Tuesday, July 31, 2012

I MISS YOU पांगारा!



लहानपणची गोष्ट! वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे? बाकी वसईत ह्या झाडांची संख्या मग झपाट्याने कमी होत गेली. रमेदी ते पारनाका ह्या रस्त्यांवरील वेगाने कमी झालेल्या जुन्या वाड्यान प्रमाणे!  आज अचानक ह्या पांगार्याची आठवण आली. नेटवर मिळालेला हा एक पांगार्याचा फोटो!

Friday, July 27, 2012

बदलांचा मागोवा!


असे म्हणतात की सद्ययुगात एकच गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे बदल! खाजगी क्षेत्रातील यशस्वी कंपन्या हे सत्य ओळखून आहेत आणि जगातील संभाव्य बदलांचा मागोवा घेत त्यानुसार भविष्यकाळातील धोरणे आखण्यासाठी ह्या कंपन्यांनी सल्लागार लोकांची नेमणूक केली असते. ज्या कंपन्यामध्ये अशा पदांवर योग्य व्यक्ती असतात त्याच कंपन्या कालौघात टिकून राहतात. परंतु बाकीच्या क्षेत्रांचे काय? स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला. त्याचबरोबर छुप्या रूपाने काही गोष्टी घडल्या. ज्या विशिष्ट वर्गाने आधी बराच काळ भारतीय सामाजिक जीवनावर आधिपत्य गाजविले त्या समाजाला राजकारणापासून पद्धतशीररित्या दूर ठेवले गेले. त्यामुळे भारतीय समाज त्या वर्गातील अंगजात असलेल्या नेतृत्वगुणाला मुकला. स्वातंत्र्यकाळापासून आजवर भारताने प्रगती तर केली परंतु नक्कीच आजचे चित्र पाहता आपणास आशादायक भविष्यकाळ दिसत नाही. खाजगी क्षेत्र असो की राजकारण असो, एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडील प्रगतीसाठी 'तिथे पाहिजे जातीचे' म्हणजेच त्या कामासाठी योग्य व्यक्तीच हवी ही उक्ती सार्थ ठरते. आपल्या देशातील लोकशाही पद्धतीच्या संरचनेमुळे लोकानुनय करण्याऱ्या धोरणांचाच स्वीकार केला जातो. प्रादेशिक पक्षांचे वाढलेले सामर्थ्य देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अश्या धोरणांच्या आड येते. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या भारतात तयार होणारे अभियान्त्रिक पदवीधर. पुढील २० वर्षात भारताला आणि जगाला किती अभियान्त्रिक पदवीधरांची गरज आहे आणि एकंदरीत उद्योगधंद्यांची वाढ कोणत्या दिशेने होणार आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा पूर्ण अभाव सध्याच्या राजकीय नेतृत्वात दिसतो. साधारणतः १५ वर्षापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली. त्यासाठी आपण तयार नव्हतो. मग काय झाले तर बाकीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील लोक त्या क्षेत्रात शिरले. प्राथमिक पातळीवरील कामे करण्यासाठी हे ठीक होते परंतु नवीन product निर्माण करणे अशा विकसित स्वरूपांच्या कामासाठी आपण तयार नव्हतो. आजची स्थिती काय आहे तर आपण फक्त माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते निर्माण करण्यावर लक्ष देत आहोत. अभियांत्रिकीच्या मुलभूत शाखांमध्ये (स्थापत्य, विद्दुत, mechanical ) भविष्यातील गरज काय आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा / किंवा ह्या दूरदृष्टीच्या क्षमतेचा पूर्ण अभाव आपल्या राज्यकर्त्यांकडे दिसतो. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते की खाजगी क्षेत्रात ह्या सर्व प्रश्नांचा दूरगामी विचार करू शकणारे अनेक व्यवस्थापक आहेत. परंतु सद्य राजकीय प्रणाली अशा सक्षम लोकांना भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी समाविष्ट करून घेत नाही. काही अपवाद आहेत जसे की नंदन निलकेणी यांचा UIDAI प्रकल्पातील समावेश! परंतु लालफितीचा मुकाबला करण्यात त्यांची अर्धी शक्ती वाया जात असल्याचे जाणवते.

जाता जाता हेच म्हणावेसे वाटते, भारताचे सध्याचे यश दोन घटकांमुळे आहे एक खाजगी क्षेत्रातील सक्षम नेतृत्व आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून जीवनातील असंख्य अडचणींचा शांतपणे मुकाबला करणारा मध्यमवर्ग. परंतु आपल्या देशाची ही एक उत्तम स्थिती आपण राजकीय क्षेत्रातील दूरदृष्टीच्या अभावामुळे वाया घालवीत आहोत हीच खंत. ह्या राजकीय प्रणालीत बदल कोण आणि कसे आणणार हाच खरा प्रश्न आहे.
 

Tuesday, July 24, 2012

रिकामी न्हावी...



मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या की शहरातील पालक धास्तावतात! पूर्वीसारखा नातेवाईक, शेजारी असणारा समवयस्क मुलांचा घोळका हल्ली कमी होत चालला आहे आणि त्यामुळे मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी पालकांना उद्योग शोधावे लागतात. हे झाले एकदम प्राथमिक उदाहरण, पण ह्या प्रश्नाची प्रगतावास्थेतील उदाहरणे अनेक, सतत कामात गुंतून राहणाऱ्या नोकरपेशा किंवा व्यावसायिक माणसाला अचानक मोकळी अशी साप्ताहिक सुट्टी मिळाली किंवा त्याने / तिने एका आठवड्याची सुट्टी टाकली तर ही व्यक्ती घरी शांतपणे बसू शकत नाही. व्यावसायिक स्त्रियांना बाळंतपणानंतरची अल्पमुदतीची किंवा कायमची सुट्टी, नवऱ्याच्या नोकरीनिम्मित परदेशी / परगावी स्थायिक व्हावे लागल्यामुळे सुटलेली नोकरी ही अजून काही उदाहरणे. माणसाची नोकरी गेली किंवा माणूस निवृत्त झाला तरी हा प्रश्न उद्भवतो.

कधीतरी वाचले होते की माणसाचे अर्धे प्रश्न त्याच्या एका खोलीत शांतपणे बसू शकण्याचा क्षमतेच्या अभावामुळे निर्माण होतात. हे विधान बऱ्याच प्रमाणात मला पटले. आता हा प्रश्न गावापेक्षा शहरात अधिक उग्र स्वरूप निर्माण करतो. अमेरिकेतील कुटुंब फोन न करता अगदी जवळच्या मित्राच्या घरी देखील जाणार नाहीत. मुंबईत फोन न करता घरी जाण्याचा हक्क आपण काही मोजक्या कुटुंबात गाजवू शकतो. वसईत मात्र आपण बहुतांशी सर्वांच्या घरी हा हक्क बजावू शकतो. समजा एखादे आई, बाबा आणि मुल असे छोटे कुटुंब आहे तर हे कुटुंब रविवारी संध्याकाळी काही न करता दूरदर्शन न लावता, संगणक सुरु न करता किती वेळ घरात सुसंवाद साधू शकते हा ह्या कुटुंबातील सुसंवाद किती आहे याचा मापदंड असू शकतो.

माणसाला समाजाशी संवादाची गरज का भासते? आपल्याला समाजाने स्वीकारले आहे ह्या जाणीवेवर माणसाला वेळोवेळी शिक्कामोर्तब हवे असते. हे शिक्कामोर्तब किती प्रमाणात हवे आणि त्याची वारंवारता किती असावी हे व्यक्तीनुसार बदलते. निवृत्त माणसांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ह्यातील काही नशीबवान माणसे सामाजिक संस्थावर एखादे मानाचे स्थान मिळवून वर्षोनवर्षे बसून राहतात. आणि आपल्या अनुभवाचा समाजाला उपयोग करून देतात! पण एक क्षण असा येतो की ज्या क्षणी ह्या पदावरील ह्या व्यक्तीचे अस्तित्व ही समाजापेक्षा त्या व्यक्तींची गरज बनते. एकंदरीत हा आपण भारतीयांचा सामाजिक आणि राजकीय जीवनातील प्रश्नच आहे ना! तरुणपणीच्या उमेदीच्या वर्षात आपल्याला कधी संधीच मिळत नाही मग ते सामाजिक जीवन असो की राजकीय जीवन. ८० व्या वर्षी राष्ट्रपती झालेल्या प्रणावदांचे अभिनंदन!

माणसाला मोकळा वेळ घरी शांतपणे घालविता येत नाही ह्या गृहितकावर अनेक उद्योगधंदे सध्या निर्माण झाले आहेत. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ओसंडून वाहणारे मॉल, मे महिन्यात पालकांचा खिसा रिकामी करणारे तथाकथित ज्ञानी लोकांनी चालविले सुट्टीतील वर्ग ही त्याची उदाहरणे होत. अरेच्या हा ब्लोग पण त्याचे उदाहरण नव्हे ना :)

Sunday, July 22, 2012

हल्लाबोल


मागच्या सायकल शर्यतीच्या लेखात एक मुद्दा मांडायचा राहून गेला. आघाडीचा जथ्था बरेच अंतर एकत्र जात असतो. अंतिम रेषेला २-३ किमी अंतर बाकी असताना त्यातला एखादा स्पर्धक अचानक ह्या समूहातून पुढे निघतो, शेवटचा हल्ला चढवितो. ह्या क्षणाच्या निवडीमागे मोठे गणित असते. ह्या क्षणानंतर असतं ते अंतिम युद्ध! आपण हा शेवटचा निकराचा प्रयत्न किती काळ टिकवू शकतो, शेवटचा मार्ग कसा आहे, आपली आणि प्रतिस्पर्ध्याची शक्तिस्थाने, कमकुवत दुवे कोणते ह्या सर्वच अभ्यास करून ह्या क्षणाची निवड केली जाते. हा हल्लाबोल चढविणारा स्पर्धक नेहमीच शर्यत जिंकतो असे नाही, पण तरीदेखील प्रत्येक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत असा एक स्पर्धक असावाच लागतो. इथले उदाहरण शर्यतीचे, पण तसेच लागू पडते ते स्पर्धात्मक व्यवसायात, युद्धात असे क्षण येतातच!

परवा ओवल सामन्यात शतक पूर्ण केल्यावर ग्राहम स्मिथ म्हणाला की पहिल्या दिवसानंतर इंग्लंडने सामन्यावर बर्यापैकी पकड बसविली होती. बहुतांशी कसोटी सामने ह्या स्थितीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतात. परंतु दक्षिण आफ्रिकेने दुसर्या दिवसानंतर सामना फिरवला. इंग्लंडला झटपट गुंडाळून धावांचा डोंगर उभा केला. इथे मुद्दा येतो तो मनसामर्थ्याचा, ज्याचे मनोबल जास्त तो आपल्या जवळील साधनांचा, आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतो आणि यशस्वी बनतो. बारावीला असताना रुपारेल होस्टेलला राहिलो. तिथेही काहीसा असाच प्रकार अनुभवायला मिळाला होता. तिथे बारावीच्या मजल्यावर राहणारे सर्वजण एकदम हुशार, योग्य पात्रतेचे. दहावीपर्यंत अतिशय चमकलेले. फरक इतकाच की बारावीत पालकांचे संरक्षक कवच वसतिगृहात २४ तास उपलब्ध नव्हते, आपल्याहून अधिक क्षमतेची मुले आपल्या डोळ्यासमोर होती. आपल्यातील काही कच्चे दुवे प्रथमच स्वतःला कळत होते. मग १२ वीच्या निकालानंतर दोन वर्ग समोर आले. काही जणांनी ह्या सर्व घटकांना तोंड देत दैदिप्यमान यश मिळविले आणि काहीजण मात्र आपल्या क्षमतेइतके यश मिळवू शकले नाहीत.

अजून एक महत्वाची बाब डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचे झटपट विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता. तुमची परिस्थिती कितीही बिकट असो, त्या परिस्थितीतही तुमच्यासमोर एखादा उत्तम मार्ग उपलब्ध असतो. तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.

Saturday, July 21, 2012

टूर द फ्रांस, ऑलिम्पिक, रसिकता वगैरे वगैरे


मागच्या ब्लोगमध्ये ज्ञानी लोकांच्या लिखाणाविषयी म्हटले होते. ह्या लोकांचा त्या विषयातील व्यासंग दांडगा असतो. सद्यकालीन आणि माझ्या मर्यादित वाचनात आलेला असा ज्ञानी लेखक म्हणजे डॉ. गिरीश कुबेर! लोकसत्तेत शनिवारी ते सुंदर लेख लिहितात.
पहिला लेख होता कर्ता आणि करविता ह्या विषयावर! करविता ह्या वर्गातील लोक मुळच्या आर्थिक भांडवलाला कृत्रिम फुगवटा आणण्याची कामे करतात, ही फुगी खरी असल्याचा आभास निर्माण करण्याची किमया हे करविते करतात. असाच हा कृत्रिमरीत्या वाढविलेला फुगा केव्हातरी फुटतो आणि ह्या फुगवट्याच्या आधारावर केलेली सर्व गणिते कोलमडून पडतात. असा एकंदरीत ह्या लेखाचा मतितार्थ! आजचा दुसरा लेख होता विविध आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या उच्चपदस्थ अनिवासी भारतीयांविषयी! ह्या अशा उच्चपदस्थ घोटाळ्यातील भारतीयांची संख्या वाढत चालल्याचे त्यांनी सोदाहरण पटवून दिले आहे.
सध्या टूर द फ्रांस ही जगप्रसिद्ध सायकल शर्यत चालू आहे. बरेच दिवस चालणारी ही सायकल शर्यत, ज्या प्रमाणे स्पर्धकांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहते त्याचप्रमाणे स्पर्धकाच्या विविध गटांचे डावपेच पाहणे सुद्धा आनंददायी अनुभव असतो. मी जेव्हा संधी मिळते तेव्हा ही शर्यत पाहतो त्याचे मुख्य कारण फ्रान्सच्या नयनरम्य गावांचे घडणारे मनोहर दर्शन! ह्या स्पर्धेतील गट कसे पाडले जातात आणि त्यांची गुणपद्धती कशी आहे ह्याचा मला अजिबात ठावठिकाणा नाही. नयनरम्य फ्रान्सच्या भागातून जाणारे हे सायकलस्वारांचे जथ्थे! एक आघाडीचा आणि बाकी सर्व पिछाडीचे! ह्या सायकलस्वारांचा वेग तसा बर्यापैकी, ताशी २५ किमी ते शेवटच्या टप्प्यात ४० किमीपर्यंत जात असावा. आघाडीच्या समूहातील सायकलस्वार बरेच अंतर एकत्र पार पाडतात, त्यांच्याबरोबर असतात त्या मोटारी, बाइक्स आणि हेलीकोप्तर. इतके अंतर पार पाडायचे असल्याने शक्ती राखून ठेवणे आवश्यक, जरा वेळ मान समोर ठेवून सायकल चालविल्यावर थोडा वेळ मान खाली आणून सायकल चालावावयाची, मध्येच बाजूच्या सहाय्य चमूकडून पाण्याची बाटली घेवून आपली तहान भागवायची, हे सर्व करता करता आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवायची ह्या सर्व गोष्टी हे स्पर्धक साधत असतात. त्यांचे हे सर्व डावपेच पाहणे मजेशीर असते. ही शर्यत जेव्हा एखाद्या गावातून जाते त्यावेळी तेथील ग्रामस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपण्याजोगा! अगदी पूर्वी बलिप्रतिपदेला वसईला होणार्या सायकल शर्यतीतील स्पर्धक रमेदिहून गेले की मला होणार्या आनंदासारखा!
पुढील आठवड्यात ऑलिम्पिक चालू होईल. माझी सर्वांना कळकळीची विनंती! सर्व मालिका, इंटरनेट सर्व काही बाजूला सोडा आणि ऑलिम्पिक पहा. देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणर्या खेळाडूंचा यज्ञ पाहण्यासारखा आनंद नाही! लयबद्ध जलतरण स्पर्धा, मेराथोन स्पर्धा, नेमबाजी स्पर्धा, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या / पोहण्याच्या स्पर्धा - मनुष्याच्या शरीराच्या / मनाच्या एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या ह्या विविध स्पर्धा एकत्र पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही! हा आनंद लुटताना आयोजकांच्या अथक परिश्रमाला दाद द्यायला विसरू नका!
लेखाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्यात एकच समान सूत्र. जीवनातील झटपट आनंदाच्या / सुखाच्या मागे लागलेलो आपण बहुतांशी भारतीय. आणि छोट्या छोट्या सुंदर गोष्टीतून जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटणारे प्रगत देशातील खेळाडू, क्रीडा आणि कलारसिक! आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचे आपले स्वप्न साकार करता करता आपली रसिकता जोपासण्याचे थोडेसे प्रयत्न आपण करून बघुयात का?

Sunday, July 8, 2012

नवलेखकाचे मनोगत!


लेखक बनण्यासाठी मुलभूत गुणधर्म कोणते? ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास विविध बाबी नजरेसमोर येतात.
  1. आपल्या संभाव्य वाचकवर्गाची माहिती, त्या वाचकवर्गाला आवडेल अशा विषयांची निवड, त्या वाचकवर्गाला आवडेल / समजेल अशी लिखाण शैली
  2. ज्या विषयात लिहायचे त्या विषयातील ज्ञान. (लिखाणाचे विषय अनेक; प्रवासवर्णन, ऐतिहासिक विषयांवरील लेखन, तात्कालिक घटनांवरील भाष्य, आत्मचरित्र, व्यक्तीचरित्र, सामाजिक समस्यांवरील लेखन, कथा (दीर्घकथा, लघुकथा). यादी अशी लांबतच जाईल.
  3. वाचक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी एक तर आपल्या लिखाणाने त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे किंवा आपल्या विनोदी लिखाणाने त्यांना खिळवून ठेवता आलं पाहिजे.
जसजसा समाज प्रगत होत जातो तसतस लोक लिहू लागतात. वरील बाबींपैकी सुरुवातीला एकही बाब ह्या नवलेखकांमध्ये उपस्थित नसते, परंतु ह्या नवलेखकांची चिकाटी आणि उत्साह दांडगा असतो. ई-मेल ने धुमाकूळ घालण्याआधी भारतीय टपालखाते चालविले ते ह्या नवलेखाकानीच. आपले लेख सर्व वर्तमानपत्रे, मासिके यांना पाठविणे, आपल्या सर्व मित्रवर्गात, नातेवाईकांमध्ये आपल्या लेखांची चर्चा मुद्दामच उपस्थित करणे ह्यात ह्या नवलेखकांचा हात कोणीच धरू शकत नाही. ई-मेल / इंटरनेट आल्यावर तर या नवलेखकांचे काम सोपे झाले. ह्यांनी ब्लॉग लिहिले, लोकांचे मेल बॉक्स भरून टाकले. आता वरती म्हटल्याप्रमाणे बर्याच नवलेखकांकडे एखाद्या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्याच्या मुलभूत गुणधर्माचा अभाव असल्याने ते तात्कालिक विषयांकडे,ढासळणार्या सामाजिक मूल्यांविषयी लिहितात. मराठी समाजाने लिखाणात आणि चर्चेत जो वेळ घालविला त्याच्या १० टक्के वेळ जरी त्या समाजाने प्रत्यक्ष कृतीत घालविला असता तर त्या समाजाची स्थिती बरीच वेगळी असती. दुर्देवाने नवलेखक ही गोष्ट विसरतात. हे नवलेखक प्रतिक्रियेचे आणि स्तुतीचे भुकेलेले असतात. त्यांना मिळालेली एक प्रतिक्रिया पुढील दहा लेखांना जन्म देते!
अशाच एका नवलेखकांच्या जबरदस्तीने बनविलेल्या वाचकवर्गा, माझा तुला सलाम!

Saturday, June 23, 2012

विवाह संस्था !





२३ जूनच्या चतुरंग पुरवणीत दोन लेख वाचले, एक 'एकाकी नसलेले एकटेपण' आणि दुसरा 'विवाह संस्थेतील ढोंग!' व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर दोन्ही लेखातील मुद्दे योग्य! आयुष्यात एकटेपण बर्याच जणांना अनुभवावे लागते. काहींनी ते ठरवून स्वीकारले असते तर काहींना परिस्थिती ते स्वीकारण्यास भाग पाडते. पूर्वी एकटेपण म्हटले की मनुष्य दुःखी असणार असेच अभिप्रेत असायचे. परंतु आजच्या काळात एकाकी असूनसुद्धा आनंदी असलेले बरेचजण आहेत असा पहिल्या लेखाचा सारांश. दुसर्या लेखात एकंदरीत विवाहसंस्थेची चिरफाड केलेली! आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधात अजूनही बहुतांशी स्त्रिया नवर्यांचा दांभिकपणा कसा सहन करतात यावर या लेखाचा भर. दोन्ही लेख स्त्रियांनी लिहलेले. अतिशय संतुलित विचारसरणीने लिहिलेले. आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही लेखातील विचार एकदम योग्य.
दोन्ही लेखात सध्याच्या जगात प्रकर्षाने जाणवणारे एक समान सूत्र आढळते. ते म्हणजे आजच्या पिढीत वाढलेली स्वत्वाची भावना. हा जो स्व असतो तो सदैव स्वतःसाठी अनुकूल वातावरण शोधत असतो. हवी ती शाळा, हवे तसे घर, हवी ती नोकरी, हवे तसे मित्र अशी ह्या स्व ची मानसिकता असते. ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही पटले तर त्वरित दुसरा पर्याय शोधला जातो. तसेच जीवन साथीदाराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. म्हणून काही जण लग्नाचा मार्ग स्वीकारायचे नाकारतात तर काही जण लग्नानंतर हा मार्ग तत्काळ बदलायचे धाडसही दाखवू शकतात. आपल्या भारतातील किंवा जगभरातील ज्या काही विवाहसंस्था आजच्या काळापर्यंत टिकल्या त्यासाठी व्यक्तिगत त्यागाचा मोठा हातभार लागला. प्रेमविवाह असो की जमविलेले लग्न असो, लग्नानंतर संसार करताना दोघा साथीदारांचे सूर सदोदित जुळणे हे बरेचसे कठीण. परंतु ह्या प्रवासात जेव्हा कधी हे सूर जुळतात तेव्हा त्या क्षणाच्या जोरावर बाकीचे मतभेद पचविण्याची प्रगल्भता दोघांकडे हवी. नाहीतर न पटणार्या गोष्टींचाच सदैव विचार केल्यास उरतो तो केवळ दोन समांतर रेषांचा प्रवास.
इथे आपण आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. त्यांनी विवाहसंस्थेच्या दुषपरिणामांविषयी विचार केला नसावा असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच माहित असणार की तत्कालीन विवाहपद्धतीत (त्यातही एकत्र कुटुंबपद्धतीत) कोणत्या तरी एका बाजूची (९९.९९ टक्के स्त्रियांची) परवड होणारच! त्यांनी त्यांच्यासमोरील दोन पर्यायांचा विचार केला असावा. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! त्यावेळी त्यांनी दुसर्या पर्यायाचा स्वीकार केला. हे हस्तांतरण योग्यरित्या व्हावे यासाठी त्यांना कुटुंबसंस्थेची गरज भासली. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले असावे की या कामासाठी स्त्रियांचा त्यावेळचा स्वभाव योग्य! म्हणून त्यांनी विविध रीतीभाती निर्माण करून स्त्रियांना त्यात समाविष्ट करून घेतले. खरोखर परखड परीक्षण केले तर असे जाणविते की भारतीय संस्कृतीने, समाजाने स्त्रियांची मेंदूधुलाई केली. स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते अशी भव्य दिव्य विधाने करून त्यानी स्त्रियांना भावनिक पाशात अडकविले. संसार टिकले ते स्त्रियांच्या अपत्यप्रेमापोटी, पतीप्रेमापायी नव्हेत!
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर दोन पर्याय आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! बदलत्या काळानुसार ह्या दोन पर्यायांतील कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण त्यातील एक पर्यायच आहे मुळी व्यक्तिस्वातंत्र्याचा! हा स्वीकारताना आपण समाज म्हणून काय गमावतो आहे हा प्रश्न फक्त एकदा स्वतःला विचारून पहावा! विवाह संस्था पूर्णपणे नष्ट होणे सुद्धा कोणालाही आवडणार नाही. आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधापायी, अपत्यप्रेमापोटी, किंवा विवाह संस्थेचा पूर्ण लोप होवून न देण्यासाठी माझा वैयक्तिक हातभार असावा ह्या भावनेपायी बरेचसे विवाह टिकून राहणार. राहिली गोष्ट आदर्श संसाराच्या शोधाची. मृगजळाच्या शोधाप्रमाणे त्याचा शोधही चालूच राहणार.

Friday, June 1, 2012

रानात सांग कानात आपुले नाते



FM रेडिओवर रेनबो वाहिनीवर सकाळी ५ वाजल्यापासून बऱ्याचदा अतिशय सुंदर मराठी गाणी ऐकवली जातात. काही माहितीतली तर काही प्रथमच ऐकली जाणारी! पण काही गाणी मात्र अशी असतात की आपण ती पहिल्यांदा ऐकताना सुद्धा त्यांच्या प्रेमात पडतो. असेच एक गाणे रानात सांग कानात आपुले नाते. हे गाणे तत्कालीन प्रसिद्ध गाणे असावे. ह्या गाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या. इथे हे संपूर्ण गीत लिखित स्वरुपात आणि गजानन वाटवे यांच्या स्वरातही उपलब्ध आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ranat_Sang_कानात

आता प्रेमिक फार पूर्वीपासून प्रेमात पडतात. प्रेमात पडताना दोन भाग असावेत. एक म्हणजे प्रियकर / प्रेयसी आवडणे, आणि दुसरा म्हणजे प्रेमभावनेचा! ही प्रेम भावनाच अतिशय कोमल, सुखकारक असावी. ह्या गीतात ही सुंदर भावना निसर्गातील सुंदर, प्रसन्न गोष्टींच्या मदतीने कशी सुंदर फुलवली आहे पहा ना! सर्व काही कसे सूचक! पहाटेच्या रमणीय अशा निसर्गात कवीने फुलविलेली सुंदर प्रेमभावना आणि नादमय शब्दांचे जुळलेले यमक! आता ह्या गीतात प्रियकर / प्रेयसीला दुय्यम स्थान मिळाले म्हणून खंत करणारा तो खरा अरसिक!
आता ही प्रेम करायची लाजरी रीत पहा ना! आधीच जायचे रानात जिथं कोणी नसणार आणि तरी तिथे सुद्धा कानातच आपलं नाते सांगायचं आणि ते सुद्धा भल्या पहाटे ! आपल हे गुपित कोणाला कळू नये यासाठी किती ही प्रयत्नांची पराकाष्टा!
हे गाणे गजानन वाटवे आणि रंजना जोगळेकर ह्या दोघांच्याही सुमधुर स्वरात गायले गेले आहे. ह्या आठवड्यात एके दिवशी सकाळी हे गाणे ऐकताना इतके प्रसन्न वाटले! आता ह्या गाण्यातील काही मराठी शब्दांचा अर्थ समजला नाही ही खंत करण्याची गोष्ट! असेच कित्येक मराठी शब्द कसे न वापरत असल्याने दैनंदिन व्यवहारातून गायब होत असावेत! असो आपल्याला देखील ह्या गाण्याचा आनंद लुटता यावा करिता ग दि माडगुळकरांचे हे गीत मी इथे उदधृत करीत आहे!

रानात सांग कानात आपुले नाते
मी भल्या पहाटे येते
पाण्यात निळ्या गाण्यांत भावना हलते
हळुहळु कमलिनी फुलते

आभाळ जगाचे भाळ मळवटी नटते
उगवतीस हासू फुटते
ज्या क्षणी विरहि पक्षिणी सख्याला मिळते

हरभरा जिथे ये भरा शाळु सळसळते
वाऱ्यात शीळ भिरभिरते,
त्या तिथे तुला सांगते, हरळिणी देते
बोलावुन तुजसी घेते, हा घेते, हा घेते

आनंद पुढे पाणंद, सभोवती शेते
पूर्वेस बिंब तो फुटते, हा फुटते, हा फुटते
त्या तिथं तुला सांगते, हरळिणी देते
बोलावुन तुजसी घेते, हा घेते, मी घेते

Wednesday, May 30, 2012

जगी सर्व सुखी असा कोण आहे?


समुद्राच्या लाटांचा किनार्यावरील खेळ बघणे हा सर्वांचा एक आवडता छंद. ही लाट येते आणि आपल्या मार्गावरील सपाट शांत अशा वाळूला उधळून लावते. वाळूचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकते. पण ह्या लाटेच्या मर्यादा असतात. त्यापलीकडील वाळू मात्र आपले जीवन शांतपणे जगत असते. असेच काही आपल्या जीवनशैलीतील बदलाबाबत होत असते. हे बदल प्रथम महानगरात पोहचतात. त्यानंतर ही लाट आजूबाजूच्या नगरांना आणि मोठ्या खेड्यांना व्यापून टाकते. त्यापलीकडील छोटी खेडी मात्र आपले जीवन पूर्वीप्रमाणेच जगत राहतात. तथाकथित विकसित भागातील लोकांची नजर मग ह्या दुर्गम भागाकडे पोहचते. ह्या दुर्गम भागातील लोक कसे अप्रगत, अशिक्षित आहेत आणि त्याना कशी विकासाची गरज आहे यावर चर्चा झडतात. बर्याच वेळा ह्या चर्चा पंचतारांकित हॉटेलात होतात ही गोष्ट वेगळी!

असो जोपर्यंत ह्या चर्चा अप्रगत / अशिक्षित ह्या मुद्द्याभोवती घोटाळत राहतात तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी कोणी एखादा महाभाग हे लोक कसे सुखापासून वंचित आहेत असे विधान करतो त्यावेळी मात्र मी विचार करू लागतो. आपली सुखाची व्याख्या काय? प्रत्येक माणसागणिक ही व्याख्या बदलणार, काही जनांनी स्वतःसाठी सुख म्हणजे काय याची व्याख्या ठरविली देखील नसणार. काही लोकांना आपण आयुष्यात कधी सुखी होवू किंवा नाही याची शास्वती देखील नसणार.

आता आपण सुखाचा उहापोह करूयात. काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्याशिवाय सर्वसाधारण माणसे सुखी होत नाहीत परंतु त्या गोष्टींचे अस्तित्व माणसास सुखी बनविण्यास पुरेसे नसते. ह्या गोष्टींमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. सर्वसाधारण माणसे ह्या गोष्टींशिवाय सुखी होवू शकत नाहीत. ह्याला अपवाद असतातच जी ह्या मुलभूत गरजाशिवाय सुखी राहू शकतात. असो परत आपण सर्वसाधारण माणसांकडे वळूयात. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक स्थितीत मुलभूत गरजांची चिकित्सा करण्याची पद्धत नव्हती. पण माणसाला देवाने बुद्धी दिली त्यामुळे ह्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये देखील माणसाने वैविध्य, विविध पातळ्या शोधल्या. ह्या वैविधतेचे दोन पैलू असतात; प्रथम म्हणजे तो मनुष्य खरोखर चोखंदळ असतो आणि दुसरे म्हणजे मनुष्यास आपणच दुसर्यापेक्षा कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची उर्मी असते. आता पहिल्या प्रकारात माणसास समाधान मिळू शकते परंतु दुसर्या प्रकारात असतो तो केवळ आसुरी आनंद!
मुलभूत गरजांच्या पलीकडे बघितले तर मग येतात ते वाहनांचे, आभूषणांचे छंद आणि नाद. यात देखील वरती उल्लेख केल्याप्रमाणे दोन पैलू येतातच. त्यानंतर येतात ते माणसाचे छंद! कला, क्रीडा, वाचन, भटकंती ह्याला वाहून घेतलेली छंदिष्ट माणसे काही कमी नव्हेत. अशा माणसांना त्यांच्या छंदात असीम आनंद नक्कीच मिळतो पण ते सुखी असतात का? कधीतरी त्यांच्या जीवनात लौकिकार्थाने सुखी होण्यात काहीतरी कमतरता असू शकते.

ह्यापलीकडे जावून बघितले तर मग येतात ती माणसाची नाती. माता, पिता, पती, पत्नी, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी इथून सुरु होणारी ही नाती आपणास सुखसमाधान देतात तसेच कधीतरी दुःखही ! ही नाती असतात मात्र फार क्लिष्ट आणि गुंतागुंतीची! माणूस नात्यांमध्ये किती यशस्वी आहे यावर त्याचे सुख काही प्रमाणात अवलंबून असते. तसेच माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात ते त्याचे मित्र. हे मित्र त्याच्या सुख दुःखाच्या प्रसंगी हजर असतात. काही बाह्य घटकसुद्धा माणसाच्या जीवनात तत्कालीन सुख / दुःख निर्माण करतात. यात आजारपण, यश, जन्म मृत्यू अशा घटनांचा समावेश होतो.

माणसाचे मन वरील उल्लेखलेल्या सर्व घटकांचे पृथ्थकरण करीत असते. त्यानुसार प्रत्येकजण स्वतःला तात्कालीन सुखी / दुःखी आणि दीर्घकालीन सुखी / दुःखी समजत असतो. माणसाचा स्वभाव देखील यात महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीवरच आपण लक्ष केंद्रित केल्यास आपण कधीच सुखी होणार नाहीत. जसजशी माणसाचे क्षितीज उंचावत जाते तसतसे त्याला विश्वातील सुंदर , महागड्या वस्तूंचा परिचय होत जातो. ह्या वस्तूंच्या परिचयानंतर त्या वस्तूंची अभिलाषा निर्माण होते, किंवा त्या उच्चभ्रू वर्तुळात राहण्यासाठी ह्या वस्तूंची त्याला निकड भासते. अशा वस्तूंचा परिचय होऊन सुद्धा त्यापासून विरक्त राहणारा मनुष्य विरळाच! ह्या वस्तू मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षात माणसे बर्याच वेळा आपल्या प्रकृतीचा ऱ्हास करून घेतात.

सारांश म्हणजे सुखाची व्याख्या माणसागणिक बदलते. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वःतास माहित असावयास हवी. सुखाची ही व्याख्या निरपेक्ष असावी त्यात दुसर्या कोणाशी तुलना केलेली नसावी. त्याचबरोबर मला सुखी व्हायचे आहे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे! कारण सुखी होणे आणि लौकिकार्थाने यशस्वी होणे ह्या बर्याच वेळा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. ह्या लेखाचा शेवट संत तुकडोजी महाराजांच्या ह्या कवितेने!
 
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥

Sunday, May 27, 2012

शक्तिमान विरुद्ध बुद्धीजीवी

 

कधी मला प्रश्न पडतो की मनुष्यजातीने बनविलेल्या नियमांत कसकसे बदल होत गेले असतील आणि ते कसे विकसित होत गेले असतील. म्हणजे बघा ना प्रथम बळी तो कान पिळी असाच नियम असणार. असेच मानव सर्व स्त्रोतांवर अधिकार गाजवीत असतील. मग ते शिकार असो की जमीन असो. बाकीचे त्यांचा अधिकार मान्य करून, शक्तीमानाने आपला हक्क गाजविल्यावर उरलेसुरले जे काही मिळेल ते आपले भाग्य असे समजून जीवन कंठीत असतील. मग हळूहळू ह्या गांजलेल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला असेल. त्यांना कळून चुकले असेल की आपण बहुसंख्य आहोत आणि शक्तिमान अल्पसंख्य आहेत. तसेच शक्तीमानाला सुद्धा कळून चुकले असेल की अहोरात्र शक्तीच्या जोरावर सत्ता गाजविणे कठीण आहे. एक गाफील क्षण सुद्धा आपल्याला महागात पडू शकतो.

तत्कालीन शक्तीमानांकडे बुद्धी कमी असावी, त्यामुळे बहुसंख्य बुद्धीजीवांनी आपल्याला अनुकूल अशी नियमावली बनविण्यात पुढाकार घेतला असावा. ही सर्व नियमावली बनवून अमलात आणल्यावर शक्तीमानांना एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. परंतु आता उशीर झाला होता. बुद्धीजीवांनी पोलीस, न्यायालये अशी सुरक्षा कवचे बनविली होती आणि शक्तीमानांचे पंख झटून टाकले होते. काही काळ असाच गेला. शक्तीमानांना बळाचा वापर करायच्या कमी संधी मिळत गेल्या परंतु थोडा मोकळा वेळ मिळाला. कधी नव्हे तो त्यांनी विचार करायला सुरुवात केली. उघड स्वरूपात कायदा हाती घेणे शक्य नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले. मग त्यांनी शत्रू गटातील काही सीमारेषेवरील बुद्धीजीवांशी हातमिळवणी केली आणि कायद्यातील पळवाटा शोधून काढल्या. आता हे शक्तीमानांना कायद्याच्या कचाट्यात पकडणे कठीण जावू लागले. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा पवित्र राहिला नाही त्यातील बहुसंख्याने शक्तीमानांचे कायद्याशी उघड शत्रुत्व न पत्करता आपला स्वार्थ साधण्याचे धोरण स्वीकारले.

मनुष्यजातीत सदैव evolution होत राहिले आहे. शक्तिमान आणि बुद्धीजीविंचा संघर्ष चालूच आहे. सध्या म्हणायला गेले तर कायद्याचे राज्य आहे पण आतून शक्तीमानच राज्य गाजवितात. हीच वेळ आहे बुद्धीजीवींना मनन करण्याची आणि आपल्या डावपेचात बदल घडवून आणण्याची. पण बुद्धीजीवी वर्ग त्याच्या शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिलाच नसेल तर?
 

Saturday, May 19, 2012

उम्र का हिसाब

 

सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर न थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण विचार करीत होते. विचार जर दृश्य असते तर? त्या डब्यात विचारांचा झंझावात दिसला असता. आता माणस अश्यावेळी कोणता विचार करीत असतील? तात्कालिक समस्या माणसाच्या विचारांना ग्रासणारा प्राथमिक घटक असेल. मग पाच - दहा मिनटांनी माणसाचे मन असंच मागे जात असावं .
तेव्हाच मला उमराव जान मधील गाण्यातील ह्या ओळी अचानक आठवल्या.
ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है
तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
असेच काही निवांत क्षण मिळतात, आणि आपल्या गतआयुष्याचा हिशोब मांडायला प्रवृत्त करतात .



Monday, May 7, 2012

ग्यान, गलका, शिराळा, कसाब

 
एखा द्या देशाच्या परिस्थितीचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांच्या मनोस्थितीवर होत असतो. आता आपल्या भारताचेच पहा ना! सर्व प्रसिद्धीमाध्यमांच्या मते आपण प्रगतीच्या वाटेवर कूच करीत आहोत. हे वाचून आपला आत्मविश्वास बळावतो. माझेच उदाहरण घ्या. मी स्वतःला ज्ञानी (ग्यानी म्हटले तर अजून प्रभाव पडतो!) समजू लागतो. ब्लोग लिहून जबरदस्तीने लोकांच्या ई मेल वर पाठवतो. चार लोक जमले की फंडे देतो. पण ई-मेल वर ज्ञान देणे आणि प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देणे यात फरक असतो. ई-मेल वरील ज्ञान लोक त्यांची खरोखर इच्छा असेल तर वाचतात अथवा बर्याच वेळा ई-मेलचा नाश करतात. परंतु प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देताना आपण समोरच्या व्यक्तीचा वेळ घेत असतो. इतकेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर अनुकूल हावभाव आणले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते.
हल्लीचा जमाना मात्र बदलला आहे. फुकटात कोणी ऐकून घेत नाही. FM रेडिओवर उद्घोषक ३-४ मिनिटाच्या गाण्यानंतर १० मिनिटे वायफळ गडबड करतो. त्या वेळी आपण दुसरे स्टेशन लावतो. माझी प्रत्यक्षातील ज्ञानवाणी ऐकून घेणारे फार कमी लोक; बायको, मुलगा आणि कार्यालयातील टीम. कार्यालयातील टीम ही माझी ज्ञानवाणी ऐकण्यासाठी बांधील असते. त्या बैठकीच्या वेळी त्यांना मी बंधक बनवितो. तेथील माझ्या प्रवचनास ग्यान हा अधिक उचित शब्द आहे. ग्यान म्हणजे आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी वरच्या पदावरील माणसाने उधळलेली मुक्ताफळे!
घरी मात्र परिस्थिती वेगळी असते. लोकशाही भारताच्या कानाकोपर्यात, सर्व वयोगटात पसरली आहे याचा अनुभव मला येतो. बाबा, पुन्हा पुन्हा तेच काय सांगता, मला माहितेय असे का मुलगा बोलला की मी आवरते घेतो. बायकोकडे तर हजार उपाय. प्रवचन चालू असताना अचानक अरे आज भाजी आणावी लागेल, किंवा बिल भरावे लागेल असे लक्ष विचलित करणाऱ्या घोषणा ती करते. मात्र हल्ली सर्वजण सुज्ञ बनले आहेत. माझ्याकडून काही करून घ्यायचे असले की मात्र माझे प्रवचन ऐकून घेतले जाते.
आता आपण प्रवचन का देतो तर मुलाची जडणघडण (अर्थात formatting ) करण्यासाठी. बायको ही formatting च्या पलीकडे असते ही गोष्ट वेगळी. बायको ही आपले formatting करू शकते हे लक्षात असू द्यावे. ती ज्या नवऱ्यास लवकर कळली त्याचा संसार सुखाचा झाला. असो मुलाच्या जडणघडणीचे मार्ग कालौघात बदलले. पाठीवर धपाटा हा पूर्वीचा राजमान्य आणि सर्वात सोपा मार्ग. ह्याद्वारे मुलाला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. इथे चर्चेला वाव नाही, मी इथला अधिकारी व्यक्ती आहे आणि बरेच काही. काळ बदलला, चर्चा करून, मन वळवून निर्णय घेण्याचे, ज्ञान देण्याचे दिवस आले. परंतु कधी कधी ह्याच्याही पुढे जावून प्रत्यक्ष कृतीतून धडा द्यावा लागतो.
आयुष्यात सदैव काही मनासारखे होणारे नाही. सुखानंतर दुःख हे येणारच सगळ्याला तोंड देता यायला पाहिजे, असे ज्ञान आपण सर्व तासनतास देवू शकतो. परंतु आपण हे ज्ञान स्वयंपाकघरातून सुद्धा देवू शकतो. रविवारी ,सुग्रास जेवणावर ताव मारल्यावर सोमवार, मंगळवार मुलावर गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्यांचा मारा करावा. त्यात मीठ, मसाला कमी टाकावा. जर आपला मुलगा ह्या भाज्या खाऊ शकला तर तो जीवनात कोठेही समाधानाने राहू शकेल. आता बघा मुलाला ह्या भाज्यांच्या महत्त्वाविषयी ग्यान देण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा, त्यातून एक पुढे आयुष्यात कामास येणारा महत्वाचा उपदेश मुलास मिळतो. वरिष्ठ पदावरील व्यक्ती न बोलता सुद्धा कृतीतून आपली वाट लावू शकतो. गलका, शिराळ्याच्या भाजीतून असा काही उपदेश देता येऊ शकतो हे ज्यावेळी मला जाणवले त्यावेळी मी एकदम धन्य झालो. बाकी ह्या भाज्या घेवून ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेल्यास एकच गलका होतो ही गोष्ट वेगळी!
कसाबला भारत देशाचे सर्व नागरिक पोसतात. मला खूप संताप येतो. असाच एकदा मी संतापलो होतो पण मग एक विचार डोक्यात आला. मृत्यूचे भय तर दहशतवाद्यांना नसणारच, पण तुरुंगात खिचपत पडण्याचा विचार त्यांना झेपत असेल का? मानसिक स्थिती झपाट्याने बिघडू शकते. आपले अधिकारी मुद्दाम तर त्याला जिवंत ठेवत नसावेत ना? असो.. तुरुंगात कसाबला गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्या देवून त्याचे फोटो पेपरात छापले तर?


 

Friday, April 20, 2012

Level1, Level2...

 


गेल्या महिन्याभरातील या काही घटना! म्हणायला गेलं तर असंबंधित पण अचानक त्यात काहीतरी समान सूत्र असल्याची जाणीव झाली.
  1. महाबळेश्वरला जाताना वाईपर्यंतचा सपाट भूभागावरील प्रवास आणि मग माथ्यावर घेवून जाणारा चढणीचा, वळणावळणाचा रस्ता.
  2. कंपनीने एका शैक्षणिक सत्राला पाठविले. विषय होता नेतृत्वमार्गातील विविध टप्पे आणि त्यातील वळणे
  3. गेल्या आठवड्यात काहीश्या चिंतीत स्वरात पत्नी म्हणाली, हल्ली सोहम कसा बदललाय, शाळेतून आल्याआल्या न सांगता अभ्यासाला बसला आणि रात्री शेवटी त्याला सांगावे लागले की बस झाले आता, राहिला असेल तर उद्या पूर्ण कर. सोहमचा अल्लडपणा संपण्याची प्रक्रिया सुरु झाली की काय हे तिच्या चिंतेचे मुख्य कारण होते.
अजून थोडा मागे गेलो. सोहमला संगणकीय खेळांनी झपाटून टाकले होते. Level1, Level2 ची संकल्पना त्याला भारी आवडली, संगणकावरून जबरदस्तीने उठवल्यावर गडी खेळण्यातील गाड्या घेवून शर्यतीचा रस्ता बनवे आणि मग त्यात अडथळ्याचे प्रमाण वाढवीत नेत त्याचे level1 , level2 चे पुराण पुन्हा चालू होई.
आयुष्याचा प्रवासही काहीसा असाच. कधी सपाट भूप्रदेशावरील प्रवासासारखा, एका दिशेतील, न चढणीचा, एका वेगाचा, तर कधी शिखरमाथ्यावर घेवून जाणार्या चढणीच्या रस्त्याप्रमाणे वळणावळणाचा! ह्या प्रवासात येतात ते मैलाचे दगड. शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, अभियांत्रिकी शाखेची निवड, नोकरीसाठी योग्य अशा क्षेत्राची निवड, व्यावसायिक जीवनातील विविध टप्पे, जीवनसाथीची निवड ही काही महत्वाच्या टप्प्यांची उदाहरणे. आता ह्या प्रत्येक milestone बरोबर आपली जीवनातील भूमिका आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदार्या बदलत जातात. Level बदलते.
आता त्या शैक्षणिक सत्रातील महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तिथे नेतृत्वामार्गातील विविध स्थितींची ओळख करून देण्यात आली होती. एका स्थितीतून दुसर्या स्थितीत होणारे संक्रमण हे एक वळण घेवून येत. ह्या वळणानंतर जबाबदार्यांची क्लिष्टता वाढते, त्यांचे स्वरूप बदलते. आता मुख्य आव्हान हे असते की, ह्या बदललेल्या जबाबदार्या नक्की काय हे बर्याच वेळा लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार ह्या जबाबदार्या आणि त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा पुर्या करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी आपल्यात भिनलेल्या आधीच्या भूमिकेच्या मनोवृत्तीला झटकून टाकायचा प्रयत्न करतो. काही जण यशस्वी होतात तर काही जणांना हे जमत नाही. जितक्या उंच जावून तुम्ही कोसळाल तितक्या गंभीर स्वरूपाचे परिणाम भोगावे लागतात.
यातला एक मुद्दा माझ्या मनाला भिडला. आपल्यात भिनलेली आधीच्या भूमिकेतील मनोवृत्ती! हा मुद्दा किती योग्य आहे. ह्या मनोवृत्तीचा आवश्यक नसलेला भाग तुम्ही किती लवकर आणि केवढ्या प्रमाणात झटकून टाकू शकता ह्यावर तुमचे पुढील भूमिकेतील यश अवलंबून असते. आपल्या मुलाला तुम्ही शिशुवर्गात असताना जसं शिकविता त्या पद्धतीत आणि तो तिसरीत गेल्यावर शिकविण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. विशीमध्ये असताना न पटलेल्या गोष्टीविषयीची तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि तीशीमधील पद्धत आपसूक बदलते, कारण level बदलली असते. आपल्या पूर्वजांनी किती सोप्या पद्धतीने चार आश्रमांची व्याख्या ठरवल्या होत्या. एका प्रकारच्या level च होय. आज मात्र आपण किती level ठरवायच्या आणि त्यातल्या किती आणि कधी पार करायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Saturday, April 14, 2012

अवती भोवती


मध्यंतरी १४- १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या दोन बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. एक आत्महत्येविषयी आणि दुसरी या वयोगटातील मुलांनी अपहरण करून हत्या केलेल्या एका मुलाविषयी. संवेदनशील समाजाला अस्वस्थ करणाऱ्या ह्या बातम्या. त्या हल्ली आपणास अस्वस्थ करीत नाहीत त्याची कारणे वेगळी. माणूस / समाज जसजसा प्रगत होत जातो तसतसे आपल्याभोवती सुरक्षित कुंपणे घालून घेतो. ह्या कुंपणांची सीमा आर्थिक प्रगतीच्या प्रमाणाशी समप्रमाणात धावते. स्वतःच्या सदनिकेत अतिसुंदर सजावट करण्यापासून सुरुवात करून, स्वतःचा बंगला, बाग, कुंपण त्यानंतर अशा देखण्या बंगल्याचे संकुल असे टप्पे गाठत ही वृत्ती कधी कधी एखाद्या देशाच्या मनोवृत्तीत उतरते. जगात काहीही होवो पण माझ्या सुरक्षित कुंपणात जो पर्यंत काही होत नाही तो पर्यंत मला देणेघेणे नाही अशी ही वृत्ती. आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पायऱ्या ओलांडणारे आपण कधी ह्या मनोवृत्तीचे बळी बनतो हे आपणास कळत नाही.

विषयांतर बाजूला ठेवून मूळ मुद्द्याकडे आता वळतो. १४ - १५ वर्षांची मुले म्हणजे वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर अर्धा-अधिक प्रवास केलेली मनुषावस्था! वैचारिक परिपक्वता किती गाठली आहे हे मुलाच्या मुळच्या क्षमतेवर आणि त्याचावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्या अपत्याच्या मनात असणार सर्वात प्रभावी विचार ओळखण्याची इच्छा आणि क्षमता किती पालकांमध्ये असते हा महत्त्वाचा मुद्दा. समजा इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील तर हा जो विचार आपल्या अपत्याच्या मनात घोळत आहे तो योग्य आहे का आणि नसल्यास त्याला योग्य वळण देण्याची जाणीव पालकांनी दाखवली पाहिजे. आता ही इच्छा असण्यानसण्याची कारणे पालकांचे स्वतःचे बालपण कसे गेले, पालकांना त्यांच्या जीवनसंघर्षाने कितपत व्यापून टाकले आहे आणि पालकांचे परस्परांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून असू शकतात. क्षमतेमध्ये मुख्य मुद्दा येतो तो पालकांनी गाठलेल्या प्रगल्भतेचा! काही व्यक्तींमध्ये आपण आता पालक बनलो; आता आपल्या वागण्यात थोडाफार बदल करायला हवा हे समजण्याची प्रगल्भता कधीच येत नाही. ह्या वरील कारणांमुळे पालक आणि अपत्य ह्यांच्यातील संवाद कधी प्रगतावस्था गाठतच नाही. बदलेल्या काळामुळे एक गोष्ट झाली आहे. जर तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला नाही तर ती केव्हाच तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाहीत. हाच अनुभव कार्यालयात येतो, व्यवस्थापक आणि कर्मचारी ह्यांच्यातील नाते हे सुद्धा बदलत्या काळानुसार मित्रत्वाचे झाले तरच यशस्वी होवू शकते. पालक आणि अपत्य हा जर संवाद खुरटला तर मुले बाहेरील व्यक्तीशी आपले मन मोकळे करतात आणि ह्या बाहेरील व्यक्ती मग त्यांची मते प्रभावीत करू शकतात.

इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. पालकत्वाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या पालकांकडे मुलांच्या सुखी भविष्यासाठी दोन पर्याय असतात.

१> मुलांसाठी गडगंज संपत्ती निर्माण करून ठेवणे.

२> मुलाला एक सुजाण नागरिक बनविणे.

मागील मध्यमवर्गीय पिढीने दुसरा मार्ग स्वीकारला. आजच्या काही पालकांमध्ये पहिला मार्ग स्वीकारण्याची इच्छा दिसून येते. ते जसे चुकीचे तसेच केवळ दुसरा मार्ग स्वीकारणे हे पुरेसे नाही याचे भान असणेही महत्वाचे!

आत्महत्या

ह्या प्रकारचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१> प्रसार माध्यमातील एखाद्या बातमीचे / दृश्याचे त्याच्या परिणामाची जाणीव नसल्याने केलेले अंधानुकरण. ह्या मध्ये स्वतःची उपेक्षा झाल्याने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असू शकतो.

२> जीवनरुपी ग्रंथातील अगाध अनुभवाची जाणीव नसल्याने त्यातील केवळ एक दोन क्लेशदायक पाने समोर आल्याने निराश होवून आत्महत्या. ह्या प्रकारात एकदम सुखवस्तू घरातील मुलेसुद्धा येवू शकतात, ज्यांना जीवनात कधी नकार, अपयश यांचा सामना करावाच लागला नसतो.

खंडणीसाठी अपहरण / हत्या

हा मनुष्यजातीतील निरागसतेचा अंत किती लवकर होवू लागला आहे त्याचे उदाहरण होय. समाजात, मित्रांच्या समूहात प्रतिष्ठा, मान्यता हवी असेल तर कमीत कमी मोबाईल, गाडी असणे आवश्यक आहे असा समज तरुण पिढीने करून घेतला आहे आणि ती काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. योग्य मार्गाने ही तथाकथित प्रतिष्ठेची साधने मिळविण्याची सर्वांची क्षमता नसल्याने अस्वस्थतता निर्माण होवू शकते आणि त्याच्या जोडीला निरागसतेचा अंत आणि पालकांची संवादाचा अभाव असे घटक असल्यास खंडणीसाठी अपहरण/ हत्या अश्या टोकाच्या भूमिका घेतल्या जावू शकतात.

वरील दोन्ही प्रकारात प्रसारमाध्यमांच्या सुजाणतेचा अभाव हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो. इंग्रजीतील सध्याचे अग्रगण्य स्थान मिळवलेल्या आणि वैभवशाली इतिहास असलेल्या वृत्तपत्राचे सध्याचे स्वरूप, त्यातील बातम्या ह्या फिल्मी, गुन्हेगारी विश्वाला जास्त लक्ष प्राप्त करून देणाऱ्या अशा आहेत. पूर्वी सुजाण, सुशिक्षित लोकांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनमतावर प्रभाव टाकला. आता काळ बदलला, मते मांडण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, काहींनी तो आपल्या आर्थिक बळावर मिळविला. पण ह्या अयोग्य लोकांनी आपल्याभोवती अशुद्ध विचाराचा कलकलाट केला. प्रसार माध्यमात काम करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे आवश्यक असते हे समजण्यापलीकडे असणाऱ्या किंवा त्याची पर्वा नसणाऱ्या लोकांच्या हातात आज प्रसारमाध्यमे आहेत ही सत्यस्थिती आहे. आजच्या कलियुगात ह्या अशुद्ध विचारांचा प्रतिकार करू शकणारे समर्थ, परिपक्व विचारांचे चक्र आपल्या आणि समाजातील मुलांभोवती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या सुरक्षित कुंपणापलीकडे पडण्याची आपली तयारी हवी.


Sunday, April 1, 2012

क्षण ओळखावा क्षण अनुभवावा

क्षण अनुभवावा

क्षण आणि युग यांचे नाते तसे अतूट! एका क्षणाच्या सुखासाठी युगांची तपस्या लागते आणि एका क्षणाच्या चुकीची सजा युगोंयुगे भोगावी लागू शकते. मर्त्य मानवांच्या भाग्यात युगे पाहण्याचे लिहिले नाही तेव्हा त्यांनी क्षणांचे महात्म्य ओळखणे केव्हाही उचित!

आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण वारंवार येत नाहीत. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण कमी वेळा येतात तो दुर्दैवी परंतु त्याहून दुर्देवी तो ज्याला आयुष्यात आलेले असे अविस्मरणीय क्षण ओळखता / अनुभवता येत नाहीत. असे हे क्षण कोणते? ही प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना. 'दिल ही छोटासा, छोटीसी आशा' अशी परिस्थिती असल्यास, अविस्मरणीय क्षण वेगळे आणि 'ये दिल मांगे मोर' अशी परिस्थिती असल्यास असे क्षण वेगळे.

अगदी लहानपणापासून सुरुवात करायची झाली, तर मे महिन्यातील एकत्र कुटुंबात / मामाकडे घालविलेल्या सुट्ट्या, सकाळी उठून गोळा केलेले आंबे, शाळेतील स्पर्धेत पहिल्यांदा मिळालेले पारितोषक, सायकलवर तोल सांभाळता आलेला पहिला क्षण असे काही क्षण सांगता येतील. महाविद्यालयीन जीवनात ह्या क्षणांची परिसीमा अधिक व्यापक होते. आपल्या व्यावसायिक जीवनावर पकड मिळविणे हे प्राथमिक ध्येय बनते. त्यामुळे ११ -१२ मध्ये भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयात मिळविलेले उत्तम गुण हे अशा क्षणांचा भाग बनू शकतात. अशातच केव्हा एखादी आवडलेली मुलगी ज्यावेळी स्मितहास्य देते किंवा बोलते त्यावेळी तो ही एक महाअविस्मरणीय क्षण बनून जातो. पुढे पहिली नोकरी मिळते, त्यावेळी स्वअस्तित्वाला मिळालेली मान्यता त्या क्षणाला संस्मरणीय बनवितो. पुढे परदेश प्रवास, लग्न, नोकरीत बढती, अपत्याचे आगमन असे क्षण येत राहतात. पण मधल्या काळात जीवनसंघर्ष आपल्या ह्या क्षणांना उत्कटतेने अनुभवण्याच्या क्षमतेला काहीसे कमजोर बनवितो. आपण चिंतातूर जंतू बनून सदैव चिंताग्रस्त होवून राहतो आणि हे क्षण अनुभवण्याचे सुख गमावून बसतो.

कलाकार लोकांचे एक बरे असते. बर्याच वेळा त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागते (आता हा शब्दप्रयोग मी योग्य अर्थाने वापरतो आहे की नाही याची मला खात्री नाही). त्यांच्यासाठी असे क्षण नक्कीच अविस्मरणीय असतात. एखाद्या खेळत देशाचे प्रतिनिधित्व ज्यांना करायला मिळते त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आणि आयुष्यात पहिल्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा क्षण अविस्मरणीयच!

ह्याचा एक वेगळा पैलू देखील आहे. बेशिस्तीत वाढलेली गर्भश्रीमंत लोकांची मुले, आयुष्यात लहानपणीच यशाची परमोच्च शिखरे गाठलेले कलाकार, खेळाडू यांची मनःस्थिती काहीशी नाजूक बनते. यातील काही जण ह्या अविस्मरणीय क्षणाच्या, अलौकिक अनुभवांच्या वेगवेगळ्या चवींच्या शोधात नको त्या मार्गाला लागू शकतात.

जर आपण फार पुढचा विचार केला तर आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून बघता आपल्याला हे क्षण नक्कीच आठवतील. त्यावेळी ही खंत वाटायला नको की मी हा क्षण गमावला.

म्हणूनच मी म्हणतो क्षण ओळखावा, क्षण अनुभवावा!

Thursday, March 29, 2012

विचारांची सरमिसळ



आज बर्याच विचारांची एकत्र सरमिसळ इथे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

सुरुवात करतोय ते मृत्यूविषयीच्या काही विचाराविषयी! मृत्यूविषयी प्रत्येकजण आपापल्या परीने विचार लढवीत असतो. मृत्यूनंतर आपले काय होत असावे ह्याविषयी बरेच सिद्धांत आहेत. मला असे वाटते की जो कोणी सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे आत्म्याचे बरेच द्रव्य साठले असावे. नवीन जीव निर्माण होताना तो ह्या द्रव्यातील थोडा भाग काढून त्या जीवात आत्मा म्हणून पाठवून देत असावा. आणि मृत्युनंतर हा आत्मा परत अनंतात विलीन होत असावा. आता वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके आत्माद्रव्य ह्या सर्वशक्तीमानाकडे असेल की नाही, त्याच्याकडे ह्या द्रव्याचे वैविध्य कसे असावे आणि हा सिद्धांत प्राण्यांसाठी लागू होतो की नाही यावर आपणा पामरांनी विचार करू नये. ह्या भूलोकावरील जीवनाची, इथल्या नियमावलीची आपणास बर्यापैकी सवय झाली आहे. आपण नियमानुसार वागले तर आपणास दंड होण्याची शक्यता बरीच कमी. परंतु जर मृत्यूनंतर जर आपण मनाने (आत्म्याने) अस्तित्वात राहिलो आणि त्या अस्तित्वातील नियम आपल्या आकलनापलीकडील असतील तर लागली ना बोंब!

दररोज दिवस संपला की आपण जे काही समाधान मिळाले असेल त्यात आनंद मानून घरी येतो. आठवडा संपला की मागे वळून पाहता थोडे समाधानी होत, साप्ताहिक सुट्टीच्या पलीकडील दुसर्या आठवड्याकडे नजर लावतो. तीच गोष्ट वार्षिक सुट्टीची. आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर समाधान मोजण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मापदंड असतात. ह्या मापदंडानुसार काहीजण समाधानी होतात तर काही असमाधानी! प्रश्न असा आहे की आयुष्याच्या यशस्वीतेचे वा अयशस्वीतेचे मापदंड कोणी बनवितो का? आता हा मापदंडाला विविध मिती असतील; व्यक्तिगत यश, कौटुंबिक समधानाची पातळी, जोडलेली माणसे, समाजकार्य अशा विविध पातळ्यांवर आपण आपल्या आयुष्याची यशस्विता अजमावू शकतो. प्रश्न असा आहे की असा मापदंड बनविण्याची आणि त्या निकषानुसार हवी ती पातळी गाठल्यावर सामाजिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याची आपली तयारी आहे काय?

तात्कालिक समाधानाची प्रत्येकाची आपली वेगवेगळी संकल्पना असते. लहान बालकाला आईचा सहवास समाधान देवून जातो. हल्लीच्या बर्याच लहान मुलांना (वयोगट ७ - ८ वर्षे आणि अधिक) मैदानी खेळापेक्षा संगणकीय खेळ अधिक समाधान देवू लागले आहेत. विद्यार्थांना परीक्षेतील गुण समाधान देवून जातात. माणूस वयाने कितीही मोठा होत गेला तरीही त्यास आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी सुप्त इच्छा असते. परंतु हे काही सदैव शक्य नसते. मग त्यावेळी आर्थिक लाभाकडे पाहत ही माणसे दिवस लोटतात. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ह्याच्या सुद्धा विविध छटा असू शकतात. काही जणांना आपली दखल घेतली तरी पुरसे असते तर काही जणांना इतरांपेक्षा आपली जास्त दखल घेतली जावी असा अट्टाहास असतो. सार्वजनिक समारंभात अशा व्यक्तींचे वागणे पाहणे हा एक मजेशीर अनुभव असतो. घरातील वयस्क माणसांना अन्य व्यक्तींचे असणे देखील समाधान देवून जाते. हल्ली फेसबुकने आपल्या अस्तित्वाची दुसर्यास जाणीव करून देण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला.

कालच मी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद लुटून मुंबईला परतलो. महाबळेश्वर म्हणा किंवा वसई म्हणा ह्या दोन्ही ठिकाणात रोजच्या जगण्यात जीवन अधिक प्रमाणात अनुभवता येते असे माझे मत आहे. मुंबईत असतो तो जीवनाचा केवळ संघर्ष. जेवढे तुम्ही निसर्गाच्या अधिक सहवासात जाल तितकी त्या सर्वशक्तीमानाशी संवाद साधण्याची शक्यता अधिक प्रबळ होते. आता हा संवाद म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरात जो त्या सर्व शक्तीमानाचा अंश आहे त्याच्याशी त्या सर्व शक्तीमानाने साधलेला संपर्क. आतापर्यंत आज हा काय अध्यात्माच्या मार्गाने चालला की काय असे तुम्हाला वाटू लागले असेल. ह्या मार्गाविषयी मला काही अनुभव नाही परंतु ह्या मार्गावर खरोखर जे पुढे गेले आहेत त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेविषयी मात्र अतीव आदर आहे! बाकी पुढील आठवड्यात एकदा का कार्यालयीन कामकाजात मग्न झालो की मग हे विचार मागे पडतील. कसे मजेशीर आहे पहा ना, माणसाच्या मनात विचारांची अगदी दाटीवाटी झाली असते, त्यातील काहीच मनाचा काही काळापर्यंत ताबा घेवू शकतात आणि त्यातील अगदी थोडेच भाग्यवान बोलण्या / लिखण्याद्वारे दुसर्यांपर्यंत पोहचू शकतात.

बाकी आधी म्हटल्याप्रमाणे ही विचारांची अगदीच सरमिसळ आहे. आपण जर ह्याचा सामना करीत लेखाच्या शेवटपर्यंत पोहचला असाल, तर धन्यवाद!



Wednesday, March 14, 2012

नाती



नाते म्हणजे काय? नाते म्हणजे दोन वस्तूंमधील (त्यातील एकतरी सजीव हवी) परस्पर संबंधांची समजलेली / न समजलेली गुंतागुंत! नाते जसे दोन सजीव व्यक्तींमध्ये असू शकते तसेच ते एक सजीव आणि एका निर्जीव वस्तुमध्ये सुद्धा असू शकते, जसे की काहीजणांचा जुन्या घरांमध्ये अडकलेला जीव. परंतु हे नाते सजीवापुरता मात्र एकमितीय असते. वस्तूची अथवा वास्तूची सजीवाप्रती भावना असते वा नाही आणि असल्यास ती कोणत्या स्वरूपात असते हे समजण्याइतके आपण प्रगत झालो नाहीत. असो आजचा विषय आहे तो दोन सजीवांच्या (मनुष्यरुपी) नात्यांविषयी! नात्यांची रूपे अनेक; पालक - अपत्ये, नवरा बायको, मित्र, सासू - सुना, नणंद- भावजय, शेजारी...काही नाती लौकिकार्थाने रूढ तर काही त्या पलीकडची!

प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात. प्रेमळ, समंजस, अडाणी, व्यावसायिक यशाच्या मागे धावणारा, भावूक, उत्साही, दुर्मुखलेला अशी ही यादी वाढतच जाईल. नात्यातील एका व्यक्तीच्या क्ष छटा असतील आणि दुसर्या व्यक्तीच्या य छटा असतील तर कोणत्याही प्रसंगी ह्या दोन छटांची शक्यता क्ष गुणिले य इतकी असू शकते. म्हणजे एक व्यक्ती उत्साही आणि दुसरी व्यक्ती त्याच वेळी दुःखी असू शकते. नाते काही वेळा फुलते तर कधीतरी एखाद्याची नात्यात घुसमट होते. पूर्वी असे म्हणतात की संसारासाठी स्त्रिया त्याग करायच्या! संसार यशस्वीरीत्या चालविण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. संसाररुपी नात्याच्या त्या owner होत्या. परंतु असे करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या कित्येक छटा बंदिस्त करून ठेवल्या होत्या. काहीजणींनी आपली ही घुसमट आयुष्याच्या उत्तरार्धात व्यक्त केली. पण संसार मात्र यशस्वी पणे चालविले.

आजच्या जमान्यात घुसमट वगैरे कोणी होवू देत नाही. पण त्यामुळे मात्र संघर्षाचे प्रसंग मात्र उदभवू शकतात. लग्नाआधी आपण आईवडिलांच्या छत्राखाली सुखाने वावरत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या केवळ सुखद छटा / पैलू उलगडलेले असतात, आपणास ज्ञात झालेले असतात. लग्नानंतर मात्र आपल्या वागण्याचा थेट परिणाम जिच्यावर होतो अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. आधीच आपण आणि साथीदाराने स्वतःला पूर्णपणे ओळखलेले नसते, आणि त्यात आपणास एकमेकांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा अज्ञात असतात. आणि त्यामुळे ह्या क्षय combinations पैकी काही तणावांचे प्रसंग निर्माण करू शकतात. प्रत्येक नात्यात तणावाचे प्रसंग करणारी काही combinations असणारच. एकदम आदर्श असे कोणतेच नाते नसते. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नात्याला एक owner असावा लागतो. काही नात्यांचा owner प्रत्येक तणावाच्या प्रसंगाची जबाबदारी घेतो तर काही नात्यात तणावाच्या प्रसंगाच्या स्वरूपावरून कोणी एक साथीदार owner बनतो. परंतु काही नात्यांचा owner नसतो आणि ती मात्र फुलण्याआधीच मिटतात! तणावाच्या प्रसंगावेळी साथीदारांनी हे लक्षात घ्यायला हवे की दोघांच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या छटा त्यावेळी प्रकट झाल्या आहेत. सहजीवनाच्या काही वर्षानंतर साथीदारांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा बदलत जातात; त्या कधी समांतर रेषेप्रमाणे धावतात, कधी एक रेष बनून जातात तर कधी एका बिंदुतून वेगळ्या दिशेत निघालेल्या दोन रेषांप्रमाणे धावतात, पुन्हा कधी परत न मिळण्यासाठी!


Friday, January 27, 2012

वसईची पिशवी



लहानपणची गोष्ट, मुंबईला राहणाऱ्या आत्या वसईच्या मुक्कामाहून परत मुंबईला जायला निघाल्या की आजी त्यांच्या हातात भाजीची पिशवी देई. वाडीतील भाजी, केळ्याचा फणा, सुरण तत्सम पदार्थांचा त्यात समावेश असे. वसईच्या भाज्या ताज्या, मुंबईला परत गेल्यावर लगेच बाजारात जायला लागू नये म्हणून आजी ह्या भाज्या देत असेल अशी माझी समजूत. काही वर्षाने बहिणींची लग्न झाल्यावर हेच चित्र पुन्हा अवतरले. ह्या ही वेळेला माझ्या समजुतीत फारसा काही फरक झाला नाही.

काही वर्षे गेली, शिक्षण संपले, नोकरी चालू झाली. प्रथमच परदेशगमनाचा योग आल्यावर सामान भरताना मध्येच आईने त्यात लाडूचा एक डबा भरला. हा डबा कशाला, असा थोडासा तिच्याशी वाद घातल्यावर मी तो डबा नेण्याचे कबूल केले. शनिवारी रात्री ब्रायटन (इंग्लंड) येथील हॉटेलात आगमन झाले. व्यवस्थित पोटपूजा होण्याची काही शक्यता नव्हती. रविवारी सकाळी, इंग्लंडच्या थंड हवेत उठून बाहेर एक फेरफटका मारून आल्यावर अचानक ह्या लाडूच्या डब्याची आठवण झाली. तो एक लाडू तोंडात घालताच हजारो मैलांचे अंतर पार करून मी थेट घरापर्यंत पोहोचलो. पुढे हा डबा मी बरेच दिवस पुरविला. त्यानंतरच्या प्रत्येक परदेशवारीला घरून दिलेली ही पिशवी मी नेत गेलो.
बोरिवलीला राहायला गेल्यानंतर वसईच्या फेर्या शनिवार- रविवारकडे होत राहिल्या. मुंबईत वाढलेली बायको, वसईच्या भाज्यांची, माश्यांची रसिक बनली. वसईहून आम्ही आता पिशव्या घेवून येवू लागलो. मेरू, स्विफ्ट मध्ये एकावेळी सर्वाधिक पिशव्या घेवून येण्याचा विक्रमही बहुधा आम्ही प्रस्थापित केला.

ह्या सर्व प्रवासात वसईची पिशवीतील भाजीच्या ताजेपणापेक्षा त्यातील भावनिक गुंतवणुकीचा, मायेचा उलगडा केव्हा आणि कधी झाला हे माझे मलाच कळले नाही. एका पिढीतील माया दुसर्या पिढीपर्यंत भौगोलिक अंतराचे बंध ओलांडून पोहचविण्याचे काम ही वसईची पिशवी अनेक वर्ष करीत राहील याविषयी मात्र माझ्या मनात अजिबात शंका नाही!

Sunday, January 8, 2012

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर




नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्षी माणूस साधारणतः थोडासा भावूक बनतो. आयुष्यातील एक वर्ष निघून गेल्याची जाणीव मनात काहीशी खंत निर्माण करते. स्वतःच्या अक्षय अस्तित्वाच्या कल्पनेला कालरूपी वास्तवाने अजून एक छेद दिला हे नाही म्हटले तरी कोणाला आवडणार?
चाळीशीच्या उंबरठ्यावर एक मोठा प्रश्न मनात डोकावू लागतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे निघून गेली आहेत का? प्रगतीची शिखरे गाठण्याची संधी मी गमावली तर नाही ना?. ह्या प्रश्नाकडे बर्याच प्रकारे पाहता येईल. जो पर्यंत तब्येत धडदाकट आहे, मन चिरतरुण आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनू शकतो. मी तर असे म्हणेन की केवळ अनुभवाने येणारी प्रगल्भता या वेळी आपणाकडे असते. स्वतःला विविध पातळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण सिद्ध केल्याचा आत्मविश्वास तुम्हाकडे असतो. पिकल्या केसांनी (हे ह्या पिढीचे वास्तव) तुम्हाला संयमी बनविले असते. मान्य आहे की कौटुंबिक जबाबदार्या काही प्रमाणात वाढलेल्या असतात पण जर आपल्या जीवनसाथीदाराशी योग्य सामंजस्य निर्माण करण्यात तुम्हाला यश आले असेल तर ह्या जबाबदार्या सुद्धा तुम्ही सहजपणे पेलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता.
आता प्रगतीची शिखरे ह्या शब्दप्रयोगाकडे मी परत वळतो. प्रगतीची शिखरे म्हणजे केवळ व्यावसायिक जगातील यश असा अर्थ मला अभिप्रेत नाही आहे. प्रगतीची शिखरे मोजण्याचा मापदंड हा केवळ लौकिकार्थाने मिळालेले यश असा होत नाही. एखाद्या गृहिणीने संसारावर, मुलांच्या अभ्यासावर मिळविलेले नियंत्रण, एखाद्या कलाकाराने अथक प्रयत्नानंतर कलेवर मिळविलेले प्रभुत्व, एखाद्या छायाचित्रकाराने टिपलेले एक दुर्मिळ चित्र हे ही प्रगतीचे शिखर असू शकते. दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील एक वाक्य कायमचे माझ्या लक्षात राहिले आहे. स्वानंद हे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
मीच माझ्या मनाचा स्वामी. त्यामुळे जर मी मनाला प्रसन्न ठेवू शकलो तर मी प्रगती करणारच. जगाने बनविलेले प्रगतीचे मापदंड माझ्या निकर्षाशी मिळतेजुळते असतील असेही नाही.
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण!
अजूनही अर्धे आयुष्य बाकी आहे! मी वास्तववादी असे जीवनध्येय ठरविणार आणि जीवनाचा आनंद घेत ते साध्यही करणार! आणि दुनियेतील मला निराश करणाऱ्या घटकांपासून मला सांभाळण्यासाठी मनोबल वाढविणार!
Happy 2012!

Saturday, November 26, 2011

निरागसतेचा लोप



भूतलावर जन्माला येणारे प्रत्येक बालक बर्यापैकी निरागस असावे असा माझा समज आहे. ही बालके पूर्णपणे निरागस असावी असा पूर्वी समज होता पण काही कारणास्तव तो थोड्याफार प्रमाणात बदलला. असो, आपल्या आयुष्यातील विविध अनुभवामुळे ह्या बालकांची निरागसता हळूहळू लोप पावू लागते. आणि कालांतराने त्यांचे निगरगट्ट अशा प्रौढात रुपांतर होते.

निरागसतेचा लोप पावण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या वेगाने होते. युद्धस्थिती, नैसर्गिक / कौटुंबिक आपत्ती, गरिबी ह्या प्रतिकूल घटकांचा ज्यांना बालपणी सामना करावा लागतो, अशा बालकांना वास्तवाचे भीषण चटके फार लवकर बसतात. आणि त्यांची निरागसता लोप पावते. मध्यमवर्गीय बालके बर्याचश्या प्रमाणात आपली निरागसता शालेय जीवनात टिकवून ठेवतात किंवा ठेवायची. आपल्याला हवी ती गोष्ट रडल्याशिवाय मिळत नाही हे ज्यावेळी नवजात शिशूला कळते त्यावेळी त्याच्या १०० % निरागसतेला थोडा तडा जातो. आणि मग जीवनाच्या एका टप्प्यावर आर्थिक कमाई करण्याचे दायित्व ज्यावेळी ह्या मध्यमवर्गीय तरुणावर येऊन पडते आणि आपल्या असलेल्या मर्यादांची त्याला जाणीव होते त्यावेळी हा युवक निरागसता विसरतो. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बालकास ज्यावेळी स्वतःला वारसाहक्काने मिळालेल्या सामर्थ्याची जाणीव होते त्यावेळी त्याची निरागसता मग्रुरीत परिवर्तीत होण्याची शक्यता असते. पालकांचे योग्य संस्कार ह्या गोष्टीस परावृत्त करू शकतात.

आजी आजोबा नातवंडांची निरागसता जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काम करतात पण त्यासाठी त्यांना नातवंडासमवेत वेळ मिळावयास हवा. निरागसतेच्या बाबतीत माझी काही निरीक्षणे आहेत. एकदा का निरागसता गेली की ती त्या जन्मात बहुदा परत मिळविता येत नाही. मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्या मागील विश्वातील स्वतःचा शोध घेण्याच्या अयशस्वी प्रयत्नाविषयी लिहिले होते. बहुधा हा शोध आपल्या हरविलेल्या निरागसतेचा असतो आणि त्यामुळेच तो असफल होतो. ह्याला अपवाद काही जणांचा, जे आपली निरागसता आयुष्याच्या संध्याकाळी परत मिळवितात. निरागसतेच्या विरुद्ध धूर्तता. ही का एकदा एखाद्या व्यक्तीत शिरली की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ही कायम वास्तव्य करून राहते आणि त्यामुळे पुढील पिढ्या पुन्हा कधीच पूर्णपणे निरागस होवू शकत नाहीत.

समाजाची निरागसता ही एक पुढील पायरी. सध्या आपण समाजाच्या पातळीवरील निरागसता झपाट्याने गमावत चाललो आहोत. आतापर्यंत सामाजिक निरागसतेचे दायित्व ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलले ती ज्येष्ठ नागरिकांची पिढी तंत्रज्ञानांच्या आलेल्या सुनामीने आपला आत्मविश्वास गमावून बसली आहे.

बर्याच वेळा मला असे वाटत असते की ही पृथ्वी आणि त्यावरील आपली मनुष्यजमात हा एक कोणी तरी मांडलेला खेळ आहे. आपल्या मनातील विचार, आपली धडपड यावर जरी आपणास आपले स्वतःचे नियंत्रण वाटत असले तरी तसे नाहीय. ह्या मनुष्यजातीचा आणि त्या जातीच्या निरागसतेच्या लोपाचा मार्ग आधीच कोणी आखून ठेवला आहे आणि त्या आखलेल्या मार्गावर आपली वाटचाल चालू आहे.


Saturday, November 12, 2011

आपले विश्व



स्वतःला केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येकजण आपले विश्व स्थापन करीत असतो. ह्या विश्वात समाविष्ट असतात आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि जीवनरहाटीच्यानिमित्ताने संपर्कात येणारी लोकं! ह्यातील प्रत्येकाशी आपले लौकिकार्थाने लिखित / अलिखित असे नाते असते. आता ह्या नात्याकडे बघण्याचा दोन्ही बाजूंचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक दिवसागणिक ही नाती बदलत जातात, दररोज बदलणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे!

काळ पुढे सरकतो, माणूस शिक्षणानिम्मित, नोकरी व्यवसायानिम्मित स्थलांतर करतो, नवीन विश्व निर्माण करतो. त्यात गुंगून जातो. आधीचे विश्व काहीश्या प्रमाणात विसरतो. व्यक्तीने आयुष्यभर अनुभवलेली ही अनंत विश्वे त्याच्या मनाच्या कोपर्यात कोठेतरी अडगळीत पडलेली असतात. कधीतरी कोणत्यातरी क्षुल्लक निम्मिताने ह्या अनंत विश्वातील एखादे विश्व उफाळून बाहेर येते. मनाला अस्वस्थ करून सोडते. ह्या विश्वाला आपण परत आणून शकत नाही ही जाणीव आपल्याला बोचत राहते, मग आपण शोधतो त्या विश्वातील आपल्याला, तो तरी आपणास नक्की सापडेल असा आपणास विश्वास असतो. पण हा शोध घेता घेता आपणास जाणवते की त्या विश्वातील स्वतःला आपण हरवून बसलो आहोत!

Tuesday, October 18, 2011

शिस्त, गुणवत्ता, कल आणि क्षेत्र



शीर्षकामध्ये नमूद केलेल्या चार गोष्टी एकमेकांशी तश्या म्हटल्या तर निगडीत आहेत. परंतु त्यामधील परस्पर संबंध म्हणावा तसा सरळ नाही.
अ> गुणवत्ता आणि कल

प्रत्येक व्यक्ती गुणवत्ता आणि कल यांचा बराच भाग जन्मतानाच घेवून येते. परंतु या दोन्ही बाबींचा काही भाग मात्र प्रयत्नपूर्वक जोपासला जावू शकतो.

ब> गुणवत्ता आणि क्षेत्र

प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. एखादी बुद्धिमान व्यक्ती अभ्यासक्षेत्रातील विविध विषयात वेगवेगळ्या प्रमाणात पारंगत असते.

क> गुणवत्ता आणि शिस्त

एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होईल हे त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून असते. परंतु गुणवत्तेतील कमतरता काही प्रमाणात शिस्तीच्या आधारे भरून काढता येते. ज्या क्षेत्रात बर्याच संधी उपलब्ध असतात त्या क्षेत्रात शिस्तीच्या आधारे बरेचजण टिकून राहू शकतात. शिस्तीच्या जास्तीच आहारी गेल्यास त्या व्यक्तीची उरलीसुरली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचा धोका संभवतो.

शिस्त म्हणजे काय? शिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टाची व्याख्या बनवून आपल्या समजुतीनुसार ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे वेळापत्रक बनवून न कंटाळता ते वेळापत्रक पाळणे. ह्या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी, की प्रत्येक क्षेत्रातील शिस्तीची व्याख्या काळानुसार बदलत राहते. आणि शिस्तीवर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला शिस्तीची व्याख्या कालबाह्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सारांश
  1. प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता क्षेत्रानुसार बदलते. आपला कल लक्षात घेवून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ज्या भाग्यवान लोकांना मिळते त्यांची गुणवत्ता आपसूकच जोपासली जाते आणि असे लोक शिस्तीत राहण्याची शक्यता जास्त असते.
  2. मुद्दा १ च्या व्याख्येत बसणारे भाग्यवान लोक ह्या दुनियेत फार कमी आहेत.
  3. वरच्या समीकरणात पैसा हा दुष्ट घटक समाविष्ट केल्यास वरील लेखाचा बराच भाग निरर्थक ठरतो!


Saturday, October 8, 2011

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.

असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!

Thursday, September 15, 2011

धोनी, इंग्लंडचा दौरा आणि बिकट स्थिती


भारतीय संघाची इंग्लंड दौर्यातली कामगिरी एकदम सुमार झाली. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात त्या सर्व चुकीच्या झाल्या. मिडास स्पर्श लाभलेला धोनी सुद्धा अगदी हतबल झाल्यासारखा वाटला. मालिकेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले की हा भारतीय संघ ह्या दौर्यात तरी इंग्लिश संघाची बरोबरी करू शकणार नाही. परंतु पूर्ण मालिका खेळणे मात्र क्रमप्राप्त होते. सामना संपल्यावर (हरल्यानंतर) पत्रकार परिषदेला शांतपणे तोंड देणे याची तुलना लाल रेषेवाल्या प्रगतीपुस्तकाची आईवडिलांकडून तपासणी किंवा महाकाय चूक केल्यानंतर साहेबाकडून होणारी कानउघाडणी ह्याच्याशी काही प्रमाणात होवू शकते. काही प्रमाणात अशासाठी म्हटले कारण पत्रकार परिषदेतील क्रिकेट खेळाडूंची अवस्था सर्व दुनियेसमोर मांडली जाते.
आता भारतीय खेळाडूंनी जिगर दाखविली असती तर मालिकेचा निकाल वेगळा (म्हणजे थोडा तरी कमी लाजीरवाणा) लागला असता. पण मी त्या विषयाकडे वळत नाहीये. भारतीय संघाची जी अवस्था इंग्लंड दौर्यात झाली ती म्हणजे एखाद्या अशा बिकट स्थितीत सापडणे की ज्यात केवळ थांबणे ह्याच तोडगा असू शकतो. भयंकर वाहतूक कोंडीत सापडणे, चुकीच्या साहेबाशी एखाद्या प्रोजेक्टमध्ये गाठ पडणे, जेवताना ताटात कारल्याची भाजी येणे हे सर्व तात्पुरत्या बिकट परिस्थितीची उदाहरणे आहेत. काही वेळा ही बिकट परिस्थिती दीर्घकालीन असू शकते; गंभीर आजार, सुधारण्यापलीकडे गेलेली जवळची नाती यात वाट पहायची म्हंटली तर आयुष्यभराचा कालावधी घालवावा लागतो. यातील काही उदाहरणात एखादा मोठा निर्णय घेवून त्या परिस्थितीतून बाहेर पडावे लागते. परिस्थिती सुधारण्याचे आटोकाट प्रयत्न करायचे, ह्या प्रयत्नांना प्रमाणांची आणि वेळेची मर्यादा घालून द्यायची आणि ती मर्यादा ओलांडल्यावर मात्र तो कठोर निर्णय घ्यायचा. ह्या प्रकारात प्रत्येकाची बिकट परिस्थितीची व्याख्या करण्याची पद्धत, त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची क्षमता, सहनशीलतेचा परमोच्च बिंदू हे सर्व बदलणारे घटक येतात.
बघूया धोनी काय करतोय ते!


Saturday, August 27, 2011

अण्णा हजारे आंदोलनांनिम्मित




अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाबाबत माझी मते मांडण्याचा हा प्रयत्न.

कधीकाळी वाचलेली एक गोष्ट! एका अपराध्याला दगडाने ठेचून मारण्यासाठी एकत्र आलेला जमाव. शिक्षेचा हा अघोरी प्रकार सुरु होणार तितक्यात तिथे एक महात्मा येतो आणि म्हणतो ज्या माणसाने आयुष्यात एकही गुन्हा केला नाही त्यानेच फक्त दगड उचलावेत. आपसूकच सर्वांचे हात मागे येतात. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात हा प्रकार तसा लागू होत नाहीय. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागणारे असे दोन प्रकार मानले तर अण्णांचे आंदोलन हे दुसर्या प्रकारच्या लोकांनी पहिल्या प्रकारच्या लोकांविरुद्ध चालू केलेले. गोष्टीतील महात्म्याचे तत्व लावायचे झाले तर बहुदा आपल्या सर्वांना ह्या आंदोलनात भाग घेण्याचा हक्क नाही.

सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची इच्छा असूनही ही तो असे का करू शकत नाही हे शोधण्याचा इथे मी प्रयत्न करतोय.
  1. आजूबाजूच्या परिस्थितीने भांबावून गेलेल्या मध्यमवर्गीय माणसाची आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि जे आधीच गर्भश्रीमंत आहेत त्यांची आपले सांपत्तिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यासाठी चाललेली धडपड. ह्या धडपडीमुळे मर्यादित संपत्तीवर पडलेला ताण. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे कोणत्याही मार्गाने आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याची वृत्ती.
  2. जीवनातील मुलभूत गोष्टी जसे की सार्वजनिक वाहतूक, आरोग्यव्यवस्था यांचा अभाव. यामुळे सामान्य माणसाकडे असलेला वेळेचा अभाव.
  3. छुप्या स्वरुपात अस्तित्वात असलेली गुंडगिरी. सर्वांना माहित असलेल्या समांतर व्यवस्थेला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरोध केल्यास जीवाला धोका होवू शकतो ह्याची प्रत्येकाच्या मनात असणारी भीती.
  4. मध्यमवर्गीयातील एकीचा अभाव आणि जोपर्यंत अन्यायाची झळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची वृत्ती.
  5. बौद्धिकदृष्ट्या संपन्न अशा वर्गाची विविध कारणांमुळे शासकीय सेवांपासून झालेली फारकत आणि त्यामुळे शासकीय धोरणांमध्ये कल्पकतेचा अभाव.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गृहस्थाला म्हणायचे आहे तरी काय? जन लोकपाल विधेयक उद्या संसदेत येईल आणि संमत सुद्धा होईल. काही भ्रष्ट जनप्रतिनिधी ह्या विधेयकाच्या अंमलाखाली अटकही होतील. पण त्यांच्या जागी स्वच्छ लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता निर्माण होणार कशी? वरील दिलेले प्रश्न जन लोकपाल विधेयक सोडवणार काय?

केव्हातरी ही सर्व चर्चा आपण लोकशाहीस लायक आहोत का? की पर्यायी शासनव्यवस्थेचा आपण विचार करावा या दिशेने जाईल. माझे तरी म्हणणे असे की अशा एखाद्या लायक माणसाचा शोध घेवून त्याला हुकुमशहा बनवावा! बरेच काही कठोर निर्णय बराच काळ घेतल्याशिवाय परिस्थती सुधारणे शक्य नाही.


Saturday, July 23, 2011

चिकिस्तक


हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला आहे. मुलभूत गरजा पूर्ण झाल्यावर करणार तरी काय म्हणा? चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती प्रमाणात करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. चिकीस्तेचे फायदे / तोटे नानाविध. फायदे म्हणायचे झाले तर आपल्या ज्ञानात भर पडते, एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती होते. ह्या माहितीचा वापर आपण भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी करू शकतो. तोटे कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या सुरुवातीलाच एक पाटी लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या बाबतीत असे म्हणावे लागेल की अज्ञानातच सुख असते. साधे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या आहाराविषयीच्या सवयी. ज्या क्षणी तुम्हाला कॅलरी ह्या प्रकाराची माहिती होते त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा सुखाला तुम्ही मुकण्याचा धोका संभवतो. कोणत्याही नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता करू नये. जीवनातील काही सुंदर गोष्टी दुरूनच सुंदर भासतात त्यांना तसेच राहू द्यावे!

सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू शकते. हे आपल्या पूर्वजांना पक्के ठाऊक होते. आपण ही गोष्ट थोडीतरी ध्यानात ठेवावयास हवी !


Friday, July 22, 2011

शहरनिर्मिती

मुंबई शहरात राहताना बर्याच वेळा जाणवते की ह्या शहराचा संतृप्ततेचा बिंदू केव्हाचा ओलांडला गेला आहे. शहरात एखादी गोष्ट थोडीदेखील साधारणतेच्या व्याखेच्या पलीकडे गेली की गोंधळ चालू होतो. आता ही बाब एकदम क्षुल्लक असू शकते जशी की एका वर्दळीच्या रस्त्यावर मध्येच गाडी बंद पडली, १० मिनिटे पाऊस पडला! लगेच वाहतूक खोळंबते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. मुंबईत राहणाऱ्या / नोकरीनिम्मित शहरात येणाऱ्या प्रत्येकाने अशा परिस्थितीसाठी मनाची तयारी ठेवलेलीच असते. मुंबईतला प्रत्येक नागरिक हा सहनशीलतेचा तसा पुतळा असतो. सहनशीलता म्हटले तर चांगला गुण आणि म्हटले तर परिस्थिती न बदलता येण्याचा कमकुवतपणा!
प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. माणसाच्या इतिहासामध्ये शहरनिर्मितीचा टप्पा बर्याच आधी येवून गेला. भारतामध्ये देखील तो सतराव्या - अठराव्या शतकात आला आणि शहरे उदयास आली असावी. मी या विषयातील अज्ञानी, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी! बाल्यावस्थेतील ही शहरे बरीच काही वर्षे (हा कालावधी दशकात / शतकात मोजावा) सुसंकृतावस्थेत होती. परंतु गेल्या काही दशकात ह्या शहरांच्या वाढीने अवाढव्य रूप धारण केले.
शहरांच्या वाढीची अंतिम अवस्था ही मृतावस्था होय. शहरातील नागरीकरणाची संयंत्रणा एका बिंदूवर कोलमोडून पडते. उद्योगधंद्यासाठी वातावरण प्रतिकूल होते. आणि मग उद्योगधंदे, नागरिक, शैक्षणिक संस्था यांचे शहराबाहेर स्थलांतर होते. ही एकदम टोकाची स्थिती मी वर्णिली. परंतु ह्या स्थितीचे भान आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणात आपल्या लोकसंख्येची वाढ होत आहे ते पाहता आपणास नवीन शहरांची निर्मिती करणे आवश्यक आहे. आता ही शहरे महानगरे नसावीत तर छोटी नगरे असावीत. मध्येच दोन लेख वाचनात आले, एक होता आपल्या अभिनेता अतुल कुलकर्णीचा. त्याने आपल्या मित्र- नातेवाईकांसोबत मिळून गावाबाजुला ओसाड जमीन विकत घेतली आणि बर्याच प्रयत्नानंतर तिथे घनदाट जंगलसदृश्य झाडी निर्माण केली. दुसरा लेख होता अण्णा हजारे यांच्याविषयी, त्यांनी राळेगण सिद्धी या गावात सिंचनाची सुनियोजित व्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे तिथे विविध धान्य / फळे याचे उत्पादन करून ते गाव स्वयंपूर्ण केले. ह्या दोन लेखांनी मला एकदम भारावून टाकले आणि माझ्या एका जुन्या स्वप्नाने पुन्हा भरारी घेतली.
समविचारी सुशिक्षित अश्या नागरिकांचा समूह एकत्र येवून गावरान भागात एकत्र ओसाड जमीन खरेदी करणार. तिथे साधी पण सर्व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण अशी घरे उभारणार. पाण्याची सोय भागविण्यासाठी एका मोठ्या जलाशयाची निर्मिती करणार. आणि ह्या जलाशयातील पाण्याच्या आधारे ह्या ओसाड भागाचे एका हिरव्यागार प्रदेशात रुपांतर करणार! हळूहळू मग ह्या भागात छोट्या शिक्षण संस्थाची निर्मिती करून आजूबाजूच्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय करणार. पुढचा टप्पा म्हणजे इथे शिकलेल्या मुलांसाठी रोजगाराची सोय करण्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे उभारणार! हे वाचताना एक गोष्ट लक्षात आलीच असेल की हा नागरिकांचा समूह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हवा आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर असावा की त्यांना फारशे काही पाश नसावेत. आयुष्यातील १०-१५ वर्षे ह्या असल्या उद्योगासाठी घालविण्याची तयारी असावी. साधारणतः वयाच्या ५०-५५ वर्षी ह्या समूहाने असला उद्योग करण्यास करण्यास सुरवात करावी!
कसे वाटले हे स्वप्न? विचार जरूर कळवा! आणि हो २०२५ सालच्या आसपास सगळा गाशा गुंडाळून विदर्भातील एकाद्या भागात स्थलांतरित होण्याचे माझ्याकडून निमंत्रण आल्यास त्याला हो म्हणण्याची तयारी ठेवा!


Saturday, June 25, 2011

अभ्यास पद्धती भाग २





अभियांत्रिकी अभ्यासक्रम एकंदरीत वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो. प्रत्येक सत्रात SUBMISSION नावाचा बागुलबुवा आपली पाठ पुरवीत असतो. प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक असते. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी अध्यापकांच्या सर्व वर्गांना उपस्थित राहणे, विषयाचे नियमित वाचन करणे हे जरूर असते. ह्या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते आणि ते म्हणजे reading between the lines. पुस्तकातील ओळींमध्ये गर्भितार्थ भरलेला असू शकतो आणि त्याचा आपापल्या मतीनुसार अर्थ लावण्याची आपणास मुभा असते! सबमिशन आटोपल्यानंतर मिळणाऱ्या अभ्यास सुट्टीवर आपण भिस्त ठेवल्यास हा गर्भितार्थ उमजून घेण्याची आपणास कमी संधी मिळते.

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणास योग्य अशा अभ्यासनोंदी (नोटस) मिळणे आवश्यक असते. ह्या नोटस मिळविण्यासाठी योग्य कंपूत आपण असणे आवश्यक असते. हा कंपू आपणास विषयाच्या चर्चेसाठी उपयोगी पडतो. त्याच प्रमाणे गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रीकेंचे योग्य विश्लेषण करण्यासाठी ह्या अभ्यासकंपूचा आपणास उपयोग होतो.

अभियांत्रिकीच्या परीक्षा हा एक अजून सखोल विषय. चार तासांचे पेपर आणि त्या वेळात आपणास अवगत असणारे बरेचसे ज्ञान आपणास उत्तरपत्रिकेत योग्य प्रमाणात उतरावे लागते. ह्या वेळात आपल्याला काही निर्णय पटापट घ्यावे लागतात. प्रश्नपत्रिका हाती आली की पहिल्या पाच मिनिटात तिचे विश्लेषण करून आपण सोडवणार असलेले प्रश्न आणि त्यांचा क्रम ठरवावे लागतात. एखाद्या प्रश्नाच्या जास्त प्रेमात पडून सुद्धा चालत नाही. २० गुणाचा एक प्रश्न परीक्षकास तो विद्यार्थी असल्याच्या आविर्भावात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी २० गुणांचे २ प्रश्न योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक असते. ह्या चार तासात आपला आत्मविश्वास टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी खात्रीचे प्रश्न प्रथम सोडविणे आवश्यक असते. एखाद्या विषयात बरीच सूत्र असल्यास उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आणि प्रश्नपत्रिका मिळण्याआधी ही सूत्रे मागच्या पानावर पेन्सिलीने लिहून ठेवण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक विषयाचे काही भाग आपणास पूर्ण उमजलेले असतात आणि त्यांची आपण योग्य तयारी सुद्धा केलेली असते. अशा भागाशी संबंधित प्रश्न प्रथम सोडवावेत. ज्या भागांची आपली तयारी कमी झालेली असते आणि त्या भागाशी संबंधित ज्ञान आपल्या मेंदूच्या कप्प्यातून खेचून घेण्यास (retrieve करण्यास कष्ट करावे लागणार असतात, असे प्रश्न शेवटी ठेवावेत. ह्या भागातील आपली कामगिरी त्यावेळच्या आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असते. अशा वेळी मध्येच छताकडे एक मिनिट पाहत आपल्या विविध उल्लेखनीय कामगिऱ्या (आपल्या म्हणण्यानुसार!) आठवून स्वतःला प्रफुल्लित करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही वर्षे तशी हा हा म्हणता संपून जातात. महाविद्यालयातील सांस्कृतिक दिवस, वेगवेगळे 'Days' साजरे करता करता अंतिम वर्ष समोर येवून ठेपते. पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे (ते ही देशात की परदेशात), की प्रथम थोडा नोकरीचा अनुभव घ्यायचा हा निर्णय घ्यावा लागतो. अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निमित्त आपली बाहेरील व्यावसायिक जगाशी तोंडओळख होते. व्यावसायिक जगात प्रवेश करता करता आपल्या वैयक्तिक जीवनातही बदल होत राहतात आणि अधिकाधिक जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडतात. इथे मात्र कोणतेही पुस्तक आपल्यासोबत नसते. सोबत असतात नातेवाईक, मित्र, आपला स्वभाव आणि आयुष्य कशा पद्धतीने घालावावयाचे आहे याविषयीचे आपले विचार! यातील शेवटच्या दोन गोष्टी वयपरत्वे काही प्रमाणात बदलत जातात. आवश्यक असते ते आयुष्यातील विविध टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहणे!

Friday, June 10, 2011

माझा आवडता देश न्यूझीलंड






न्यूझीलंडचा आणि माझा संबंध फक्त क्रिकेट सामन्यापुरता! न्यूझीलंडमध्ये कोणताही सामना असो मी तो हमखास TV वर पाहतो. कारणे दोन, पहिले म्हणजे न्यूझीलंडची हिरवीगार मैदाने आणि दुसरे म्हणजे तिथले प्रेक्षक. न्यूझीलंडच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता बर्याच वेळा पाहुणा संघ त्यांची धूळधाण उडवत असतो. परंतु मैदानावरील कामगिरीचा तेथील प्रेक्षक स्वतःवर फारसा परिणाम होऊन देत नाहीत. बर्याच ठिकाणी प्रेक्षक सुद्धा हिरव्या कुरणावरच बसलेले असतात. लहान मुलांचा आपला एक स्वतंत्र सामना ह्या कुरणावर चालू असतो. मोठी माणसे बियरचे घुटके घेत घेत वेळ मिळाल्यास मैदानावरील घडामोडींकडे नजर टाकत असतात. मैदानावरील न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही वृत्ती काही फारशी वेगळी नसते. दोन तीन चांगले फटके मारून ते परत तंबूच्या सुखकारक वातावरणात परततात. मालीकांमागून मालिका हरून सुद्धा तेथील कर्णधाराची हकालपट्टी होत नाही.

ह्या एकंदरीत परिस्थितीची कारणीमिमांसा करायची झाली तर न्यूझीलंडची विरळ लोकसंख्या आणि तेथील लोकांना जीवनासाठी करावा लागणारा कमीतकमी संघर्ष हे होय. आपल्या जीवनात संतुष्ट असणारे हे लोक क्रिकेटकडे एक खेळ आणि केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतात. क्रिकेटची गोष्ट सोडा एकंदरीत जीवनातही हे लोक समाधानाने जगत असतात. सतत प्रगती करायला हवी, निव्वळ नफ्यात वाढ हवी अशा ध्येयाने तेथील बहुतांशी जनतेस पछाडलेले नसते. अमेरिकेत असताना एका सहलीदरम्यान दादरहून न्यूझीलंडला स्थायिक झालेल्या मराठी माणसाची भेट झाली. त्याचे एक वाक्य माझ्या अजून लक्षात आहे, तो म्हणाला की न्यूझीलंडचा एखादा तरुण मुलगा अमेरिकत शिक्षण अथवा नोकरीनिमित्त चालला की त्याचे आईवडील काळजीत पडतात की पोरग आता बिघडणार! एकंदरीत काय तर अमेरिकेच्या स्वच्छंदी वातावरणाची भीती जगभर पसरलेली.

अमेरिकेचे स्वच्छंदी वातावरण केवळ आपण ऐकून असतो, चित्रपटातून पाहत असतो आणि मुंबईसारख्या भारतातील शहरांतून जगत असतो. परंतु तसे बघायला गेले तर बहुतांशी अमेरिकन लोक सुद्धा कुटुंबवत्सल असतात आणि भारतात सुद्धा ७०-८० टक्के लोक अजूनही परंपरागत जीवन जगणे पसंत करतात. प्रश्न आहे तो प्रसारमाध्यमांचा! प्रसारमाध्यमांना हाती घेवून भारतीय जनतेला चंगळवादी बनविण्याचा पद्धतशीर प्रयत्न गेले काही वर्ष चालू आहे. न्यूझीलंडला असे काही होत नाही आणि म्हणूनच माझा आवडता देश न्यूझीलंड! देव करो आणि न्यूझीलंडची उद्योग धंद्यात फारशी प्रगती न हो! नाही तर न्यूझीलंडला गर्दीचे ठिकाण बनवायला आपण भारतीय तयारच आहोत!

Wednesday, June 8, 2011

पुढे काय ?





मनुष्यजातीच्या उत्क्रांतींच्या प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांसाठी मनुष्याने संघर्ष केला. हा संघर्ष दैनंदिन पातळीवरचा होता.
उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेत हा संघर्ष दैनंदिन पातळीवर राहिला नाही. साठवणूक करून ह्या गरजा भागविण्यासाठी दीर्घकाळासाठी तरतूद करून ठेवण्याचे शहाणपण माणसाला सुचले. ही प्रगती सर्व मनुष्याजातीची न झाल्यामुळे काही समूहांचा प्राथमिक गरजांसाठी संघर्ष अजूनही कायम आहे. आज आपण बोलूया उत्क्रांतीच्या प्रगतावस्थेतील पुढील टप्प्यावरील समूहाविषयी!

मनुष्यजातीचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपणास जास्त काळ शांत बसता येत नाही. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावर आपण नवीन गरजा निर्माण केल्या. क्रीडा, करमणुकीची साधने निर्माण केली. तंत्रज्ञानाने प्रगती करताच मात्र ह्या गरजांनी आपल्यावर ताबा मिळविण्यास सुरवात केली. गाडी हवी, वातांकुलीत घरे हवीत, बिले भरण्यासाठी इंटरनेट हवे, बोलण्यासाठी भ्रमणध्वनी हवा इथून सुरुवात झाली. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून बिले भरता येण्याची सोय झाली.

माणसाचे तंत्रज्ञानांच्या बाबतीत अंतिम ध्येय काय असू शकते? माझ्या घरी एक संगणक सदृश्य उपकरण असणार, माझ्या मनातील विचार ते ओळखू शकणार आणि दूरदर्शन संच, संगणक, दृश दूरध्वनी यापैकी कोणत्याही एका MODE मध्ये सुरु होवू शकणार. त्यापुढील प्रत्येक पर्याय मी केवळ माझ्या मनातील विचारावर नियंत्रित करणार. Teleportation ने मी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणार. अन्नासाठी मी सलाईन लावणार...आणि असेच पुढे काही.. आज ही थोडी अतिशोयक्ती वाटत आहे पण मनुष्याच्या स्वस्थ न बसता येण्याच्या गुणधर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवशी आपण ही अवस्था गाठणार याची मला खात्री आहे. आणि मग ह्या अवस्थेच्या शेवटी आपण एक तर यंत्र बनून जगणार किंवा तंत्रज्ञान आपल्यावर ताबा मिळवणार!