ह्या प्रवासात येतात ते मैलाचे दगड. शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, अभियांत्रिकी शाखेची निवड, नोकरीसाठी योग्य अशा क्षेत्राची निवड, व्यावसायिक जीवनातील विविध टप्पे, जीवनसाथीची निवड ही काही महत्वाच्या टप्प्यांची उदाहरणे. आता ह्या प्रत्येक milestone बरोबर आपली जीवनातील भूमिका आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या बदलत जातात. Level बदलते.
आता त्या शैक्षणिक सत्रातील महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तिथे नेतृत्वामार्गातील विविध स्थितींची ओळख करून देण्यात आली होती. एका स्थितीतून दुसर्या स्थितीत होणारे संक्रमण हे एक वळण घेवून येत. ह्या वळणानंतर जबाबदार्यांची क्लिष्टता वाढते, त्यांचे स्वरूप बदलते. आता मुख्य आव्हान हे असते की, ह्या बदललेल्या जबाबदार्या नक्की काय हे बर्याच वेळा लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार ह्या जबाबदार्या आणि त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा पुर्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपल्यात भिनलेल्या आधीच्या भूमिकेच्या मनोवृत्तीला झटकून टाकायचा प्रयत्न करतो. काही जण यशस्वी होतात तर काही जणांना हे जमत नाही. जितक्या उंच जावून तुम्ही कोसळाल तितक्या गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतात.
यातला एक मुद्दा माझ्या मनाला भिडला. आपल्यात भिनलेली आधीच्या भूमिकेतील मनोवृत्ती! हा मुद्दा किती योग्य आहे. ह्या मनोवृत्तीचा आवश्यक नसलेला भाग तुम्ही किती लवकर आणि केवढ्या प्रमाणात झटकून टाकू शकता ह्यावर तुमचे पुढील भूमिकेतील यश अवलंबून असते. आपल्या मुलाला तुम्ही शिशुवर्गात असताना जसं शिकविता त्या पद्धतीत आणि तो तिसरीत गेल्यावर शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. विशीमध्ये असताना न पटलेल्या गोष्टीविषयीची तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि तीशीमधील पद्धत आपसूक बदलते, कारण level बदलली असते. आपल्या पूर्वजांनी किती सोप्या पद्धतीने चार आश्रमांची व्याख्या ठरवल्या होत्या. एका प्रकारच्या level च होय. आज मात्र आपण किती level ठरवायच्या आणि त्यातल्या किती आणि कधी पार करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, April 14, 2012

अवती भोवती


मध्यंतरी १४- १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या दोन बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. एक आत्महत्येविषयी आणि दुसरी या वयोगटातील मुलांनी अपहरण करून हत्या केलेल्या एका मुलाविषयी. संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणाऱ्या ह्या बातम्या. त्या हल्ली आपणास अस्वस्थ करीत नाहीत त्याची कारणे वेगळी. माणूस / समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे आपल्याभोवती सुरक्षित कुंपणे घालून घेतो. ह्या कुंपणांची सीमा आर्थिक प्रगतीच्या प्रमाणाशी समप्रमाणात धावते. स्वतःच्या सदनिकेत अतिसुंदर सजावट करण्यापासून सुरुवात करून, स्वतःचा बंगला, बाग, कुंपण त्यानंतर अशा देखण्या बंगल्याचे संकुल असे टप्पे गाठत ही वृत्ती कधी कधी एखाद्या देशाच्या मनोवृत्तीत उतरते. जगात काहीही होवो पण माझ्या सुरक्षित कुंपणात जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत मला देणेघेणे नाही अशी ही वृत्ती. आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या ओलांडणारे आपण कधी ह्या मनोवृत्तीचे बळी बनतो हे आपणास कळत नाही.

विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे आता वळतो. १४ - १५ वर्षांची मुले म्हणजे वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर अर्धा-अधिक प्रवास केलेली मनुषावस्था! वैचारिक परिपक्वता किती गाठली आहे हे मुलाच्या मुळच्या क्षमतेवर आणि त्याचावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्या अपत्याच्या मनात असणार सर्वात प्रभावी विचार ओळखण्याची इच्छा आणि क्षमता किती पालकांमध्ये असते हा महत्त्वाचा मुद्दा. समजा इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील तर हा जो विचार आपल्या अपत्याच्या मनात घोळत आहे तो योग्य आहे का आणि नसल्यास त्याला योग्य वळण देण्याची जाणीव पालकांनी दाखवली पाहिजे. आता ही इच्छा असण्यानसण्याची कारणे पालकांचे स्वतःचे बालपण कसे गेले, पालकांना त्यांच्या जीवनसंघर्षाने कितपत व्यापून टाकले आहे आणि पालकांचे परस्परांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असू शकतात. क्षमतेमध्ये मुख्य मुद्दा येतो तो पालकांनी गाठलेल्या प्रगल्भतेचा! काही व्यक्तींमध्ये आपण आता पालक बनलो; आता आपल्या वागण्यात थोडाफार बदल करायला हवा हे समजण्याची प्रगल्भता कधीच येत नाही. ह्या वरील कारणांमुळे पालक आणि अपत्य ह्यांच्यातील संवाद कधी प्रगतावस्था गाठतच नाही. बदलेल्या काळामुळे एक गोष्ट झाली आहे. जर तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला नाही तर ती केव्हाच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. हाच अनुभव कार्यालयात येतो, व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्यातील नाते हे सुद्धा बदलत्या काळानुसार मित्रत्वाचे झाले तरच यशस्वी होवू शकते. पालक आणि अपत्य हा जर संवाद खुरटला तर मुले बाहेरील व्यक्तीशी आपले मन मोकळे करतात आणि ह्या बाहेरील व्यक्ती मग त्यांची मते प्रभावीत करू शकतात.

इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. पालकत्वाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या पालकांकडे मुलांच्या सुखी भविष्यासाठी दोन पर्याय असतात.

१> मुलांसाठी गडगंज संपत्ती निर्माण करून ठेवणे.

२> मुलाला एक सुजाण नागरिक बनविणे.

मागील मध्यमवर्गीय पिढीने दुसरा मार्ग स्वीकारला. आजच्या काही पालकांमध्ये पहिला मार्ग स्वीकारण्याची इच्छा दिसून येते. ते जसे चुकीचे तसेच केवळ दुसरा मार्ग स्वीकारणे हे पुरेसे नाही याचे भान असणेही महत्वाचे!

आत्महत्या

ह्या प्रकारचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१> प्रसार माध्यमातील एखाद्या बातमीचे / दृश्याचे त्याच्या परिणामाची जाणीव नसल्याने केलेले अंधानुकरण. ह्या मध्ये स्वतःची उपेक्षा झाल्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असू शकतो.

२> जीवनरुपी ग्रंथातील अगाध अनुभवाची जाणीव नसल्याने त्यातील केवळ एक दोन क्लेशदायक पाने समोर आल्याने निराश होवून आत्महत्या. ह्या प्रकारात एकदम सुखवस्तू घरातील मुलेसुद्धा येवू शकतात, ज्यांना जीवनात कधी नकार, अपयश यांचा सामना करावाच लागला नसतो.

खंडणीसाठी अपहरण / हत्या

हा मनुष्यजातीतील निरागसतेचा अंत किती लवकर होवू लागला आहे त्याचे उदाहरण होय. समाजात, मित्रांच्या समूहात प्रतिष्ठा, मान्यता हवी असेल तर कमीत कमी मोबाईल, गाडी असणे आवश्यक आहे असा समज तरुण पिढीने करून घेतला आहे आणि ती काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. योग्य मार्गाने ही तथाकथित प्रतिष्ठेची साधने मिळविण्याची सर्वांची क्षमता नसल्याने अस्वस्थतता निर्माण होवू शकते आणि त्याच्या जोडीला निरागसतेचा अंत आणि पालकांची संवादाचा अभाव असे घटक असल्यास खंडणीसाठी अपहरण/ हत्या अश्या टोकाच्या भूमिका घेतल्या जावू शकतात.

वरील दोन्ही प्रकारात प्रसारमाध्यमांच्या सुजाणतेचा अभाव हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. इंग्रजीतील सध्याचे अग्रगण्य स्थान मिळवलेल्या आणि वैभवशाली इतिहास असलेल्या वृत्तपत्राचे सध्याचे स्वरूप, त्यातील बातम्या ह्या फिल्मी, गुन्हेगारी विश्वाला जास्त लक्ष प्राप्त करून देणाऱ्या अशा आहेत. पूर्वी सुजाण, सुशिक्षित लोकांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनमतावर प्रभाव टाकला. आता काळ बदलला, मते मांडण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, काहींनी तो आपल्या आर्थिक बळावर मिळविला. पण ह्या अयोग्य लोकांनी आपल्याभोवती अशुद्ध विचाराचा कलकलाट केला. प्रसार माध्यमात काम करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे आवश्यक असते हे समजण्यापलीकडे असणाऱ्या किंवा त्याची पर्वा नसणाऱ्या लोकांच्या हातात आज प्रसारमाध्यमे आहेत ही सत्यस्थिती आहे. आजच्या कलियुगात ह्या अशुद्ध विचारांचा प्रतिकार करू शकणारे समर्थ, परिपक्व विचारांचे चक्र आपल्या आणि समाजातील मुलांभोवती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या सुरक्षित कुंपणापलीकडे पडण्याची आपली तयारी हवी.


Sunday, April 1, 2012

क्षण ओळखावा क्षण अनुभवावा

क्षण अनुभवावा

क्षण आणि युग यांचे नाते तसे अतूट! एका क्षणाच्या सुखासाठी युगांची तपस्या लागते आणि एका क्षणाच्या चुकीची सजा युगोंयुगे भोगावी लागू शकते. मर्त्य मानवांच्या भाग्यात युगे पाहण्याचे लिहिले नाही तेव्हा त्यांनी क्षणांचे महात्म्य ओळखणे केव्हाही उचित!

आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण वारंवार येत नाहीत. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण कमी वेळा येतात तो दुर्दैवी परंतु त्याहून दुर्देवी तो ज्याला आयुष्यात आलेले असे अविस्मरणीय क्षण ओळखता / अनुभवता येत नाहीत. असे हे क्षण कोणते? ही प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना. 'दिल ही छोटासा, छोटीसी आशा' अशी परिस्थिती असल्यास, अविस्मरणीय क्षण वेगळे आणि 'ये दिल मांगे मोर' अशी परिस्थिती असल्यास असे क्षण वेगळे.

अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली, तर मे महिन्यातील एकत्र कुटुंबात / मामाकडे घालविलेल्या सुट्ट्या, सकाळी उठून गोळा केलेले आंबे, शाळेतील स्पर्धेत पहिल्यांदा मिळालेले पारितोषक, सायकलवर तोल सांभाळता आलेला पहिला क्षण असे काही क्षण सांगता येतील. महाविद्यालयीन जीवनात ह्या क्षणांची परिसीमा अधिक व्यापक होते. आपल्या व्यावसायिक जीवनावर पकड मिळविणे हे प्राथमिक ध्येय बनते. त्यामुळे ११ -१२ मध्ये भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयात मिळविलेले उत्तम गुण हे अशा क्षणांचा भाग बनू शकतात. अशातच केव्हा एखादी आवडलेली मुलगी ज्यावेळी स्मितहास्य देते किंवा बोलते त्यावेळी तो ही एक महाअविस्मरणीय क्षण बनून जातो. पुढे पहिली नोकरी मिळते, त्यावेळी स्वअस्तित्वाला मिळालेली मान्यता त्या क्षणाला संस्मरणीय बनवितो. पुढे परदेश प्रवास, लग्न, नोकरीत बढती, अपत्याचे आगमन असे क्षण येत राहतात. पण मधल्या काळात जीवनसंघर्ष आपल्या ह्या क्षणांना उत्कटतेने अनुभवण्याच्या क्षमतेला काहीसे कमजोर बनवितो. आपण चिंतातूर जंतू बनून सदैव चिंताग्रस्त होवून राहतो आणि हे क्षण अनुभवण्याचे सुख गमावून बसतो.

कलाकार लोकांचे एक बरे असते. बर्याच वेळा त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागते (आता हा शब्दप्रयोग मी योग्य अर्थाने वापरतो आहे की नाही याची मला खात्री नाही). त्यांच्यासाठी असे क्षण नक्कीच अविस्मरणीय असतात. एखाद्या खेळत देशाचे प्रतिनिधित्व ज्यांना करायला मिळते त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आणि आयुष्यात पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा क्षण अविस्मरणीयच!

ह्याचा एक वेगळा पैलू देखील आहे. बेशिस्तीत वाढलेली गर्भश्रीमंत लोकांची मुले, आयुष्यात लहानपणीच यशाची परमोच्च शिखरे गाठलेले कलाकार, खेळाडू यांची मनःस्थिती काहीशी नाजूक बनते. यातील काही जण ह्या अविस्मरणीय क्षणाच्या, अलौकिक अनुभवांच्या वेगवेगळ्या चवींच्या शोधात नको त्या मार्गाला लागू शकतात.

जर आपण फार पुढचा विचार केला तर आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून बघता आपल्याला हे क्षण नक्कीच आठवतील. त्यावेळी ही खंत वाटायला नको की मी हा क्षण गमावला.

म्हणूनच मी म्हणतो क्षण ओळखावा, क्षण अनुभवावा!

Thursday, March 29, 2012

विचारांची सरमिसळ



आज बर्याच विचारांची एकत्र सरमिसळ इथे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

सुरुवात करतोय ते मृत्यूविषयीच्या काही विचाराविषयी! मृत्यूविषयी प्रत्येकजण आपापल्या परीने विचार लढवीत असतो. मृत्यूनंतर आपले काय होत असावे ह्याविषयी बरेच सिद्धांत आहेत. मला असे वाटते की जो कोणी सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे आत्म्याचे बरेच द्रव्य साठले असावे. नवीन जीव निर्माण होताना तो ह्या द्रव्यातील थोडा भाग काढून त्या जीवात आत्मा म्हणून पाठवून देत असावा. आणि मृत्युनंतर हा आत्मा परत अनंतात विलीन होत असावा. आता वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके आत्माद्रव्य ह्या सर्वशक्तीमानाकडे असेल की नाही, त्याच्याकडे ह्या द्रव्याचे वैविध्य कसे असावे आणि हा सिद्धांत प्राण्यांसाठी लागू होतो की नाही यावर आपणा पामरांनी विचार करू नये. ह्या भूलोकावरील जीवनाची, इथल्या नियमावलीची आपणास बर्यापैकी सवय झाली आहे. आपण नियमानुसार वागले तर आपणास दंड होण्याची शक्यता बरीच कमी. परंतु जर मृत्यूनंतर जर आपण मनाने (आत्म्याने) अस्तित्वात राहिलो आणि त्या अस्तित्वातील नियम आपल्या आकलनापलीकडील असतील तर लागली ना बोंब!

दररोज दिवस संपला की आपण जे काही समाधान मिळाले असेल त्यात आनंद मानून घरी येतो. आठवडा संपला की मागे वळून पाहता थोडे समाधानी होत, साप्ताहिक सुट्टीच्या पलीकडील दुसर्या आठवड्याकडे नजर लावतो. तीच गोष्ट वार्षिक सुट्टीची. आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर समाधान मोजण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मापदंड असतात. ह्या मापदंडानुसार काहीजण समाधानी होतात तर काही असमाधानी! प्रश्न असा आहे की आयुष्याच्या यशस्वीतेचे वा अयशस्वीतेचे मापदंड कोणी बनवितो का? आता हा मापदंडाला विविध मिती असतील; व्यक्तिगत यश, कौटुंबिक समधानाची पातळी, जोडलेली माणसे, समाजकार्य अशा विविध पातळ्यांवर आपण आपल्या आयुष्याची यशस्विता अजमावू शकतो. प्रश्न असा आहे की असा मापदंड बनविण्याची आणि त्या निकषानुसार हवी ती पातळी गाठल्यावर सामाजिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याची आपली तयारी आहे काय?

तात्कालिक समाधानाची प्रत्येकाची आपली वेगवेगळी संकल्पना असते. लहान बालकाला आईचा सहवास समाधान देवून जातो. हल्लीच्या बर्याच लहान मुलांना (वयोगट ७ - ८ वर्षे आणि अधिक) मैदानी खेळापेक्षा संगणकीय खेळ अधिक समाधान देवू लागले आहेत. विद्यार्थांना परीक्षेतील गुण समाधान देवून जातात. माणूस वयाने कितीही मोठा होत गेला तरीही त्यास आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी सुप्त इच्छा असते. परंतु हे काही सदैव शक्य नसते. मग त्यावेळी आर्थिक लाभाकडे पाहत ही माणसे दिवस लोटतात. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ह्याच्या सुद्धा विविध छटा असू शकतात. काही जणांना आपली दखल घेतली तरी पुरसे असते तर काही जणांना इतरांपेक्षा आपली जास्त दखल घेतली जावी असा अट्टाहास असतो. सार्वजनिक समारंभात अशा व्यक्तींचे वागणे पाहणे हा एक मजेशीर अनुभव असतो. घरातील वयस्क माणसांना अन्य व्यक्तींचे असणे देखील समाधान देवून जाते. हल्ली फेसबुकने आपल्या अस्तित्वाची दुसर्यास जाणीव करून देण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला.

कालच मी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद लुटून मुंबईला परतलो. महाबळेश्वर म्हणा किंवा वसई म्हणा ह्या दोन्ही ठिकाणात रोजच्या जगण्यात जीवन अधिक प्रमाणात अनुभवता येते असे माझे मत आहे. मुंबईत असतो तो जीवनाचा केवळ संघर्ष. जेवढे तुम्ही निसर्गाच्या अधिक सहवासात जाल तितकी त्या सर्वशक्तीमानाशी संवाद साधण्याची शक्यता अधिक प्रबळ होते. आता हा संवाद म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरात जो त्या सर्व शक्तीमानाचा अंश आहे त्याच्याशी त्या सर्व शक्तीमानाने साधलेला संपर्क. आतापर्यंत आज हा काय अध्यात्माच्या मार्गाने चालला की काय असे तुम्हाला वाटू लागले असेल. ह्या मार्गाविषयी मला काही अनुभव नाही परंतु ह्या मार्गावर खरोखर जे पुढे गेले आहेत त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेविषयी मात्र अतीव आदर आहे! बाकी पुढील आठवड्यात एकदा का कार्यालयीन कामकाजात मग्न झालो की मग हे विचार मागे पडतील. कसे मजेशीर आहे पहा ना, माणसाच्या मनात विचारांची अगदी दाटीवाटी झाली असते, त्यातील काहीच मनाचा काही काळापर्यंत ताबा घेवू शकतात आणि त्यातील अगदी थोडेच भाग्यवान बोलण्या / लिखण्याद्वारे दुसर्यांपर्यंत पोहचू शकतात.

बाकी आधी म्हटल्याप्रमाणे ही विचारांची अगदीच सरमिसळ आहे. आपण जर ह्याचा सामना करीत लेखाच्या शेवटपर्यंत पोहचला असाल, तर धन्यवाद!



Wednesday, March 14, 2012

नाती



नाते म्हणजे काय? नाते म्हणजे दोन वस्तूंमधील (त्यातील एकतरी सजीव हवी) परस्पर संबंधांची समजलेली / न समजलेली गुंतागुंत! नाते जसे दोन सजीव व्यक्तींमध्ये असू शकते तसेच ते एक सजीव आणि एका निर्जीव वस्तुमध्ये सुद्धा असू शकते, जसे की काहीजणांचा जुन्या घरांमध्ये अडकलेला जीव. परंतु हे नाते सजीवापुरता मात्र एकमितीय असते. वस्तूची अथवा वास्तूची सजीवाप्रती भावना असते वा नाही आणि असल्यास ती कोणत्या स्वरूपात असते हे समजण्याइतके आपण प्रगत झालो नाहीत. असो आजचा विषय आहे तो दोन सजीवांच्या (मनुष्यरुपी) नात्यांविषयी! नात्यांची रूपे अनेक; पालक - अपत्ये, नवरा बायको, मित्र, सासू - सुना, नणंद- भावजय, शेजारी...काही नाती लौकिकार्थाने रूढ तर काही त्या पलीकडची!

प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात. प्रेमळ, समंजस, अडाणी, व्यावसायिक यशाच्या मागे धावणारा, भावूक, उत्साही, दुर्मुखलेला अशी ही यादी वाढतच जाईल. नात्यातील एका व्यक्तीच्या क्ष छटा असतील आणि दुसर्या व्यक्तीच्या य छटा असतील तर कोणत्याही प्रसंगी ह्या दोन छटांची शक्यता क्ष गुणिले य इतकी असू शकते. म्हणजे एक व्यक्ती उत्साही आणि दुसरी व्यक्ती त्याच वेळी दुःखी असू शकते. नाते काही वेळा फुलते तर कधीतरी एखाद्याची नात्यात घुसमट होते. पूर्वी असे म्हणतात की संसारासाठी स्त्रिया त्याग करायच्या! संसार यशस्वीरीत्या चालविण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. संसाररुपी नात्याच्या त्या owner होत्या. परंतु असे करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या कित्येक छटा बंदिस्त करून ठेवल्या होत्या. काहीजणींनी आपली ही घुसमट आयुष्याच्या उत्तरार्धात व्यक्त केली. पण संसार मात्र यशस्वी पणे चालविले.

आजच्या जमान्यात घुसमट वगैरे कोणी होवू देत नाही. पण त्यामुळे मात्र संघर्षाचे प्रसंग मात्र उदभवू शकतात. लग्नाआधी आपण आईवडिलांच्या छत्राखाली सुखाने वावरत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या केवळ सुखद छटा / पैलू उलगडलेले असतात, आपणास ज्ञात झालेले असतात. लग्नानंतर मात्र आपल्या वागण्याचा थेट परिणाम जिच्यावर होतो अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आधीच आपण आणि साथीदाराने स्वतःला पूर्णपणे ओळखलेले नसते, आणि त्यात आपणास एकमेकांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा अज्ञात असतात. आणि त्यामुळे ह्या क्षय combinations पैकी काही तणावांचे प्रसंग निर्माण करू शकतात. प्रत्येक नात्यात तणावाचे प्रसंग करणारी काही combinations असणारच. एकदम आदर्श असे कोणतेच नाते नसते. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नात्याला एक owner असावा लागतो. काही नात्यांचा owner प्रत्येक तणावाच्या प्रसंगाची जबाबदारी घेतो तर काही नात्यात तणावाच्या प्रसंगाच्या स्वरूपावरून कोणी एक साथीदार owner बनतो. परंतु काही नात्यांचा owner नसतो आणि ती मात्र फुलण्याआधीच मिटतात! तणावाच्या प्रसंगावेळी साथीदारांनी हे लक्षात घ्यायला हवे की दोघांच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या छटा त्यावेळी प्रकट झाल्या आहेत. सहजीवनाच्या काही वर्षानंतर साथीदारांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा बदलत जातात; त्या कधी समांतर रेषेप्रमाणे धावतात, कधी एक रेष बनून जातात तर कधी एका बिंदुतून वेगळ्या दिशेत निघालेल्या दोन रेषांप्रमाणे धावतात, पुन्हा कधी परत न मिळण्यासाठी!


Friday, January 27, 2012

वसईची पिशवी



लहानपणची गोष्ट, मुंबईला राहणाऱ्या आत्या वसईच्या मुक्कामाहून परत मुंबईला जायला निघाल्या की आजी त्यांच्या हातात भाजीची पिशवी देई. वाडीतील भाजी, केळ्याचा फणा, सुरण तत्सम पदार्थांचा त्यात समावेश असे. वसईच्या भाज्या ताज्या, मुंबईला परत गेल्यावर लगेच बाजारात जायला लागू नये म्हणून आजी ह्या भाज्या देत असेल अशी माझी समजूत. काही वर्षाने बहिणींची लग्न झाल्यावर हेच चित्र पुन्हा अवतरले. ह्या ही वेळेला माझ्या समजुतीत फारसा काही फरक झाला नाही.

काही वर्षे गेली, शिक्षण संपले, नोकरी चालू झाली. प्रथमच परदेशगमनाचा योग आल्यावर सामान भरताना मध्येच आईने त्यात लाडूचा एक डबा भरला. हा डबा कशाला, असा थोडासा तिच्याशी वाद घातल्यावर मी तो डबा नेण्याचे कबूल केले. शनिवारी रात्री ब्रायटन (इंग्लंड) येथील हॉटेलात आगमन झाले. व्यवस्थित पोटपूजा होण्याची काही शक्यता नव्हती. रविवारी सकाळी, इंग्लंडच्या थंड हवेत उठून बाहेर एक फेरफटका मारून आल्यावर अचानक ह्या लाडूच्या डब्याची आठवण झाली. तो एक लाडू तोंडात घालताच हजारो मैलांचे अंतर पार करून मी थेट घरापर्यंत पोहोचलो. पुढे हा डबा मी बरेच दिवस पुरविला. त्यानंतरच्या प्रत्येक परदेशवारीला घरून दिलेली ही पिशवी मी नेत गेलो.
बोरिवलीला राहायला गेल्यानंतर वसईच्या फेर्या शनिवार- रविवारकडे होत राहिल्या. मुंबईत वाढलेली बायको, वसईच्या भाज्यांची, माश्यांची रसिक बनली. वसईहून आम्ही आता पिशव्या घेवून येवू लागलो. मेरू, स्विफ्ट मध्ये एकावेळी सर्वाधिक पिशव्या घेवून येण्याचा विक्रमही बहुधा आम्ही प्रस्थापित केला.

ह्या सर्व प्रवासात वसईची पिशवीतील भाजीच्या ताजेपणापेक्षा त्यातील भावनिक गुंतवणुकीचा, मायेचा उलगडा केव्हा आणि कधी झाला हे माझे मलाच कळले नाही. एका पिढीतील माया दुसर्या पिढीपर्यंत भौगोलिक अंतराचे बंध ओलांडून पोहचविण्याचे काम ही वसईची पिशवी अनेक वर्ष करीत राहील याविषयी मात्र माझ्या मनात अजिबात शंका नाही!

Sunday, January 8, 2012

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर




नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्षी माणूस साधारणतः थोडासा भावूक बनतो. आयुष्यातील एक वर्ष निघून गेल्याची जाणीव मनात काहीशी खंत निर्माण करते. स्वतःच्या अक्षय अस्तित्वाच्या कल्पनेला कालरूपी वास्तवाने अजून एक छेद दिला हे नाही म्हटले तरी कोणाला आवडणार?
चाळीशीच्या उंबरठ्यावर एक मोठा प्रश्न मनात डोकावू लागतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे निघून गेली आहेत का? प्रगतीची शिखरे गाठण्याची संधी मी गमावली तर नाही ना?. ह्या प्रश्नाकडे बर्याच प्रकारे पाहता येईल. जो पर्यंत तब्येत धडदाकट आहे, मन चिरतरुण आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनू शकतो. मी तर असे म्हणेन की केवळ अनुभवाने येणारी प्रगल्भता या वेळी आपणाकडे असते. स्वतःला विविध पातळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण सिद्ध केल्याचा आत्मविश्वास तुम्हाकडे असतो. पिकल्या केसांनी (हे ह्या पिढीचे वास्तव) तुम्हाला संयमी बनविले असते. मान्य आहे की कौटुंबिक जबाबदार्या काही प्रमाणात वाढलेल्या असतात पण जर आपल्या जीवनसाथीदाराशी योग्य सामंजस्य निर्माण करण्यात तुम्हाला यश आले असेल तर ह्या जबाबदार्या सुद्धा तुम्ही सहजपणे पेलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता.
आता प्रगतीची शिखरे ह्या शब्दप्रयोगाकडे मी परत वळतो. प्रगतीची शिखरे म्हणजे केवळ व्यावसायिक जगातील यश असा अर्थ मला अभिप्रेत नाही आहे. प्रगतीची शिखरे मोजण्याचा मापदंड हा केवळ लौकिकार्थाने मिळालेले यश असा होत नाही. एखाद्या गृहिणीने संसारावर, मुलांच्या अभ्यासावर मिळविलेले नियंत्रण, एखाद्या कलाकाराने अथक प्रयत्नानंतर कलेवर मिळविलेले प्रभुत्व, एखाद्या छायाचित्रकाराने टिपलेले एक दुर्मिळ चित्र हे ही प्रगतीचे शिखर असू शकते. दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील एक वाक्य कायमचे माझ्या लक्षात राहिले आहे. स्वानंद हे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
मीच माझ्या मनाचा स्वामी. त्यामुळे जर मी मनाला प्रसन्न ठेवू शकलो तर मी प्रगती करणारच. जगाने बनविलेले प्रगतीचे मापदंड माझ्या निकर्षाशी मिळतेजुळते असतील असेही नाही.
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण!
अजूनही अर्धे आयुष्य बाकी आहे! मी वास्तववादी असे जीवनध्येय ठरविणार आणि जीवनाचा आनंद घेत ते साध्यही करणार! आणि दुनियेतील मला निराश करणाऱ्या घटकांपासून मला सांभाळण्यासाठी मनोबल वाढविणार!
Happy 2012!

Saturday, November 26, 2011

निरागसतेचा लोप



भूतलावर जन्माला येणारे प्रत्येक बालक बर्यापैकी निरागस असावे असा माझा समज आहे. ही बालके पूर्णपणे निरागस असावी असा पूर्वी समज होता पण काही कारणास्तव तो थोड्याफार प्रमाणात बदलला. असो, आपल्या आयुष्यातील विविध अनुभवामुळे ह्या बालकांची निरागसता हळूहळू लोप पावू लागते. आणि कालांतराने त्यांचे निगरगट्ट अशा प्रौढात रुपांतर होते.

निरागसतेचा लोप पावण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेगाने होते. युद्धस्थिती, नैसर्गिक / कौटुंबिक आपत्ती, गरिबी ह्या प्रतिकूल घटकांचा ज्यांना बालपणी सामना करावा लागतो, अशा बालकांना वास्तवाचे भीषण चटके फार लवकर बसतात. आणि त्यांची निरागसता लोप पावते. मध्यमवर्गीय बालके बर्याचश्या प्रमाणात आपली निरागसता शालेय जीवनात टिकवून ठेवतात किंवा ठेवायची. आपल्याला हवी ती गोष्ट रडल्याशिवाय मिळत नाही हे ज्यावेळी नवजात शिशूला कळते त्यावेळी त्याच्या १०० % निरागसतेला थोडा तडा जातो. आणि मग जीवनाच्या एका टप्प्यावर आर्थिक कमाई करण्याचे दायित्व ज्यावेळी ह्या मध्यमवर्गीय तरुणावर येऊन पडते आणि आपल्या असलेल्या मर्यादांची त्याला जाणीव होते त्यावेळी हा युवक निरागसता विसरतो. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बालकास ज्यावेळी स्वतःला वारसाहक्काने मिळालेल्या सामर्थ्याची जाणीव होते त्यावेळी त्याची निरागसता मग्रुरीत परिवर्तीत होण्याची शक्यता असते. पालकांचे योग्य संस्कार ह्या गोष्टीस परावृत्त करू शकतात.

आजी आजोबा नातवंडांची निरागसता जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काम करतात पण त्यासाठी त्यांना नातवंडासमवेत वेळ मिळावयास हवा. निरागसतेच्या बाबतीत माझी काही निरीक्षणे आहेत. एकदा का निरागसता गेली की ती त्या जन्मात बहुदा परत मिळविता येत नाही. मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्या मागील विश्वातील स्वतःचा शोध घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नाविषयी लिहिले होते. बहुधा हा शोध आपल्या हरविलेल्या निरागसतेचा असतो आणि त्यामुळेच तो असफल होतो. ह्याला अपवाद काही जणांचा, जे आपली निरागसता आयुष्याच्या संध्याकाळी परत मिळवितात. निरागसतेच्या विरुद्ध धूर्तता. ही का एकदा एखाद्या व्यक्तीत शिरली की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ही कायम वास्तव्य करून राहते आणि त्यामुळे पुढील पिढ्या पुन्हा कधीच पूर्णपणे निरागस होवू शकत नाहीत.

समाजाची निरागसता ही एक पुढील पायरी. सध्या आपण समाजाच्या पातळीवरील निरागसता झपाट्याने गमावत चाललो आहोत. आतापर्यंत सामाजिक निरागसतेचे दायित्व ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलले ती ज्येष्ठ नागरिकांची पिढी तंत्रज्ञानांच्या आलेल्या सुनामीने आपला आत्मविश्वास गमावून बसली आहे.

बर्याच वेळा मला असे वाटत असते की ही पृथ्वी आणि त्यावरील आपली मनुष्यजमात हा एक कोणी तरी मांडलेला खेळ आहे. आपल्या मनातील विचार, आपली धडपड यावर जरी आपणास आपले स्वतःचे नियंत्रण वाटत असले तरी तसे नाहीय. ह्या मनुष्यजातीचा आणि त्या जातीच्या निरागसतेच्या लोपाचा मार्ग आधीच कोणी आखून ठेवला आहे आणि त्या आखलेल्या मार्गावर आपली वाटचाल चालू आहे.


Saturday, November 12, 2011

आपले विश्व



स्वतःला केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येकजण आपले विश्व स्थापन करीत असतो. ह्या विश्वात समाविष्ट असतात आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि जीवनरहाटीच्यानिमित्ताने संपर्कात येणारी लोकं! ह्यातील प्रत्येकाशी आपले लौकिकार्थाने लिखित / अलिखित असे नाते असते. आता ह्या नात्याकडे बघण्याचा दोन्ही बाजूंचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक दिवसागणिक ही नाती बदलत जातात, दररोज बदलणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे!

काळ पुढे सरकतो, माणूस शिक्षणानिम्मित, नोकरी व्यवसायानिम्मित स्थलांतर करतो, नवीन विश्व निर्माण करतो. त्यात गुंगून जातो. आधीचे विश्व काहीश्या प्रमाणात विसरतो. व्यक्तीने आयुष्यभर अनुभवलेली ही अनंत विश्वे त्याच्या मनाच्या कोपर्यात कोठेतरी अडगळीत पडलेली असतात. कधीतरी कोणत्यातरी क्षुल्लक निम्मिताने ह्या अनंत विश्वातील एखादे विश्व उफाळून बाहेर येते. मनाला अस्वस्थ करून सोडते. ह्या विश्वाला आपण परत आणून शकत नाही ही जाणीव आपल्याला बोचत राहते, मग आपण शोधतो त्या विश्वातील आपल्याला, तो तरी आपणास नक्की सापडेल असा आपणास विश्वास असतो. पण हा शोध घेता घेता आपणास जाणवते की त्या विश्वातील स्वतःला आपण हरवून बसलो आहोत!

Tuesday, October 18, 2011

शिस्त, गुणवत्ता, कल आणि क्षेत्र



शीर्षकामध्ये नमूद केलेल्या चार गोष्टी एकमेकांशी तश्या म्हटल्या तर निगडीत आहेत. परंतु त्यामधील परस्पर संबंध म्हणावा तसा सरळ नाही.
अ> गुणवत्ता आणि कल

प्रत्येक व्यक्ती गुणवत्ता आणि कल यांचा बराच भाग जन्मतानाच घेवून येते. परंतु या दोन्ही बाबींचा काही भाग मात्र प्रयत्नपूर्वक जोपासला जावू शकतो.

ब> गुणवत्ता आणि क्षेत्र

प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. एखादी बुद्धिमान व्यक्ती अभ्यासक्षेत्रातील विविध विषयात वेगवेगळ्या प्रमाणात पारंगत असते.

क> गुणवत्ता आणि शिस्त

एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होईल हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून असते. परंतु गुणवत्तेतील कमतरता काही प्रमाणात शिस्तीच्या आधारे भरून काढता येते. ज्या क्षेत्रात बर्याच संधी उपलब्ध असतात त्या क्षेत्रात शिस्तीच्या आधारे बरेचजण टिकून राहू शकतात. शिस्तीच्या जास्तीच आहारी गेल्यास त्या व्यक्तीची उरलीसुरली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचा धोका संभवतो.

शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टाची व्याख्या बनवून आपल्या समजुतीनुसार ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वेळापत्रक बनवून न कंटाळता ते वेळापत्रक पाळणे. ह्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी, की प्रत्येक क्षेत्रातील शिस्तीची व्याख्या काळानुसार बदलत राहते. आणि शिस्तीवर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला शिस्तीची व्याख्या कालबाह्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सारांश
  1. प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. आपला कल लक्षात घेवून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ज्या भाग्यवान लोकांना मिळते त्यांची गुणवत्ता आपसूकच जोपासली जाते आणि असे लोक शिस्तीत राहण्याची शक्यता जास्त असते.
  2. मुद्दा १ च्या व्याख्येत बसणारे भाग्यवान लोक ह्या दुनियेत फार कमी आहेत.
  3. वरच्या समीकरणात पैसा हा दुष्ट घटक समाविष्ट केल्यास वरील लेखाचा बराच भाग निरर्थक ठरतो!


Saturday, October 8, 2011

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.

असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!

Thursday, September 15, 2011

धोनी, इंग्लंडचा दौरा आणि बिकट स्थिती


भारतीय संघाची इंग्लंड दौर्यातली कामगिरी एकदम सुमार झाली. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात त्या सर्व चुकीच्या झाल्या. मिडास स्पर्श लाभलेला धोनी सुद्धा अगदी हतबल झाल्यासारखा वाटला. मालिकेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले की हा भारतीय संघ ह्या दौर्यात तरी इंग्लिश संघाची बरोबरी करू शकणार नाही. परंतु पूर्ण मालिका खेळणे मात्र क्रमप्राप्त होते. सामना संपल्यावर (हरल्यानंतर) पत्रकार परिषदेला शांतपणे तोंड देणे याची तुलना लाल रेषेवाल्या प्रगतीपुस्तकाची आईवडिलांकडून तपासणी किंवा महाकाय चूक केल्यानंतर साहेबाकडून होणारी कानउघाडणी ह्याच्याशी काही प्रमाणात होवू शकते. काही प्रमाणात अशासाठी म्हटले कारण पत्रकार परिषदेतील क्रिकेट खेळाडूंची अवस्था सर्व दुनियेसमोर मांडली जाते.
आता भारतीय खेळाडूंनी जिगर दाखविली असती तर मालिकेचा निकाल वेगळा (म्हणजे थोडा तरी कमी लाजीरवाणा) लागला असता. पण मी त्या विषयाकडे वळत नाहीये. भारतीय संघाची जी अवस्था इंग्लंड दौर्यात झाली ती म्हणजे एखाद्या अशा बिकट स्थितीत सापडणे की ज्यात केवळ थांबणे ह्याच तोडगा असू शकतो. भयंकर वाहतूक कोंडीत सापडणे, चुकीच्या साहेबाशी एखाद्या प्रोजेक्टमध्ये गाठ पडणे, जेवताना ताटात कारल्याची भाजी येणे हे सर्व तात्पुरत्या बिकट परिस्थितीची उदाहरणे आहेत. काही वेळा ही बिकट परिस्थिती दीर्घकालीन असू शकते; गंभीर आजार, सुधारण्यापलीकडे गेलेली जवळची नाती यात वाट पहायची म्हंटली तर आयुष्यभराचा कालावधी घालवावा लागतो. यातील काही उदाहरणात एखादा मोठा निर्णय घेवून त्या परिस्थितीतून बाहेर पडावे लागते. परिस्थिती सुधारण्याचे आटोकाट प्रयत्न करायचे, ह्या प्रयत्नांना प्रमाणांची आणि वेळेची मर्यादा घालून द्यायची आणि ती मर्यादा ओलांडल्यावर मात्र तो कठोर निर्णय घ्यायचा. ह्या प्रकारात प्रत्येकाची बिकट परिस्थितीची व्याख्या करण्याची पद्धत, त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची क्षमता, सहनशीलतेचा परमोच्च बिंदू हे सर्व बदलणारे घटक येतात.
बघूया धोनी काय करतोय ते!


Saturday, August 27, 2011

अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित




अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाबाबत माझी मते मांडण्याचा हा प्रयत्न.

कधीकाळी वाचलेली एक गोष्ट! एका अपराध्याला दगडाने ठेचून मारण्यासाठी एकत्र आलेला जमाव. शिक्षेचा हा अघोरी प्रकार सुरु होणार तितक्यात तिथे एक महात्मा येतो आणि म्हणतो ज्या माणसाने आयुष्यात एकही गुन्हा केला नाही त्यानेच फक्त दगड उचलावेत. आपसूकच सर्वांचे हात मागे येतात. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात हा प्रकार तसा लागू होत नाहीय. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागणारे असे दोन प्रकार मानले तर अण्णांचे आंदोलन हे दुसर्या प्रकारच्या लोकांनी पहिल्या प्रकारच्या लोकांविरुद्ध चालू केलेले. गोष्टीतील महात्म्याचे तत्व लावायचे झाले तर बहुदा आपल्या सर्वांना ह्या आंदोलनात भाग घेण्याचा हक्क नाही.

सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची इच्छा असूनही ही तो असे का करू शकत नाही हे शोधण्याचा इथे मी प्रयत्न करतोय.
  1. आजूबाजूच्या परिस्थितीने भांबावून गेलेल्या मध्यमवर्गीय माणसाची आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि जे आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांची आपले सांपत्तिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यासाठी चाललेली धडपड. ह्या धडपडीमुळे मर्यादित संपत्तीवर पडलेला ताण. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे कोणत्याही मार्गाने आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याची वृत्ती.
  2. जीवनातील मुलभूत गोष्टी जसे की सार्वजनिक वाहतूक, आरोग्यव्यवस्था यांचा अभाव. यामुळे सामान्य माणसाकडे असलेला वेळेचा अभाव.
  3. छुप्या स्वरुपात अस्तित्वात असलेली गुंडगिरी. सर्वांना माहित असलेल्या समांतर व्यवस्थेला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरोध केल्यास जीवाला धोका होवू शकतो ह्याची प्रत्येकाच्या मनात असणारी भीती.
  4. मध्यमवर्गीयातील एकीचा अभाव आणि जोपर्यंत अन्यायाची झळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची वृत्ती.
  5. बौद्धिकदृष्ट्या संपन्न अशा वर्गाची विविध कारणांमुळे शासकीय सेवांपासून झालेली फारकत आणि त्यामुळे शासकीय धोरणांमध्ये कल्पकतेचा अभाव.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गृहस्थाला म्हणायचे आहे तरी काय? जन लोकपाल विधेयक उद्या संसदेत येईल आणि संमत सुद्धा होईल. काही भ्रष्ट जनप्रतिनिधी ह्या विधेयकाच्या अंमलाखाली अटकही होतील. पण त्यांच्या जागी स्वच्छ लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता निर्माण होणार कशी? वरील दिलेले प्रश्न जन लोकपाल विधेयक सोडवणार काय?

केव्हातरी ही सर्व चर्चा आपण लोकशाहीस लायक आहोत का? की पर्यायी शासनव्यवस्थेचा आपण विचार करावा या दिशेने जाईल. माझे तरी म्हणणे असे की अशा एखाद्या लायक माणसाचा शोध घेवून त्याला हुकुमशहा बनवावा! बरेच काही कठोर निर्णय बराच काळ घेतल्याशिवाय परिस्थती सुधारणे शक्य नाही.


Saturday, July 23, 2011

चिकिस्तक


हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला आहे. मुलभूत गरजा पूर्ण झाल्यावर करणार तरी काय म्हणा? चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती प्रमाणात करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. चिकीस्तेचे फायदे / तोटे नानाविध. फायदे म्हणायचे झाले तर आपल्या ज्ञानात भर पडते, एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती होते. ह्या माहितीचा वापर आपण भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी करू शकतो. तोटे कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या सुरुवातीलाच एक पाटी लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या बाबतीत असे म्हणावे लागेल की अज्ञानातच सुख असते. साधे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या आहाराविषयीच्या सवयी. ज्या क्षणी तुम्हाला कॅलरी ह्या प्रकाराची माहिती होते त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा सुखाला तुम्ही मुकण्याचा धोका संभवतो. कोणत्याही नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता करू नये. जीवनातील काही सुंदर गोष्टी दुरूनच सुंदर भासतात त्यांना तसेच राहू द्यावे!

सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू शकते. हे आपल्या पूर्वजांना पक्के ठाऊक होते. आपण ही गोष्ट थोडीतरी ध्यानात ठेवावयास हवी !


Friday, July 22, 2011

शहरनिर्मिती

मुंबई शहरात राहताना बर्याच वेळा जाणवते की ह्या शहराचा संतृप्ततेचा बिंदू केव्हाचा ओलांडला गेला आहे. शहरात एखादी गोष्ट थोडीदेखील साधारणतेच्या व्याखेच्या पलीकडे गेली की गोंधळ चालू होतो. आता ही बाब एकदम क्षुल्लक असू शकते जशी की एका वर्दळीच्या रस्त्यावर मध्येच गाडी बंद पडली, १० मिनिटे पाऊस पडला! लगेच वाहतूक खोळंबते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. मुंबईत राहणाऱ्या / नोकरीनिम्मित शहरात येणाऱ्या प्रत्येकाने अशा परिस्थितीसाठी मनाची तयारी ठेवलेलीच असते. मुंबईतला प्रत्येक नागरिक हा सहनशीलतेचा तसा पुतळा असतो. सहनशीलता म्हटले तर चांगला गुण आणि म्हटले तर परिस्थिती न बदलता येण्याचा कमकुवतपणा!
प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. माणसाच्या इतिहासामध्ये शहरनिर्मितीचा टप्पा बर्याच आधी येवून गेला. भारतामध्ये देखील तो सतराव्या - अठराव्या शतकात आला आणि शहरे उदयास आली असावी. मी या विषयातील अज्ञानी, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी! बाल्यावस्थेतील ही शहरे बरीच काही वर्षे (हा कालावधी दशकात / शतकात मोजावा) सुसंकृतावस्थेत होती. परंतु गेल्या काही दशकात ह्या शहरांच्या वाढीने अवाढव्य रूप धारण केले.
शहरांच्या वाढीची अंतिम अवस्था ही मृतावस्था होय. शहरातील नागरीकरणाची संयंत्रणा एका बिंदूवर कोलमोडून पडते. उद्योगधंद्यासाठी वातावरण प्रतिकूल होते. आणि मग उद्योगधंदे, नागरिक, शैक्षणिक संस्था यांचे शहराबाहेर स्थलांतर होते. ही एकदम टोकाची स्थिती मी वर्णिली. परंतु ह्या स्थितीचे भान आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणात आपल्या लोकसंख्येची वाढ होत आहे ते पाहता आपणास नवीन शहरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. आता ही शहरे महानगरे नसावीत तर छोटी नगरे असावीत. मध्येच दोन लेख वाचनात आले, एक होता आपल्या अभिनेता अतुल कुलकर्णीचा. त्याने आपल्या मित्र- नातेवाईकांसोबत मिळून गावाबाजुला ओसाड जमीन विकत घेतली आणि बर्याच प्रयत्नानंतर तिथे घनदाट जंगलसदृश्य झाडी निर्माण केली. दुसरा लेख होता अण्णा हजारे यांच्याविषयी, त्यांनी राळेगण सिद्धी या गावात सिंचनाची सुनियोजित व्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे तिथे विविध धान्य / फळे याचे उत्पादन करून ते गाव स्वयंपूर्ण केले. ह्या दोन लेखांनी मला एकदम भारावून टाकले आणि माझ्या एका जुन्या स्वप्नाने पुन्हा भरारी घेतली.
समविचारी सुशिक्षित अश्या नागरिकांचा समूह एकत्र येवून गावरान भागात एकत्र ओसाड जमीन खरेदी करणार. तिथे साधी पण सर्व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण अशी घरे उभारणार. पाण्याची सोय भागविण्यासाठी एका मोठ्या जलाशयाची निर्मिती करणार. आणि ह्या जलाशयातील पाण्याच्या आधारे ह्या ओसाड भागाचे एका हिरव्यागार प्रदेशात रुपांतर करणार! हळूहळू मग ह्या भागात छोट्या शिक्षण संस्थाची निर्मिती करून आजूबाजूच्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय करणार. पुढचा टप्पा म्हणजे इथे शिकलेल्या मुलांसाठी रोजगाराची सोय करण्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे उभारणार! हे वाचताना एक गोष्ट लक्षात आलीच असेल की हा नागरिकांचा समूह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हवा आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर असावा की त्यांना फारशे काही पाश नसावेत. आयुष्यातील १०-१५ वर्षे ह्या असल्या उद्योगासाठी घालविण्याची तयारी असावी. साधारणतः वयाच्या ५०-५५ वर्षी ह्या समूहाने असला उद्योग करण्यास करण्यास सुरवात करावी!
कसे वाटले हे स्वप्न? विचार जरूर कळवा! आणि हो २०२५ सालच्या आसपास सगळा गाशा गुंडाळून विदर्भातील एकाद्या भागात स्थलांतरित होण्याचे माझ्याकडून निमंत्रण आल्यास त्याला हो म्हणण्याची तयारी ठेवा!


Saturday, June 25, 2011

अभ्यास पद्धती भाग २





अभियांत्रिकी अभ्यासक्रम एकंदरीत वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. प्रत्येक सत्रात SUBMISSION नावाचा बागुलबुवा आपली पाठ पुरवीत असतो. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी अध्यापकांच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, विषयाचे नियमित वाचन करणे हे जरूर असते. ह्या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते आणि ते म्हणजे reading between the lines. पुस्तकातील ओळींमध्ये गर्भितार्थ भरलेला असू शकतो आणि त्याचा आपापल्या मतीनुसार अर्थ लावण्याची आपणास मुभा असते! सबमिशन आटोपल्यानंतर मिळणाऱ्या अभ्यास सुट्टीवर आपण भिस्त ठेवल्यास हा गर्भितार्थ उमजून घेण्याची आपणास कमी संधी मिळते.

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणास योग्य अशा अभ्यासनोंदी (नोटस) मिळणे आवश्यक असते. ह्या नोटस मिळविण्यासाठी योग्य कंपूत आपण असणे आवश्यक असते. हा कंपू आपणास विषयाच्या चर्चेसाठी उपयोगी पडतो. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रीकेंचे योग्य विश्लेषण करण्यासाठी ह्या अभ्यासकंपूचा आपणास उपयोग होतो.

अभियांत्रिकीच्या परीक्षा हा एक अजून सखोल विषय. चार तासांचे पेपर आणि त्या वेळात आपणास अवगत असणारे बरेचसे ज्ञान आपणास उत्तरपत्रिकेत योग्य प्रमाणात उतरावे लागते. ह्या वेळात आपल्याला काही निर्णय पटापट घ्यावे लागतात. प्रश्नपत्रिका हाती आली की पहिल्या पाच मिनिटात तिचे विश्लेषण करून आपण सोडवणार असलेले प्रश्न आणि त्यांचा क्रम ठरवावे लागतात. एखाद्या प्रश्नाच्या जास्त प्रेमात पडून सुद्धा चालत नाही. २० गुणाचा एक प्रश्न परीक्षकास तो विद्यार्थी असल्याच्या आविर्भावात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी २० गुणांचे २ प्रश्न योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक असते. ह्या चार तासात आपला आत्मविश्वास टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी खात्रीचे प्रश्न प्रथम सोडविणे आवश्यक असते. एखाद्या विषयात बरीच सूत्र असल्यास उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आणि प्रश्नपत्रिका मिळण्याआधी ही सूत्रे मागच्या पानावर पेन्सिलीने लिहून ठेवण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक विषयाचे काही भाग आपणास पूर्ण उमजलेले असतात आणि त्यांची आपण योग्य तयारी सुद्धा केलेली असते. अशा भागाशी संबंधित प्रश्न प्रथम सोडवावेत. ज्या भागांची आपली तयारी कमी झालेली असते आणि त्या भागाशी संबंधित ज्ञान आपल्या मेंदूच्या कप्प्यातून खेचून घेण्यास (retrieve करण्यास कष्ट करावे लागणार असतात, असे प्रश्न शेवटी ठेवावेत. ह्या भागातील आपली कामगिरी त्यावेळच्या आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अशा वेळी मध्येच छताकडे एक मिनिट पाहत आपल्या विविध उल्लेखनीय कामगिऱ्या (आपल्या म्हणण्यानुसार!) आठवून स्वतःला प्रफुल्लित करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही वर्षे तशी हा हा म्हणता संपून जातात. महाविद्यालयातील सांस्कृतिक दिवस, वेगवेगळे 'Days' साजरे करता करता अंतिम वर्ष समोर येवून ठेपते. पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे (ते ही देशात की परदेशात), की प्रथम थोडा नोकरीचा अनुभव घ्यायचा हा निर्णय घ्यावा लागतो. अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निमित्त आपली बाहेरील व्यावसायिक जगाशी तोंडओळख होते. व्यावसायिक जगात प्रवेश करता करता आपल्या वैयक्तिक जीवनातही बदल होत राहतात आणि अधिकाधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. इथे मात्र कोणतेही पुस्तक आपल्यासोबत नसते. सोबत असतात नातेवाईक, मित्र, आपला स्वभाव आणि आयुष्य कशा पद्धतीने घालावावयाचे आहे याविषयीचे आपले विचार! यातील शेवटच्या दोन गोष्टी वयपरत्वे काही प्रमाणात बदलत जातात. आवश्यक असते ते आयुष्यातील विविध टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहणे!

Friday, June 10, 2011

माझा आवडता देश न्यूझीलंड






न्यूझीलंडचा आणि माझा संबंध फक्त क्रिकेट सामन्यापुरता! न्यूझीलंडमध्ये कोणताही सामना असो मी तो हमखास TV वर पाहतो. कारणे दोन, पहिले म्हणजे न्यूझीलंडची हिरवीगार मैदाने आणि दुसरे म्हणजे तिथले प्रेक्षक. न्यूझीलंडच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता बर्याच वेळा पाहुणा संघ त्यांची धूळधाण उडवत असतो. परंतु मैदानावरील कामगिरीचा तेथील प्रेक्षक स्वतःवर फारसा परिणाम होऊन देत नाहीत. बर्याच ठिकाणी प्रेक्षक सुद्धा हिरव्या कुरणावरच बसलेले असतात. लहान मुलांचा आपला एक स्वतंत्र सामना ह्या कुरणावर चालू असतो. मोठी माणसे बियरचे घुटके घेत घेत वेळ मिळाल्यास मैदानावरील घडामोडींकडे नजर टाकत असतात. मैदानावरील न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही वृत्ती काही फारशी वेगळी नसते. दोन तीन चांगले फटके मारून ते परत तंबूच्या सुखकारक वातावरणात परततात. मालीकांमागून मालिका हरून सुद्धा तेथील कर्णधाराची हकालपट्टी होत नाही.

ह्या एकंदरीत परिस्थितीची कारणीमिमांसा करायची झाली तर न्यूझीलंडची विरळ लोकसंख्या आणि तेथील लोकांना जीवनासाठी करावा लागणारा कमीतकमी संघर्ष हे होय. आपल्या जीवनात संतुष्ट असणारे हे लोक क्रिकेटकडे एक खेळ आणि केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतात. क्रिकेटची गोष्ट सोडा एकंदरीत जीवनातही हे लोक समाधानाने जगत असतात. सतत प्रगती करायला हवी, निव्वळ नफ्यात वाढ हवी अशा ध्येयाने तेथील बहुतांशी जनतेस पछाडलेले नसते. अमेरिकेत असताना एका सहलीदरम्यान दादरहून न्यूझीलंडला स्थायिक झालेल्या मराठी माणसाची भेट झाली. त्याचे एक वाक्य माझ्या अजून लक्षात आहे, तो म्हणाला की न्यूझीलंडचा एखादा तरुण मुलगा अमेरिकत शिक्षण अथवा नोकरीनिमित्त चालला की त्याचे आईवडील काळजीत पडतात की पोरग आता बिघडणार! एकंदरीत काय तर अमेरिकेच्या स्वच्छंदी वातावरणाची भीती जगभर पसरलेली.

अमेरिकेचे स्वच्छंदी वातावरण केवळ आपण ऐकून असतो, चित्रपटातून पाहत असतो आणि मुंबईसारख्या भारतातील शहरांतून जगत असतो. परंतु तसे बघायला गेले तर बहुतांशी अमेरिकन लोक सुद्धा कुटुंबवत्सल असतात आणि भारतात सुद्धा ७०-८० टक्के लोक अजूनही परंपरागत जीवन जगणे पसंत करतात. प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांचा! प्रसारमाध्यमांना हाती घेवून भारतीय जनतेला चंगळवादी बनविण्याचा पद्धतशीर प्रयत्न गेले काही वर्ष चालू आहे. न्यूझीलंडला असे काही होत नाही आणि म्हणूनच माझा आवडता देश न्यूझीलंड! देव करो आणि न्यूझीलंडची उद्योग धंद्यात फारशी प्रगती न हो! नाही तर न्यूझीलंडला गर्दीचे ठिकाण बनवायला आपण भारतीय तयारच आहोत!

Wednesday, June 8, 2011

पुढे काय ?





मनुष्यजातीच्या उत्क्रांतींच्या प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी मनुष्याने संघर्ष केला. हा संघर्ष दैनंदिन पातळीवरचा होता.
उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेत हा संघर्ष दैनंदिन पातळीवर राहिला नाही. साठवणूक करून ह्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकाळासाठी तरतूद करून ठेवण्याचे शहाणपण माणसाला सुचले. ही प्रगती सर्व मनुष्याजातीची न झाल्यामुळे काही समूहांचा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष अजूनही कायम आहे. आज आपण बोलूया उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेतील पुढील टप्प्यावरील समूहाविषयी!

मनुष्यजातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपणास जास्त काळ शांत बसता येत नाही. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर आपण नवीन गरजा निर्माण केल्या. क्रीडा, करमणुकीची साधने निर्माण केली. तंत्रज्ञानाने प्रगती करताच मात्र ह्या गरजांनी आपल्यावर ताबा मिळविण्यास सुरवात केली. गाडी हवी, वातांकुलीत घरे हवीत, बिले भरण्यासाठी इंटरनेट हवे, बोलण्यासाठी भ्रमणध्वनी हवा इथून सुरुवात झाली. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून बिले भरता येण्याची सोय झाली.

माणसाचे तंत्रज्ञानांच्या बाबतीत अंतिम ध्येय काय असू शकते? माझ्या घरी एक संगणक सदृश्य उपकरण असणार, माझ्या मनातील विचार ते ओळखू शकणार आणि दूरदर्शन संच, संगणक, दृश दूरध्वनी यापैकी कोणत्याही एका MODE मध्ये सुरु होवू शकणार. त्यापुढील प्रत्येक पर्याय मी केवळ माझ्या मनातील विचारावर नियंत्रित करणार. Teleportation ने मी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणार. अन्नासाठी मी सलाईन लावणार...आणि असेच पुढे काही.. आज ही थोडी अतिशोयक्ती वाटत आहे पण मनुष्याच्या स्वस्थ न बसता येण्याच्या गुणधर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवशी आपण ही अवस्था गाठणार याची मला खात्री आहे. आणि मग ह्या अवस्थेच्या शेवटी आपण एक तर यंत्र बनून जगणार किंवा तंत्रज्ञान आपल्यावर ताबा मिळवणार!

Tuesday, May 10, 2011

अभ्यास पद्धती






लौकिकार्थाने अभ्यास आणि आपले नाते जरी महाविद्यालयीन जीवनासोबत संपत असले तरी मागे वळून बघून आपली अभ्यास करण्याच्या तंत्रांचा उहापोह करणे हा एक चांगला फलदायी उपक्रम आहे असे माझे मत आहे. प्रत्येकाच्या अभ्यास करण्याच्या तंत्रावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा देखील काही प्रमाणात उलगडा होतो.

मराठी माध्यमातून शिकताना साधारणतः सातवीपर्यंत अभ्यास आवाक्यात असायचा. नियमितपणे गृहपाठ केल्यास परीक्षेच्या वेळी काही खास अभ्यास करावा लागत नसे. आठवीपासून हे चित्र काही प्रमाणात बदलत गेले. परीक्षेच्या आधीचे १-२ आठवडे सतत वाचन करावे लागत असे. N.C.Raut सर काही मुलांची नावे घेवून ती एकपाठी असल्याचे म्हणत असत. मला मात्र ते कधी जमले नाही. पहिले वाचन एकंदरीत विषयाचा आढावा घेण्यासाठी आणि मग नंतरची वाचने तो विषय आणि मसुदा डोक्यात पक्का करण्यासाठी. परीक्षेच्या जाण्याआधी पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय मला चैन पडत नसे. थोड्याश्या घाबरट स्वभावाची ही लक्षणे होत. नववीत असताना फडके क्लासला जावू लागल्यानंतर मात्र माझ्या अभ्यास करण्याच्या शैलीत थोडा फरक झाला. पठण आणि लिखाणावर भर देण्याची ह्या कालावधीत मला सवय लागली. परंतु पूर्ण पुस्तक वाचून झाल्याचे आणि त्यातला कोणताही भाग आपल्या मर्जीनुसार आठवण्याचे मला आवश्यक वाटणारे समाधान मला मिळेनासे झाले. नववीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत फडके सरांनी माझा भरपूर अभ्यास करून घेतला. साधारणतः दहावीचा ५५ - ६० टक्के अभ्यास ह्या वेळात पूर्ण झाला होता. परंतु शाळा सुरु झाल्यावर मात्र मी थोडा त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलो. आणि मला देखील शाळेत शिकवला जाणारा भाग आधीच माहीत असल्याची स्थिती नवीन होती. आणि त्यामुळे मी काही प्रमाणात बेफिकीर राहिलो. जानेवारी नंतर पेपर सोडविण्यावर फडके सरांचा भर होता आणि मी मात्र पूर्ण पुस्तक आपल्या डोक्यात बसविण्याच्या मागे होतो.

अकरावीत बर्याच गोष्टी बदलल्या. माध्यम बदलले, शाळेऐवजी कॉलेज आले. पहिल्या घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेआधी, पुस्तक डोक्यात बसविण्याचे सोडा, एकदा पूर्णपणे वाचून होणे सुद्धा जमले नाही मला. त्यामुळे परीक्षेचा लढा सुरु होण्यापूर्वीच मी थोडासा हतबल झालो होतो. अकरावी असेच गेले. अकरावीची वार्षिक परीक्षा सुरु असतानाच बारावीचा अग्रवाल क्लास सुरु झाला. सकाळी अकरावीचा पेपर आणि दुपारी १ - ७ बारावीचा क्लास असा एक आठवडा काढला. बारावीत रुपारेल होस्टेलवर गेल्यावर मात्र बराच फरक पडला. २४ तास अभ्यासमय असं ते वातावरण होते. अग्रवालच्या नियमित परीक्षा होत आणि होस्टेलवर राहणाऱ्या कॉलेजच्या शिक्षकांकडे पेपरचा क्लास लावला. पेपर सोडवता सोडवता माझा पुस्तक डोक्यात बसविण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. अग्रवालने सुद्धा फडके सरांची पद्धत अनुसरत जानेवारीपासून पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा सुरु केल्या. प्रत्येक परीक्षेच्या वेळी माझा त्या त्या विषयाचे पुस्तक डोक्यात बसविण्याचा प्रयत्न थोडा थोडा पुढे सरकत होता. रुपारेलच्या जानेवारी अखेरीच्या सराव परीक्षेत एकदाची गुणांची नव्वदी गाठल्यावर मनाला थोडे समाधान आणि आत्मविश्वास लाभला. फेब्रुवारी महिना मात्र पूर्णपणे स्वयंअभ्यासासाठी लाभला आणि मग मात्र काही पुस्तके डोक्यात बसल्यावर मी धन्य झालो. परंतु Zoology साठी मात्र माझ्याकडे वेळ नव्हता. PCM करत असलो तरी काय झाले, रुपारेल होस्टेलवर Zoology चा काही भाग option ला टाकणारा मी एकमेव विद्यार्थी होतो.

एकपाठी नसणे, पूर्ण पुस्तक वाचून झाल्यशिवाय आत्मविश्वास न वाटणे, शेवटच्या क्षणी नवीन काही वाचून ते पेपरात उतरविण्याची क्षमता नसणे आणि रात्री दहानंतर मेंदूचा स्वीच बंद होणे अशा उणीवा बरोबर घेवून मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला. दररोजचा ट्रेनचा प्रवास, सबमिशन, क्रिकेटचे वेड ह्या सर्व गोष्टींमुळे परीक्षेच्या आधीच्या study leave वर सर्व भिस्त असायची. अभियांत्रिकी जीवनात एका पुस्तकावर अवलंबून असणे ही योग्य गोष्ट नव्हे परंतु मला माहित असलेल्या माझ्या मर्यादांमुळे मी तो मार्ग पत्करला.

असो वेळेच्या बंधनामुळे आता इथेच आटोपते घेत आहे. जमल्यास बाकीचा भाग पुन्हा कधी तरी लिहीन. लेख लिहिण्याचा एकच उद्देश स्वतःची आणि आपल्या मुलाची अभ्यास पद्धती काय आहे ते ओळखून घ्या. आपली अभ्यास पद्धती आपल्या स्वभावाचे द्योतक आहे, ती माहित असल्यास आपल्यास आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. आपल्या मुलाची अभ्यास पद्धती ओळखता आल्यास त्यात थोडेफार योग्य बदल करण्याचा प्रयत्न करता येईल आणि असलेल्या मर्यादांमध्ये योग्य यश मिळविता येईल

Saturday, April 23, 2011

अण्णा हजारे आंदोलनानिमित्त





असे कुठे तरी वाचले होते की भारतातील न्यायप्रणालीचे एक मुलभूत तत्त्व आहे की हजारो अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे एखाद्या अपराध्याला शिक्षा ठोठावण्याआधी पूर्ण खात्री केली जाते आणि तसेच एखादा कायदा करण्याआधी बराच उहापोह केला जातो. सखोल अभ्यास करण्याला ह्या कायद्यातील पळवाटा काढणे शक्य असते आणि नेमका त्याचाच फायदा राजकारणी आणि भ्रष्ट प्रशासनीय अधिकारी घेतात. ही युती बुद्धिमान आहे पण दुर्दैवाने त्यांच्या बुद्धीचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी करून घेण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. ह्या युतीने भारतातील लोकांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले असणार. कायदेशीररित्या ह्या युतीशी लढा देवू शकणारा वर्ग आपल्या देशात आहे पण एक तर तो वर्ग स्वतःच्या प्रगतीची शिखरे गाठण्यात मग्न आहे किंवा इच्छा असुनही काही कारणास्तव गप्प आहे. प्रसारमाध्यमांचे मला नक्की कळत नाही, एखादे प्रकरण ज्या वेगाने प्रकाशात येते तितकेच ते विसरलेही जाते.

ही ऐवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे ज्या दिशेने लोकपाल विधेयकाचा प्रवास चालू आहे त्यावरून माझी खात्री आहे की सध्या मुळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. असे म्हटले जाते की रेल्वेच्या डब्यात जेव्हा एखादा पाकीटमार पकडला जातो तेव्हा त्याच्या आजूबाजूला वावरणारे त्याचेच साथीदार त्याला मारण्याचे नाटक करून खऱ्या मारापासून त्याला वाचवितात. असलाच काहीसा प्रकार सध्या चालू आहे. माझी खात्री आहे की थोड्याच दिवसात लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एखादे दुसरे प्रकरण बाहेर काढले जाईल. आणि आपण सर्व काही विसरले जाऊ. नाही म्हणायला IPL तर आहेच की.

जो पर्यंत सुशिक्षित वर्गाचा सहभाग फक्त चर्चेपुरता अथवा ब्लॉग लिह्ण्यापुरता मर्यादित आहे तोपर्यंत आपण म्हणूयात की जय लोकशाही!

Wednesday, April 20, 2011

मिती







आयुष्यात विविध घटनांवर विविध घटक परिणाम करीत असतात. जसजसे ह्या घटकांची संख्या वाढत जाते तसतसे घटना, ती बाब क्लिष्ट होत जाते.

आपण क्रिकेटपासून सुरुवात करूयात. फलंदाजाची गुणवत्ता आणि खेळपट्टी हे दोन घटक धावसंख्येवर परिणाम करतात. शक्यता चार
१> चांगला फलंदाज आणि अनुकूल खेळपट्टी
२> चांगला फलंदाज आणि प्रतिकूल खेळपट्टी
३> बेताचा फलंदाज आणि अनुकूल खेळपट्टी
४> बेताचा फलंदाज आणि प्रतिकूल खेळपट्टी
यात आपण पंचाला सुद्धा समाविष्ट करण्याचे ठरविले तर शक्यतांची संख्या आठ होते.

कार्यालयात सुद्धा एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना व्यवस्थापक, टीम आणि प्रोजेक्टची क्लिष्टता असे तीन घटक येतात. सर्वात अनुकूल परिस्थिती म्हणजे कुशल व्यवस्थापक, उत्तम टीम आणि सोपे प्रोजेक्ट. सर्वात प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ....!

संसारात सुद्धा नवराबायकोचे स्वभाव हे दोन घटक घेता येतील!
१> शांत नवरा, शांत बायको
२> शांत नवरा, तापट बायको
३> तापट नवरा, शांत बायको
४> तापट नवरा, तापट बायको
यात दोन्ही बाजूच्या सासुंचे स्वभाव हे घटक समाविष्ट करून बघा, किती धमाल येईल!

कधी वेळ मिळाला तर आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बाबींचे असे विश्लेषण करून बघा! ह्या बाबींवर परिणाम करणारे घटक शोधा आणि त्यांचे वर्गीकरण करा. थोडी गंमत वाटेल आणि बरेच काही शिकता येईल!

Friday, April 15, 2011

असेच काही





राहून राहून मी एकत्र कुटुंब पद्धतीकडे वळतो. एका जवळच्या मित्राच्या टिप्पणीनुसार, एकत्र कुटुंब पद्धतीचा माझ्यावर मोठा पगडा आहे. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या डोळ्यासमोर बघता बघता नाहीशी झाली. थोडा विचार करता असे जाणवते की एकत्र कुटुंब संस्थेत काळानुसार थोडेच पण योग्य बदल केले असते ती टिकली सुद्धा असती. ह्या संस्थेतील काही व्यक्तींचा त्याग (स्वखुशीने अथवा परिस्थितीमुळे) हा एकत्र कुटुंबसंस्थेचा पाया होता. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढले तसतसे स्वःत्वाची भावना वाढीस लागली आणि त्यागभावना लोपास गेली. एकत्र कुटुंबसंस्थेचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्या कुटुंबात वाढणार्या मुलांचे जोपासणारे भावनिक संतुलन. आजी आजोबा, काका, काकी, मोठी भावंडे यांच्या सहवासात वाढताना आपण एका मोठ्या संस्थेचा भाग असल्याची एक सुखद भावना जोपासली जाते. आणि मग स्वतःची एक ओळख (identity) निर्माण होते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोष्टी वाटून घेण्याची सवय लागते. विभक्त कुटुंबात वाढलेल्या मुलांना मात्र स्वःताची एक Space लागते. आणि त्यामुळेच लग्नानंतर विवाहसंस्थेत स्थिरावताना ह्या मुलांना थोडा जास्त वेळ लागतो. एकत्र कुटुंबसंस्थेचे पुनर्जीवन करणे शक्य आहे का? ज्या रुपात ती अस्तित्वात होती त्या स्वरुपात तर नाही पण काळानुसार थोडेफार बदल करून ती अजूनही अमलात आणता येईल असे मला वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर बाजूबाजूला सदनिका घेवून राहणे हा एक उपाय असू शकतो. अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो आणि तो म्हणजे लहान मुलांचे होणारे शाब्दिक कौतुक! आजी, आजोबांच्या नजरेतून नातवंडे सदैव बालकेच असतात. त्यामुळे नोकरीला जाणार्या आपल्या नातवंडाचे एका बालकाप्रमाणे कौतुक करणे केवळ आजी, आजोबाच जाणो! बाहेरून कितीही आपण त्याला विरोध केला तरीही मनातून आपण सुखावत असतो. स्वःताचे कौतुक करून घेण्याची सुप्त इच्छा प्रत्येक प्रौढ माणसाच्या मनात असते. विभक्त कुटुंबात ही इच्छा बर्याच प्रमाणात अतृप्त राहते. आजच्या जीवन प्रत्येकजण विविध पातळ्यांवर विविध प्रमाणात संघर्ष करीत असतो. आजचा हा ब्लॉग विनाकौतुक जीवनसंघर्षाला सामोरे जाणार्या आपण सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी!

Friday, April 8, 2011

केरळ भेट भाग २





ठेकडी येथील हॉटेलचा परिसर पाहून आम्ही बेहद्द खुश झालो. तेथून पेरियार येथील तलाव आणि त्या सभोवतालचे वन्य जीवन पाहण्यासाठी आम्ही निघालो. पेरियार जलाशयातील बोट दुपारी ३:३० वाजता निघणार होती. योग्य माहितीच्या अभावी आम्ही तेथे २ वाजताच जावून पोहचलो. तिकीटे घेतल्यावर आम्ही बोटींच्या धक्क्यावर जावून पोहोचलो. तेथे आजूबाजूंच्या झाडांवर माकडांनी वास्तव्य केले होते. जसजशी लोकांची गर्दी वाढू लागली तसतसे माकडांनी झाडांवरून खाली उतरण्यास प्रारंभ केला. लोकांजवळील खाद्यपदार्थ हिसकावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळ तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळाने काळ्या माकडांच्या दुसर्या एका टोळीने ह्या आधीच्या समूहावर हल्ला करून त्यांना हिसकावून लावले. शेवटी एकदा तिथे बोटींचे आगमन झाले. जलतरींगिनी (चुकलो जलथरींगिनी) ह्या बोटीत आम्ही बराचश्या विदेशी पर्यटकांबरोबर बसलो. ह्या बोटीबरोबर अजून तीन बोटी होत्या. आम्हाला जबरदस्तीने संरक्षक jacket घालावी लागली. ही jacket म्हणा किंवा विमानातील प्राणवायूचे मास्क म्हणा, हे आपल्या किंवा त्या कंपनीच्या समजुतीसाठी! पुढील दोन तास आम्ही एका अवर्णनीय अनुभवाचे साक्षीदार होतो. जलाशयाभोवती घनदाट जंगल आणि ठिकठीकाणी जलाशयाच्या काठावरील विस्तीर्ण कुरणांमध्ये चरणारे, शहरीकरणाचा स्पर्श न झालेले वन्य प्राणी! हरणे, कोल्हे आणि हत्ती ह्या प्राण्यांचे आम्हाला दर्शन झाले. वाघाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आम्हां सर्वांची मात्र थोडी निराशाच झाली. जंगलाचे वातावरण मात्र मला बरेच गूढ वाटले आणि मला त्याने मोहवून टाकले. शतकोशतके न बदललेली ही भूमी आणि त्यात फक्त अन्न ही मुलभूत गरज भागविण्यासाठी जीवन मरणाचा खेळ दररोज खेळणारे वन्यजीव आपल्याला आपल्या दररोजच्या संघर्षाच्या निरर्थकतेची जाणीव करून देतात. ह्या जलाशयात बरेच वठलेले वृक्ष आणि त्यावर वास्तव्य करणारे पक्षी आढळतात. हे पक्षी आपल्याला मासे पकडण्याची कसरत सुद्धा करून दाखवतात. बाकी मध्येच एका हत्तींचा समूह जवळून बघण्याच्या नादात आमच्या बोटीला बाकीच्या बोटींनी मागे टाकले. त्यामुळे सोहमची बैचैनी वाढली. आपण बाकीच्या बोटींना कधी एकदा मागे टाकतो असे त्याला झाले. त्या जलाशयाच्या दुसर्या टोकाला पोहचून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आता बोटीचे सारथ्य दुसर्या माणसाने हाती घेतले, आता हा तरी दुसर्या बोटींना मागे टाकेल ही सोहमची अपेक्षा मात्र काही सार्थ झाली नाही. शेवटी मात्र फक्त आमच्याच बोटीला एका हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने जवळून दर्शन दिले आणि फोटोसाठी पोझही दिली. मसाल्याची थोडीफार खरेदी करण्याच्या नादात थोडा वेळ झाला आणि रात्र उजाडली. परतीचा प्रवास २० किलोमीटर होता. अंधारातील निर्मनुष्य रस्ते पाहून सोहमने रात्रीचा प्रवास करणे कसे चुकीचे आहे हे आम्हाला समजावले आणि खरेदी वेळीच आटोपणे आवश्यक आहे असा सल्लाही दिला. बर्याच वेळा आपले गुण मुलामध्ये उतरलेले दिसतात आणि त्यावेळी मन कुठेतरी सुखावते. वयानुसार आपण भावना मनातच ठेवून द्यायला सरावतो परंतु लहान मुलांचे मात्र तसे नसते. मनातील विचार ते बिनधास्त बोलून दाखवितात. बर्याच दिवसांनी विमानात बसल्यावर ज्यावेळी उड्डाणाची वेळ आली तेव्हा मनात थोडी धाकधूक असताना 'बाबा आपले विमान पडणार तर नाही ना? असा प्रश्न ऐकल्यावर मन धन्य होते. आमचा ड्रायव्हर दररात्री कारमध्येच झोपायचा. ही गोष्ट आपल्याला जशी खुपते तशी सोहमला ती पटली नाही. काही गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण त्या बदलणे शक्य असूनही आपण त्या बदलत नाही. प्रवासाचा पाचवा दिवस उजाडला. आजचे आकर्षण अल्लेपी येथील नावेतील प्रवास आणि रात्रीचे वास्तव्य हे होते. आतापर्यंत अतिशय शांतपणे कार चालविणारा आमचा ड्रायव्हर आज मात्र सुसाट सुटला होता. मल्याळम भाषेतील शेलके शब्द ऐकायची संधीही आम्हाला या निमित्ताने मिळाली. संधी मिळताच त्याला मी विचारले, काय रे बाबा आज काय झाले? तो तोडक्या मोडक्या हिंदीत उत्तरला की आज तो त्याच्या अल्लेपी येथील घरी जाणार होता आणि पाच दिवसाने बाबा येणार म्हणून त्याच्या मुलाने शाळेला सुट्टी घेतली होती! बर्याच जणांकडून ऐकलेल्या केरळच्या backwater चा प्रवास सुरु झाला. नावेत सारथ्याने, त्याच्या मदतनीसाने आणि आचार्याने शहाळ्याचे पाणी देवून आमचे स्वागत केले. ही हाउसबोट तशी भव्य पण मस्त्यगंधाने सुगंधीत! दिवसाचा प्रवास तसा मजेचा! सर्वत्र जलाशय आणि काठावर झाडांमध्ये वसलेली केरळची गावे हे पाहण्यास मजा आली. संध्याकाळी साडेपाचनंतर ह्या बोटींना जलसंचार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे एका गावाच्या काठी ही बोट वास्तव्याला आली. गावात एक फेरफटका मारण्याचा आमचा उत्साह थोड्याच वेळात मावळला! जलाशयाच्या काठी दात घासणारे, भांडी धुवणारे गावकरी पाहण्यास आम्ही सरावत होतो तितक्यात आमच्या समोरच आमच्या आचार्याने त्याच पाण्यात डुबकी मारून त्यांचे संध्याकाळचे स्नान आटोपले. ते पाहून आम्ही याची देही डोळा धन्य झालो! बाजूला अशा अनेक बोटी वास्तव्याला आल्या होत्या! त्यातील कुटुंबेही फेरफटका मारण्यासाठी निघत आणि मग थोडा वेळ आमच्याशी गप्पा मारून जात. ही रात्र आता अशा ठिकाणी काढायची अशा विचाराने कंटाळलो असताना 'बाबा येथे रात्री डाकू तर येणार नाहीत, या सोहमच्या प्रश्नाने आमची करमणूक झाली. नावाड्याने विचारले हा काय विचारतो आहे? डाकू हा शब्द त्याला हिंदीत समजावू न शकल्याने मी शेवटी त्याला फुलनदेवी हा शब्द सांगितल्यावर त्याची हसताहसता पुरेवाट झाली. बाकी ह्या हाउसबोटीवर जेवण मात्र अगदी रुचकर होते. रात्री डासांचा मुकाबला करावा लागला. शेवटी एकदा बेडरूम मधला AC सुरु केल्यावर आम्ही सुखावलो. शेवटच्या दिवशी कोचीनच्या दिशेने आम्ही प्रस्थान केले. तिथे थोडीफार खरेदी करून भारताचा विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बघण्यासाठी आम्ही विमानतळावर येवून दाखल झालो. रात्री बोरीवलीला परतल्यावर भारताने सामना जिंकला आणि एका छान सुट्टीची सांगता झाली.

Monday, April 4, 2011

केरळ दर्शन - भाग १





मार्च महिन्यात एक सहकुटुंब केरळ सहल करण्याची संधी मिळाली. मुन्नार, ठेकडी आणि अल्लेपी अश्या तीन ठिकाणांना आम्ही भेट दिली. १९ मार्च रोजी सकाळी विमानाने आम्ही कोचीन विमानतळावर पोहोचलो. तेथून प्रथम आम्ही मुन्नार येथे प्रयाण केले. मुन्नारच्या वाटेवरील नागमोडी रस्ते, एका बाजूला दिसणाऱ्या दर्या आणि दुसर्या बाजूला हिरवाईने नटलेले विस्तीर्ण डोंगर असे अप्रतिम निसर्गसौदर्य डोळ्यात साठवत आम्ही जवळपास पाच तासांचा रस्ता कसा पार केला हे आम्हाला कळले सुद्धा नाही. ह्या रस्त्यावरील शांतता कानात साठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. आमचे हॉटेल सिएंना विलेज, हे मुन्नारच्या पलीकडे अधिक उंचीवर होते. तेथे पोहोचताच त्या हॉटेलच्या रमणीय परिसराने आम्ही भारावून गेलो. प्रत्येक व्यक्तीची पर्यटनाची एक विशिष्ट पद्धत असते. आपण कधीकाळी फिरत असल्यास ही शैली ओळखण्यास आपणास संधी मिळत नाही. परंतु आम्हाला मात्र फारसे न फिरता ही पद्धत अचानक गवसली. मोजक्या दिवसात अधिकाधिक स्थळे पाहणे आम्हाला कधीच जमत नाही. मोजकी स्थळे आपल्या कलाने पाहणे आम्हाला जास्त रुचते. मुन्नारच्या रस्त्यावरील एखादी मनुष्यस्पर्शापासून मुक्त अशी जागा अनुभवण्यासाठी गाडी थांबविणे आम्हाला आवडते. मुन्नारच्या आसपास दोन तीन धरणे, Tea Factory अशी ठिकाणे आम्ही आटोपली. बाकी हॉटेलचा नास्ता मात्र भरपेट आणि अमर्यादित. थंड हवा आणि रुचकर अन्न याचा परिणाम शरीरावर दिसू लागला नाही तरच नवल. तिसर्या दिवशी अजून वर जावून तेथील टी factory पाहण्याचे आम्ही ठरवले. हा रस्ता अधिक बिकट, साधी इंडिका तेथे तग धरणार नाही म्हणून खास जीप भाड्याने केलेली. थोड्याच वेळात रस्त्याची अवस्था पाहून आम्ही जीप एका कडेला थांबवली. बाजूलाच एक छोटी ठेकडी आणि त्यावर चहाची पाने खुडणाऱ्या कामगार. अचानक आम्ही त्या टेकडीवर कूच करण्याचा निर्णय घेतला. चहाची रोपे लांबून कितीही नाजूक दिसत असली तरीही असतात तशी खमकी. त्यांचा आधार घेत आणि प्रसंगी त्यांचे बोचकारे खात आम्ही त्या कामगारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आमच्या चालकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडासा आमचा प्रयत्न. तेथील एका वयस्क स्त्रीने सोहमला एका नातवाच्या मायेने जवळ ओढून घेतले. कधी नव्हे ते सोहमने सुद्धा ते लाड आनंदाने स्वीकारले. अजून पुढचा रस्ता आम्ही स्वखुशीने टाळला आणि परतीच्या वाटेवर आलो. चार तासाची ही फेरी २ तासात आटपून सुद्धा जीपवाला मात्र नेहमीच्या भाड्यावर अडून बसला. व्यावसायिकता माणुसकीला टाळे लावते अशी आमची समजूत काढत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. प्रवासात आपण निसर्गरम्य ठिकाणे पाहतो, चांगल्या हॉटेलात राहतो, व्यवस्थित खातो पितो. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचे समृद्ध होणारे भावविश्व. नेहमीपेक्षा येणारे वेगळे असे अनुभव तो आपल्या पालकांबरोबर राहून अनुभवत असतो. प्रवास करणारे कुटुंब एक संघ म्हणून सर्व गोष्टींचे नियोजन करीत असते, मजा अनुभवत असते आणि कठीण परिस्थितींचा सामना देत असते. दैनंदिन जीवनात सुद्धा ह्या गोष्टी होत असतात परंतु त्यातील सांघिकपणाची भावना मुलास जाणविण्याइतपत नसते. एका सहलीत हे एका कुटुंबाचे बंध बळकट होत असतात. एरव्ही थंड पाणी पिऊ न देणारे बाबा प्रत्येक जेवणात आईसक्रीम खावून देतात हे कळल्यानंतरचा त्याचा आनंद शब्दात पकडण्यापलीकडचा असतो. तो त्याला धडा देवून जातो की जीवनात प्रत्येक गोष्टीला तर्काची कसोटी लावायचा प्रयत्न करू नये. आयुष्यात काही गोष्टी तर्कापलीकडे घडतात आणि त्या आपणास आनंदही देवू शकतात. पुढचा भाग पुन्हा कधी तरी!

Sunday, March 27, 2011

न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - सामनावृत्तांत





न्यू इंग्लिश स्कूल १९८८ विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - मर्यादित षटकाचा क्रिकेट सामना दिनांक ३० जानेवारी २०११ वेळ - सकाळी ७ - ८:३० तापमान - १६ डिग्री सेल्सिअस पंच - विवेक काणे आणि संजिव पाटील धावसंख्या न्यू इंग्लिश स्कूल १९८५ - ८ षटकात ६ बाद ६० न्यू इंग्लिश स्कूल १९८८ - ७.३ षटकात ४ बाद ६१ विजयी संघ - न्यू इंग्लिश स्कूल १९८८ पहिला डाव सामना निर्धारित वेळेच्या थोडाच वेळ नंतर म्हणजे सव्वासात वाजता सुरु झाला. संजय राऊत यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सचिन पाटणकर आणि गट्टू यांनी डावाची सुरुवात केली. १९८८ batch तर्फे सचिन याने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिलाच चेंडू ८८ चे कसलेले यष्टीरक्षक सुजित देवकर यांना चुकवून सीमारेषेबाहेर गेला. पुढील चेंडूदेखील मागे जाऊन २ धावा मिळाल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सचिन यांनी एक सुंदर चौकार ठोकून संघाची धावसंख्या ११ वर नेली. दुसर्या षटकात अरुण गोईलकर यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली. या षटकात समीर कंक यांनी सचिन यांना जीवदान दिले. या षटकात देखील सचिन यांनी लॉंगऑन दिशेने एका चौकाराची नोंद केली. कर्णधार सुजित यांनी गोलंदाजीत बदल करीत राकेश यांना गोलंदाजीस पाचारण केले. राकेश यांनी चेंडूच्या टप्प्यावर योग्य नियंत्रण ठेवीत या षटकात मात्र केवळ चार धावा देत धावसंख्येचा वेग एका आकड्यावर (प्रती षटकामागे ९) असा आणला. त्यानंतर आदित्याकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. त्यांच्या पहिल्याच चेंडूवर गट्टू हे दुसरी धाव पळून काढण्याच प्रयत्नात धावबाद झाले. लेग अम्पायर संजिव पाटील यांनी क्षणभर विचार करून त्यांना बाद घोषित केले. दुसर्या चेंडूवर विवेक काणे यांनी आदित्याचा चेंडू साईड नो म्हणून पुकारला. सचिन पाटणकर यांनी संयमी फलंदाजी करीत दोन दोन धावा पळून काढण्याचे सत्र सुरु ठेवले. आदित्याचे हे षटक एकूण ९ चेंडू चालले. नवीन आलेले फलंदाज संजय यांनी आपला जम बसविण्यास थोडा वेळ घेतला. चार षटकानंतर ८५ ची धावसंख्या १ बाद ३८ इतकी झाली. त्या नंतर मात्र ८८ च्या गोलंदाजांनी आपल्या कुशल गोलंदाजीचे पाश आवळण्यास सुरुवात केली. राकेश यांनी संजय राऊत यांना आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने जखडून ठेवले. ५ व्या षटकात केवळ ५ धावा आल्या. ५ षटकानंतर ८५ - १ बाद ४३. सहाव्या षटकाच्या सुरुवातीस चेतन चव्हाण यांनी सचिन पाटणकर यांना त्रिफळाचीत करून ८५ च्या संघास मोठा धक्का दिला. त्यांच्या या षटकात केवळ ७ धावा आल्या. ६ षटकानंतर ८५ - १ बाद ५०. या कालावधीत सुजित देवकर यांनी यष्टीमागे धावा देण्याचा सपाटा चालूच ठेवला. समीर ठाकूर यांनी फलंदाजीची धुरा सांभाळण्याचा थोडाफार प्रयत्न केला. परंतु सचिन संख्ये आणि चेतन चव्हाण यांनी शेवटच्या दोन षटकात केवळ १० धावा दिल्या. ८५ ची batch ८ षटकानंतर ६० धावा जमवू शकली. डावाच्या मध्यावर ३८ धावा असतांना ही एकूण धावसंख्या काहीशी निराशाजनक अशी होती. ८८ च्या तंबूत मध्यंतराच्या वेळी चिंतेचे वातावरण होते.. दुसरा डाव ८८ तर्फे सचिन संख्ये आणि राकेश राऊत हे फलंदाजीस उतरले. सचिन पाटणकर यांनी अचूक टप्प्यावरून चेंडू उसळवीत ह्या दोघांना जखडवून ठेवले. ८८ च्या एका प्रेक्षकाने सचिन पाटणकर यांना डेरील स्टेन यांची उपमा दिली. पहिल्या षटकात केवळ तीन धावा जमविल्या गेल्या. संजय पाटील यांनी दुसर्या षटकात देखील अचूक गोलंदाजीचा क्रम चालू ठेवीत धावसंख्येवर अकुंश ठेवला. ह्या मुळे दडपणाखाली येत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राकेश राऊत हे धावचीत झाले. त्यानंतर सुजीत देवकर हे फलंदाजीस उतरले. त्यांनी मैदानातील क्षेत्ररक्षकांची संख्या मोजली असता एकूण १२ जण क्षेत्ररक्षण करीत असल्याचे आढळले. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्ररक्षक परांजपे यांना विशाल पाटील यांच्या सोबत गुणलेखनाच्या जबाबदारीसाठी पाठविण्यात आले. सामन्याचा हा कलाटणीचा क्षण ठरला. सुजित देवकरने एका उत्तुंग षटकाराची नोंद केली. या वेळी पंच विवेक यांचा षटकार घोषित करण्याचा आविर्भाव लाजबाब होता. चार षटकानंतर ८८ batch २४ धावांवर होती. सचिन पाटणकर यांची दोन षटके संपली.आणि मग त्यानंतर मात्र ८८ च्या फलंदाजांनी मुक्त खेळ करण्यास सुरुवात केली. ८५ batch ने आपल्या वयोमानानुसार ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. याला अपवाद यष्टीरक्षक जयदीप वाकणकर आणि लॉंगऑनला क्षेत्ररक्षण करीत असलेले हेमंत डोंगरे यांचा (सामन्याच्या वर्णनाच्या ह्या वाक्याचे प्रायोजक आहेत हेमंत डोंगरे ). ८८ batch ने एका वेळी तर ५ धावा धावून काढल्या. समीर ठाकूर यांच्या पहिल्या षटकात १२ धावा चोपल्या गेल्या. हेमंत डोंगरे यांनी सुजित देवकर यांचा एक कठीण झेल दुसर्या प्रयत्नात टिपला. परंतु त्यानंतर आलेले फलंदाज अतुल शिंदे यांनी जोरदार फटके मारले. सचिन संख्ये बाद झाल्यावर अरुण गोईलकर हे मैदानात आले. त्यांनी आणि अतुलने व्यावसायिकरित्या फलंदाजी करीत उत्तमरीत्या धावा पळून काढल्या. हेमंत डोंगरे यांनी अतुलचा झेल दुसर्या प्रयत्नात सोडला. शेवटच्या दोन षटकात ८८ batch ला १० धावांची गरज होती.अतुल यांचा पाय दुखावला गेल्यामुळे सुजित हे रनर म्हणून उतरले. परंतु अतुल थोड्याच वेळात बाद झाले. आदित्य १ धावा काढून समीर ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या नंतर दीपक कदम यांनी विजयी धावा काढल्या. आणि मग ८८ batch ने आपल्या विजयोत्सवाने मैदान दणाणून सोडले.



Quotes of the Day! विवेक काणे - आज रात्री ८५ चा गुणलेखक ८८ च्या संघाबरोबर पार्टी करतानाचे sting operation फेसबुकवर झळकणार! ८८ चा न निवडला गेलेला खेळाडू - ८८ च्या संघनिवडीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. ८८ चा गोलंदाजी न मिळालेला खेळाडू - ८८ च्या गोलंदाजीत पापडीच्या खेळाडूंना झुकते माप दिले गेले. हेमंत डोंगरे - इतिहासात मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले! ८५ ची batch मैदानात जिंकली पण गुणतक्त्यावर हरली!

Friday, March 18, 2011

चंद्र


चंद्र भूतलावरच किंवा आकाशातला, तसा प्रत्येकाच्या मनात वास्तव्य करून असतो. तसे मलासुद्धा चंद्राचे आकर्षण! लहानपणी चंद्रग्रहण होणार अशी बातमी ऐकून मी गोंधळून गेलो. पण त्यात काय, फक्त पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार अशी समजूत काढताच, आपल्या मुंबईला राहणाऱ्या आपल्या मामाची सुद्धा सावली मला चंद्रावर दिसणार असा विचार माझ्या डोक्यात आला.

गणपतीच्या दिवशी चंद्र बघायचा नाही, पाण्यातील किंवा दुधातील त्याचे प्रतिबिंब तर अजूनही वर्ज्य अशी शिकवण लहानपणापासून मला मिळालेली! पण बर्याच वेळा हा नियम माझ्याकडून मोडलेला. बारावीला असताना गणपतीच्या दिवशी संध्याकाळी रुपारेलच्या होस्टेलला जाताना वांद्र्याला गाडी बदलून माटुंग्याला उतरण्यासाठी पश्चिमेला तोंड उभ्या करून असलेल्या मला चंद्राने हसून दर्शन दिले. बाकी ढगाळ वातावरण असताना, अचानक चंद्रास्त व्हायच्या वेळी एकदा चान्दोबाबा माझ्यासमोर प्रकट झाले. अगदी गेल्या वर्षी हेमंतकडून गणपती पाहून येत असताना, शनीदेवळानंतर डावीकडे वळण घेताच चंद्र दिसला.

बाकी पृथ्वीला एकच चंद्र असल्याचे मला सदैव दुःख होते. आतापर्यंत मला कित्येक वेळा पृथ्वीला दोन चंद्र असल्याचे स्वप्न पडले. प्रत्येक स्वप्नात खूप खुश झाल्यावर जाग आल्यानंतरचे दुःख मात्र अतोनात! हेच स्वप्न पुढे खेचून, पृथ्वीला ३० चंद्र असावेत आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी तिथी असावी अशी इच्छा मी मनात बाळगली. म्हणजे काय तर, कोणत्याही दिवशी आकाशात प्रत्येक तिथीचा एक चंद्र असणार! संकष्टी पाळणारे एकदम धर्मसंकटात!

ह्या चंद्राची काही रूपे एकदम लक्षात राहिलेली. न्यू जर्सीच्या पहिल्या बर्फवृष्टीनंतर ह्या बर्फावर चकाकणारा आकाशातील चांदोबा, पहिल्या परदेशवारीनंतर परत येताना दुबईवरून विमानाने उड्डाण केल्यावर ढगातून डोकावणारा चांदोबा लक्षात राहिलेत! बाकी वसईच्या शुद्ध वातावरणातल्या चंद्राचे सौंदर्य काही औरच!

चंद्र दररोज आधीच्या दिवसापेक्षा ५२- ५३ मिनटे उशीरा उगवतो. आता ही ५२- ५३ मिनटे भारतात खरी, ती बहुदा अक्षांशानुसार आणि रेखांशानुसार बदलत असावी असा माझा समज आहे. ते नक्की गणित एकदा समजून घ्यायचे आहे. पूर्णिमेला सूर्य मावळल्यानंतर उगवणारा चंद्र कृष्ण अष्टमीच्या वेळी मध्यरात्री उगवतो. आणि असे करीत करीत अमावास्येला सूर्याबरोबर उगवतो. चन्द्रोदयावेळी आणि चंद्रास्तावेळी ओहोटी असते आणि ज्यावेळी चंद्र बरोबर डोक्यावर किंवा पायाखाली असतो त्यावेळी भरती असते. हे तत्व बोर्डीच्या आजोबांनी लहानपणी सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. हे आता रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जायच्या वेळी लक्ष्यात ठेवायचे!

असा हा चंद्र उद्या पृथ्वीच्या अगदी जवळ येतोय! लक्षात ठेवा एक नजर टाकायला त्याच्यावर!

Sunday, March 13, 2011

आत्मकेंद्रित


आताच एक फेसबुकवर स्टेटस वाचले
प्रत्येकजण आत्मकेंद्रित असतो
फक्त वर्तुळाच्या त्रिज्या मात्र बदलत असतात!

अप्रतिम, लाजबाब
आपण आपल्या कळत नकळत आपल्याभोवती एक आपल्या सुखकारक वातावरणाचे वर्तुळ आखून घेतो. त्या आरामदायीपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यक्ती, समारंभ, स्थळ यांनाच ह्या वर्तुळात प्रवेश असतो. जसजसा माणुस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत जातो तसतसा तो ह्या वर्तुळाच्या निवडीविषयी एकदम चोखंदळ होत जातो. काही माणसे मात्र आपली त्रिज्या फार मोठी आखतात, वसुधैव कुटुम्बकम् अशीच त्यांची धारणा असते. आजकाल अशी निस्वार्थी माणसे मिळणे जरा दुर्मिळच झाले आहे.

हीच कल्पना पुढे नेत असा विचार करूया की दैनंदिन जीवन प्रत्येकजण आपले हे वर्तुळ घेवून फिरत असतो. ज्या ज्या वेळी व्यक्तीच्या ह्या वर्तुळात एखाद्या आगन्तुकाचे आगमन होते त्यावेळी संघर्ष निर्माण होतो! बाकी फेसबुकाचे मात्र बरे आहे, आपले वर्तुळही आपणच आखायचे आणि या वर्तुळातील कोणी मनाजोगता वागला नाही तर त्याला unfriend करून टाकायचे!

Saturday, March 12, 2011

क्रिकेट आणि निराशा


कालचा सामना आपण हरला. काही वर्षापूर्वी मला ह्याचा खूप त्रास बराच वेळ व्हायचा. जावेद मियांदादचा शारजाह मधील शेवटच्या चेंडूवरचा षटकार, तेंडूलकरने पाकिस्तान विरुद्ध १३६ धावांची खेळी केल्यावर विजयासाठी १६ धावा हव्या असताना तो बाद झाला आणि मग बाकीचे चार गडी १० धावात बाद झाले. ह्या दोन प्रसंगांनी माझ्या निराशेची परिसीमा गाठली होती.

हल्ली खूप त्रास होतो पण त्या मनःस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी मी वापरत असलेले उपाय थोडेसे टोकाचे असतात, पण ते मला उपयोगी पडतात. पहिला मार्ग म्हणजे देवाने आपल्याला आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींचे स्मरण करणे आणि ह्या पराभवानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची स्वतःला आठवण करून देणे. दुसरा मार्ग म्हणजे किशोरकुमारची ७० च्या सुमारातील गाणी लावून ऐकणे. तिसरा मार्ग म्हणजे कार्यालयातील किचकट कामाची स्वतःला आठवण करून देणे. अशा गोष्टींचा विचार करता करता पराभवाची तीव्रता थोडी कमी होते. मग मी साखळीचा गुण तक्ता घेवून बसतो आणि अजून सुद्धा भारत कसा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो ह्याचे गणित मांडू लागतो.

अशा पराभवानंतर मी दोन गोष्टी टाळतो आणि त्या म्हणजे थिल्लर हिंदी बातमी वाहिन्या आणि दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील क्रीडा सदर. हल्ली प्रत्येकजण समीक्षक बनला आहे. मी सुद्धा समीक्षा करतो परंतु मी मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंची क्षमता, कप्तानाला निर्णय घेण्याचे असलेले स्वातंत्र्य याचा आदर करतो. ८५ च्या batch बरोबर झालेल्या ८ षटकाच्या सामन्यानंतर प्रत्यक्ष सामना खेळणे आणि बाहेरून टीका करणे यातील जमीन आसमानाचा फरक मला जाणवला.

असो ह्या निराशेच्या परीसीमेवरून आठवले की आपण निराश झालो हे स्वतःशी किंवा जवळच्या कोणाशी तरी मान्य करणे ही निराशेतून बाहेर पडण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हल्लीच्या जगात बरेचजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले पण यातील एक तरी पूर्णपणे सुखी झाला का? बहुतांशी सर्वांना कोणत्या तरी चिंतेने, निराशेने ग्रासलेले आहे. आपण जर दुसर्या एखाद्याच्या परिस्थितीशी स्वतःशी तुलना करून जर निराश होत असाल तर नीट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीच्या निराशा तुम्हाला माहीत नाहीयेत. योग्य मार्गाने निराशेवर मात करा आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघा, चांगल्या गोष्टींचे महत्व त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर कळल्या अशी वेळ येवून देवू नका!