Sunday, April 20, 2014

लोकसभेसाठी आम्हीच का? - राजकीय पक्षांचा एक परिसंवाद - भाग १


वसईमध्ये चिन्मय गवाणकर आणि मित्रमंडळी दोन - तीन संघटनाच्या माध्यमातून सुरेख असे सामाजिक प्रबोधन घडविण्याचे कार्य गेल्या काही वर्षात करीत आले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि जागरूक नागरिक संस्था वसई ह्या दोन संस्था ह्या बाबतीत प्रामुख्याने गणल्या जातील. १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागरूक नागरिक संस्था वसई ह्यांनी प्रमुख राजकीय पक्षांना राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची एक प्रश्नावली सादर केली होती आणि ह्या प्रश्नांबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय स्पष्ट करण्याची विनंती केली होती. परंतु दुर्दैवाने दिलेल्या मुदतीत ह्या प्रश्नावलीला उत्तर देण्याची तसदी एकाही पक्षाने घेतली नाही. परंतु त्याने नाउमेद न होता शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ह्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना एका व्यासपीठावर बोलावून लोकसभेसाठी आपल्याच पक्षाची निवड लोकांनी का करावी हे पटवून देण्याचे आव्हान करण्यात आले होते. समाधानाची गोष्ट म्हणजे ह्या राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना पाठवलं आणि एका सुरेख बौद्धिक चर्चेत सहभाग घेतला. मी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला तो आपल्या सर्वांना मिळावा म्हणून ही ब्लॉग पोस्ट! ह्यातील माझ्या नोंदी १०० टक्के अचूक असतीलच असे नाही त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी!




ह्या परिसंवादात भाग घेतलेले विविध पक्षांचे प्रतिनिधी ह्या प्रमाणे


डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (भाजपा)
श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी)
कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M)
श्री. राजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)


न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा सचिव चिन्मय आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर ह्यांनी ह्या कार्यक्रमाच्या संचालनाची जबाबदारी पार पाडली.


कार्यक्रमाच्या आरंभी चिन्मयने सर्व प्रतिनिधींना ह्या चर्चेचे स्वरूप राष्ट्रीय पातळीवरील धोरणासंबधित मुद्द्यांशी सीमित ठेवत तिला प्रत्यक्ष उमेदवारांसंबंधित मुद्द्यांवर न आणण्याचे आवाहन केले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सर्वांनी ते पाळले. प्रत्येक प्रतिनिधीला वीस मिनिटाची मर्यादा आखून देण्यात आली होती.




श्री. गजानन खातू (आम आदमी पार्टी)
सर्वप्रथम आम आदमी पक्षाचे श्री गजानन खातू आपल्या पक्षाचा जाहीरनामा / धोरण स्पष्ट करण्यासाठी व्यासपीठावर आले. भ्रष्टाचार हा केवळ एकच मुद्दा घेऊन आप पक्ष आपला लढा लढत असल्याचा काहीसा गैरसमज समाजात दुर्दैवाने पसरला असून ती सत्यपरिस्थिती नाही; शेती, संरक्षण, अंतर्गत सुरक्षा अशा अनेक मुद्द्यासहीत एकूण ३६ मुद्दे असलेला आप पक्षाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ह्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त भ्रष्टाचार, प्रशासकीय कारभार (Governance) अशा व्यापक मुद्द्यावर चर्चा होईल अशी आपली अपेक्षा होती परंतु मुख्य पक्षांनी सर्व रोख व्यक्तीकेंद्रित चर्चेकडे वळविला आहे. प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचे वैशिष्ट्य असते जसे की डाव्या पक्षांची बंदिस्त विचारसरणी, उजव्या विचारसरणीचा भाजपा, गेल्या काही वर्षात मुक्त आर्थिक धोरणाचा अंगीकार करणारा काँग्रेस पक्ष वगैरे. खरे तर समता, बंधुता ह्या सारख्या जीवनमुल्यांना खोलवर स्पर्श करणारी आपली भारतीय घटना अंगीकारणे हाच एक मोठा जाहीरनामा असू शकतो. ह्या घटनेने दाखवून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे हे ही मोठे काम आहे.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा दोन पातळीवर असतो. राष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल विधेयक वगैरे मार्ग आप पक्षाने अनुसरले आहेत. परंतु दैनदिन व्यवहारातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. स्थानिक पातळीवर समित्या नेमल्या जातील. पोलिस यंत्रणा ह्या समित्यांबरोबर समन्वय साधेल. इथे खरे तर खातू ह्यांनी answerable असा शब्दप्रयोग केला. आप पक्ष स्वराज बिलाचा पाठपुरावा करेल. लोकपाल कायद्याच्या अखत्यारीत पंतप्रधानसुद्धा यावेत असा प्रयत्न केला जाईल. सध्याची निवडणूक प्रसारमाध्यमाद्वारे लढविली जात आहे. ह्यात पैशाचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो.
निवडणुकीच्या सद्य प्रणालीत बदल घडवून आणण्याचा आप पक्षाचा प्रयत्न राहील. हल्ली असे आढळून येते की एखाद्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात २ - ३ टक्क्यांचा जरी फरक पडला तरीसुद्धा त्यांना मिळालेल्या जागांमध्ये १० - १०० इतका लक्षणीय बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात राजकीय पक्षांना जागा मिळाव्यात ह्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आप पक्षाचा मानस आहे. त्यानंतर खातू ह्यांच्या बोलण्याचा रोख भांडवलशाहीकडे वळला. आज खुल्या स्वरुपात भांडवलशाही जरी अस्तित्वात नसली तरी छुप्या स्वरुपात ती नक्कीच आहे.  ज्याच्या उत्पादन खर्च केवळ २ रुपये १० पैसे प्रतीयुनिट  आहे अशी गोष्ट एक मोठी कंपनी ४ रुपये २० पैशाच्या  किमान दराने वीज विकते ही भांडवलशाहीच आहे. आपल्या देशाचा GDP ८ - १०% टक्क्यांनी वाढले ह्यात भांडवलशाहीचा वाटा किती? वेतनआयोगामुळे पगारवाढ होते तीही GDP मध्ये समाविष्ट होतेच ना! आपल्या देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पादन हे कृषीउत्पादन आहे पण त्यावर देशातील ५० टक्के जनता अवलंबून आहे. आज वसईची स्थिती अशी आहे की इथे केवळ १० टक्के वस्तूंची निर्यात केली जाते पण ९० टक्के वस्तू आयात केल्या जातात. आपला देश सोने आणि तेलाचा मोठा उपभोक्ता आहे. मध्यंतरी आपल्या देशाची तुट कमी झाली त्यात मुख्य कारण आपण त्या कालावधीत सोन्याची आयात कमी केली हे होते. आपल्या देशातील शेतीविषयक चर्चा प्रामुख्याने शेतीउत्पादनाच्या अनुषंगाने होते. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. आप पक्ष शेतकऱ्यांसाठी कमिशनचा पाठपुरावा करील. शेतकऱ्यांना उत्पनाचे संरक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करतं. परंतु पुढील मोसमात शेतकरी उभा कसा राहणार ह्याचा विचार कोणी करीत नाही. मधल्या सहा महिन्यातील शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे काय? मुख्य खनिज, पाणी ह्यासारख्या स्त्रोतांवर सरकारचं जरी नियंत्रण असलं तरी त्याच्या वापरासाठी जनतेची संमती आवश्यक असायला हवी. पावसाच्या पाण्यावर स्थानिक जनतेचा हक्क असायला हवा. अशा शब्दांत खातू ह्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.


कॉम्रेड के. प्रकाशन (CPI - M)
कम्युनिस्ट पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे निधन झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित प्रतिनिधी ह्या समारंभास हजर राहू शकले नाहीत आणि त्याऐवजी कॉम्रेड प्रकाशन  ह्यांनी इथे उपस्थिती लावली. १९९७ साली मी केमटेक्स मध्ये असतानाचे प्रकाशन हे माझे सहकारी! आपल्या पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील समस्यांवर १७ मुद्द्यांचे एक कागदपत्र प्रसिद्ध केले आहे. आधी खातू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात पक्षाला लोकसभेत जागा मिळायला हव्यात. प्रत्येक पक्षाने आपल्या पसंतीक्रमानुसार आधीच एक यादी प्रसिद्ध करावयास हवी. समजा त्या पक्षास टक्केवारीच्या प्रमाणानुसार १० जागा मिळत असतील तर ह्या यादीतील पहिले १० उमेदवार लोकसभेत निवडले जातील.
राज्यपातळीवर जे निर्णय घेतले जातात त्यासाठी विधानसभेची परवानगी असणे आवश्यक असावे. तेलंगणा निर्मितीचा निर्णय लोकसभेत घेतला गेला हे चुकीचे आहे. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही निर्णय केवळ केंद्रातील मंत्रिमंडळ घेते ते चुकीचे आहे. ह्या निर्णयांत लोकसभेतील सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मध्यंतरी प्रणव मुखर्जी अमेरिकेत असताना संरक्षणविषयक एक करार होऊ घातला आणि मग अचानक तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना तातडीने अमेरिकेत नेण्याची वेळ आली. ह्या प्रक्रियेत ह्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा सुरुवातीपासून समावेश असणे गरजेचे होते. आमचा पक्ष संशोधनास योग्य प्रोत्साहन देईल.
देशात आज विविध प्रकारे लोकसंख्येचे स्थलांतर सुरु आहे. जसे की मुंबईतील जनता वसईत स्थलांतरित होत आहे. दीड - दोन कोटींची सदनिका विकत घेणे बहुसंख्य जनतेच्या आवाक्याबाहेर आहे. अशा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावयास हवे. सर्व जेष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन कसे मिळेल ह्याचा विचार करावयास हवा. आज आपल्या देशातील गरिबांची परिस्थिती फार बिकट आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षण, लसीकरण ह्यासारख्या मुलभूत सोयी पोहोचत नाहीत. आपल्या देशातील गरिबांची संख्या वाढत चालली आहे असे आपण म्हणतो. आपल्या अपत्यांच्या जगण्याची शाश्वती नसल्याने अधिक अपत्य होऊन देण्याकडे गरीबांचा कल असतो. आज राजकारणात विविध कार्यकर्त्यांची सेवा पैसा फेकून विकत घेतली जाते. दिवसाचा दर ७५० ते १००० रुपयांपर्यंत असतो. ह्याला आमचा पक्ष अपवाद आहे. करोडो रुपये प्रसारमाध्यमांवर, परदेशी कन्सल्टिंग फर्मवर खर्च केले जातात. एखादा ब्रैंड निर्माण करण्यासाठी अफाट पैसा राजकारणात सुद्धा खर्च केला जातो. मोठमोठाल्या उद्योगांनी, विविध वृत्तवाहिन्यांनी  निवडणुकीत न भूतो न भविष्यति असा रस घेतल्याचे दिसून येते. मुसोलिनी ज्याचे नाव fascism शी निगडीत आहे त्याने म्हटले होते, 'fascism should rightly be called corporatism'. आज भारतात आपणास मोठमोठाले उद्योग आणि राजकीय शक्तींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया दिसत आहे. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा अशा प्रकारचा फेसिझम उदयास येताना दिसतोय. सुमारे वीस वर्षांपूर्वी भारतात उदार आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि विदेशी गुंतवणुकीस चालना देण्यात आली. बऱ्याच वेळा विदेशी गुंतवणूक भांडवलशाहीला प्रोत्साहन देते. त्यांना समाजकल्याणकरणाऱ्या योजनांवर पैसा खर्च केलेला आवडत नाही. समाजकल्याणकरी योजनांच्या अभावी दूरदृष्टीने पाहिले असताना समाज काहीसा दुर्बल बनतो. रोजगाराचे प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले असे आपण म्हणतो, पण १.५ % ह्या दराने वाढणाऱ्या लोकसंख्येचे काय? आणि बरेच रोजगार (उदाहरणार्थ कुरियर बॉय, बूटपॉलीश करणारे) असे आहेत की ज्यात आत्मसन्मान नाही. आमचा पक्ष ट्रेड युनियनआधारित राजकारणास प्रोत्साहन देईल. हक्काधारित राजकारण करण्याकडे आमचा कल राहील. अन्नाचा हक्क सर्वांना मिळावा असा आमचा प्रयत्न राहील. काँग्रेसने फूड बिल आणले. पण ते केवळ वार्षिक उत्पन्न ५९००० रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या लोकांसाठी आहे. ह्या उत्पन्नाखालील लोक हे आर्थिकदृष्ट्या अगदी दुर्बल असे मानले जाऊ शकतात. आमचा पक्ष बहुतांशी लोकांसाठी अन्नाचा हक्क आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारत हा देश विशाल आहे. ह्या देशावर कोणी एकच पक्ष सत्ताधारी बनू शकतो असे मानणे चुकीचे राहील. त्यामुळे आमचा पक्ष सदैव युतीच्या सरकारांच्या तत्वाचा पुरस्कार करीत आला आहे. ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार नाहीत तिथे आम्ही आप पक्षाला विनाअट पाठींबा देऊ.


डॉ. सहस्त्रबुद्धे भाजपा 
रुईया कॉलेजात वर्टी सरांच्या शिक्षकी पेशातील कालावधी मी अनुभवला आहे.
१९७७ सालानंतर काँग्रेसेतर पक्ष सुद्धा शासन देऊ शकतात हा समज हळूहळू पसरू लागला होता. ह्या कालावधीत भाजपाने काँग्रेसनंतरचा दुसरा क्रमाकांचा पक्ष म्हणून आपले स्थान पक्के करण्यास सुरुवात केली होती. १७ राज्यात भाजपाने स्वतः किंवा मित्र पक्षांबरोबर आघाडीचे सरकार आणले आहे. हा तुलना करण्यासाठी ऐवज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे १९९८ ते २००४ ह्या कालावधीतील वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची कामगिरी आणि २००४ ते २०१४ ह्या कालावधीतील काँग्रेस पक्षाची कामगिरी हा तुलना करण्यासाठीचा ऐवज उपलब्ध आहे. गुजरात राज्यातील विकास आकड्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख केला जातो. पण मुख्य म्हणजे चांगले जीवन जगण्याच्या जनतेच्या आकांक्षेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारची कामगिरी पाहिली असता विकासाचा घटता दर, गमावलेली आंतरराष्ट्रीय पत ह्या गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. आमचा पक्ष अधिकाराधिष्टीत राजकारणाचा पाठपुरावा करील. गेल्या दहा वर्षात नेतृत्वाची अकार्यक्षमता प्रामुख्याने नजरेत भरते. पूर्वी चीन आणि भारत ह्यांची जोडीने तुलना केली जात असे. परंतु सध्या तसे आढळत नाही. आपणास दुहेरी नेतृत्व पहावयास मिळाले. पंतप्रधानांकडे असलेली मर्यादित निर्णयक्षमता पहावयास मिळाली. भ्रष्टाचार, कुशासन ह्या समस्यांनी आपणास व्यापले गेले आहे. सकारात्मक, हेतुपूर्वक राजकारण करण्याकडे भाजपचा कल राहील. भारतात एकंदरीत १३५० च्या आसपास राजकीय पक्ष आहेत. त्यातील सुमारे ५० पक्षांचे विधायक / लोकप्रतिनिधी आहेत. ह्या ५० पक्षांपैकी ४० पक्ष घराणेशाहीशी संबंधित असल्याचे आपणास आढळून येते. उरलेल्या १० पक्षांपैकी ३ कम्युनिस्ट पक्ष आहेत आणि १ पक्ष भाजपा हा आहे. Politics ऑफ performance (कामगिरीआधारित राजकारण) करण्याकडे आमचा कल राहील.  सध्या एकंदरीत सामान्य जनतेच्या मनात लोकशाही, निवडणुका ह्या प्रकाराविषयी औदासिन्य आल्याचे आढळून येते. लोकशाहीने माझ्या ताटात काय वाढलं? हा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे. परंतु भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे तिथे बऱ्याच वेळा ते पुन्हा निवडले गेल्याचे आपणास आढळून येते. शहर वाहतुकीचा सफल प्रयोग झालेले अहमदाबाद हे भारतातील एकमेव शहर आहे. कृषिविकासाचा दर गुजरातमध्ये १० टक्के तर मध्य प्रदेशात १६ टक्के आहे. सर्वसमाविष्ट विकास (inclusive / participative  development) करण्याकडे आमचा कल राहील. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आम्ही हाताळू. संरक्षणखात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे जे आरोप होत आहेत त्याकडे आम्ही लक्ष देवू. आपल्या भारतात नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली जी  चार पाच राज्ये आहेत त्यांतील प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येतो. हे समन्वय आणण्याकडे आमचा कल राहील. बालसंगोपन, आरोग्य ह्या मुद्द्यांकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष पुरवू. मातृत्वाच्या सुट्टीसोबत पितृत्वाची रजासुद्धा मिळावी असा आमचा प्रयत्न राहील. नोकरीवर जाणाऱ्या स्त्रियांच्या अपत्यांसाठी पाळणाघराची सोय केली जाईल. अपत्यपालनासाठी मातेला दीर्घकालीन मुदतीची रजा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कुपोषण ही एक गंभीर समस्या आहे त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोयाबीन आपण निर्यात करतो आणि ते परदेशात डुक्करांना खाऊ घातले जावून त्याचा मासनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. हेच सोयाबीन वापरून त्याचे लाडू बनवले असता कुपोषणग्रस्त भागात त्याचा उपयोग मुलांना खाद्य म्हणून केला जाऊ शकतो असे आढळून आले आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. आपल्या देशातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे अगदी वाईट स्थितीत आहेत. आर्थिक दृष्ट्या ती फायदेशीर नाहीत. पण त्यांच्याकडे सभोवताली बराच मोठा परिसर असतो. त्याचा व्यावसायिक वापर करून ह्या  आरोग्यकेंद्रांची स्थिती सुधारता येऊ शकते. अशा उदाहरणात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा योग्य मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न राहील. छोट्या मुदतीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आम्ही पाठपुरावा करू. जनतेच्या भोवतालच्या परिसरात चांगल्या शाळा असाव्यात असा आमचा प्रयत्न राहील. बऱ्याच वेळा प्रसार आणि गुणवत्ता ह्याचे व्यस्त प्रमाण दिसून येते. आपल्या देशात उच्च शिक्षणाचा मोठा प्रसार झाला. रोजगाराची उपलब्धता हा प्रश्न राहिला नसून रोजगार देण्यालायक युवक उपलब्ध नाहीत हा खरा प्रश्न आहे! कला आणि विज्ञानक्षेत्रातील पदवीधरांना पाच ते सहा महीने इंटर्नशिप मिळावी असा आमचा प्रयत्न राहिला. एका खिडकीत परमिट मिळून देण्याकडे आमचा प्रयत्न राहील. सरकारी कार्यालयात काम होत नाही असा आपला अनुभव असेल परंतु मध्य प्रदेशचे उदाहरण पहा. तिथे जन्म, मृत्यू दाखला आणि इतर नेहमीच्या कामासाठी सरासरी किती वेळ लागेल ह्याचा आलेखच मांडलेला असतो. त्याच्या पलीकडे वेळ लागल्यास त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पुरुषांच्या मानासिकेत बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. गुजरात राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रशिक्षण दिले जाते.
आम्ही अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देऊ. शेती आणि प्रयोगशाळा ह्यांची सांगड घालू. जमिनीचे पृथ्थकरण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. नद्या जोडण्याचा जो प्रकल्प आहे त्यातील पर्यावरणाला हानिकारक असलेला भाग काढून टाकून त्याची अंमलबजावणी करू. भूजलाची पातळी वाढविण्याचे आमचे प्रयत्न राहतील. पर्यायी उर्जास्त्रोत विकसित करू, कालव्यावर सोलर पत्रे बसवून ऊर्जानिर्मितीचा जो प्रयोग भाजपशासित राज्यात झाला तसेच प्रयोग करू.
आज सामान्य जनतेत एका प्रकारचे औदासिन्य (sense ऑफ given up) आला आहे ते आम्ही दूर करू. महाशक्ती बनण्याचे भारताचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते. शेवटी एका वाक्य सांगू इच्छितो - थोर माणसे काही वेगळ्या गोष्टी करीत नाहीत ते नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात!)


पुढील भागात
राजीव पाटील - बहुजन विकास पार्टी भाषण
ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर भाषण
प्रश्नोत्तरे
















Monday, April 14, 2014

Cool… अनुकूल की प्रतिकूल !


इंग्लिशमध्ये 'aging gracefully' असा एक शब्दप्रयोग आहे. वयोमानपरत्वे शरीरात आणि मनोभूमिकेत होणारे बदल परिपक्वतेने स्वीकारून त्यानुसार आपलं वागणं बदलणं आणि योग्य अशा कार्यामध्ये आपले मन गुंतवून घेणं असा काहीसा त्याचा ढोबळमानाने अर्थ घेतला जाऊ शकतो.
हल्लीच्या इंटरनेटच्या युगात ह्या संकल्पनेच्या काहीसं विरुद्ध असं वागणं पाहायला मिळतं. चाळीशी- पन्नाशीला पोहोचलेले पालक आपल्या पाल्यांसोबत तरुणाईच्या सर्व कुल क्रियांमध्ये सहभागी होत असताना दिसत आहेत. पाल्यांनाही हेच हवे असते. दिसणं, वागणं ह्या सर्वांमध्ये पालकांनी आपल्यासोबत असावे असे त्यांना वाटत राहत आणि त्यामुळे पालकसुद्धा बऱ्याच वेळा त्यांचा हट्ट पुरा करतात.
ह्या लोकी जीवनाची गंभीर बाजू कोणाला चुकली नाही. जन्मलेल्या प्रत्येकासमोर काही ना काही समस्या, क्लिष्ट कामे असतात. काही जण शांत वेळ मिळताच ह्या समस्यांवर विचार करतात. केवळ विचार करून समस्या सुटण्याची शक्यता कमी असते. विचारासोबत कृतीची सुद्धा आवश्यकता असते! परंतु विचार केल्यानं आपलं मन समस्यांचा, क्लिष्ट कामांचा विविध बाजूनं विचार करतं आणि त्यातून एखादा चांगला विचार, मार्ग निघू शकतो.
ह्या कुल बनण्याच्या प्रयत्नात आपण ही विचार करण्याची, मननाची बाजू गमावून बसलो आहोत. आपण स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा आणि आपलं कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे काही काळापुरते आपल्याला बरं वाटतं देखील! काहीजण आपल्या समस्यांचा विचार काही वेळापुरता का होईना पण दूर सारण्यासाठी ह्या तंत्राचा वापर करतात.
आजच्या ह्या छोटेखानी लेखाच सार एकच! कुल बनण्याच्या प्रयत्नात पालक म्हणून असलेल्या मुख्य जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होऊन देऊ नये. आयुष्यातील क्लिष्ट कामं, समस्या, जमेल तितका परोपकार, सामाजिक कार्य ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या करून तुम्हांला भले लाईक मिळणार नाहीत पण तुम्ही आपल्या पाल्यांसमोर काही आदर्श ठेवाल! नाहीतर गंभीरतेचे शून्य प्रमाण घेऊन वावरणाऱ्या पालकांना डोळ्यासमोर ठेवून मोठे होणाऱ्या आजच्या पाल्यांचे भवितव्य मोठे कठीण आहे. 

Thursday, April 10, 2014

बोलघेवड्या मोटारगाड्या !


मनुष्यप्राणी कधीच स्वस्थ बसत नाही. आहे त्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणता येईल ह्याचा मनुष्यप्राणी आणि त्याचा मेंदू सतत विचार करीत असतो. समाजातील व्यक्तींचे अनेक प्रकारात वर्गीकरण करता येतं. ज्यांना दोन वेळेचं पोट भरण्याची भ्रांत नाही असा एक प्रकार आणि ज्यांना ही भ्रांत आहे असा दुसरा प्रकार! पहिल्या प्रकारातील काही लोक फावल्या वेळात कधी विधायक काम करतात तर कधी विघातक! संशोधन हा काहीसा विधायक प्रकारच्या कामाचा प्रकार आहे! आता काहींना रोजीरोटीसाठी संशोधन करावं लागते ही वेगळी गोष्ट!
असो आता मूळ मुद्द्याकडे! विधायक प्रकारच्या कामाचे उदाहरण म्हणजे भविष्यात एकमेकांशी संवाद साधू शकणाऱ्या मोटारगाड्याविषयीचे संशोधन! अशा गाड्या नजीकच्या भविष्यकाळात रस्त्यावर धावू लागणार आहेत! आणि हे काही कल्पनाचित्र नव्हे; हे खरोखर घडेल अशी दाट शक्यता आहे. अगदी ढोबळमानाने बोलायचं झालं तर रस्त्यावर धावणाऱ्या मोटारगाड्या एकमेकांना सतत मेसेज पाठवत राहतील. आणि ह्यामागील मुख्य उद्दिष्ट रस्त्यावरील सुरक्षितता हे असेल. गाड्यातील तांत्रिक बिघाड आणि मद्यपी चालक ह्यांच्यामुळे होणारे अपघात वगळता बाकीचे ८० टक्के अपघात अशा ह्या प्रस्तावित तंत्रज्ञानामुळे टाळले जाऊ शकतात असा अंदाज आहे! प्रत्येक गाडीतील यंत्रणा गाडीचे सद्यस्थान, वेग आणि संबंधित माहिती सेकंदाला अंदाजे १० मेसेज ह्या वेगाने पाठवीत राहील. हा संवाद रेडिओ सिग्नल आणि वाय - फाय तंत्रज्ञानाचा वापर करून साधला जाईल. जर दोन गाड्या एकमेकांवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर वाहनातील संगणक चालकास तत्काळ सतर्क करील. ह्या क्षणी चालक एक तर तात्काळ ब्रेक दाबेल किंवा गाडी दुसऱ्या दिशेला वळवेल! हल्ली जवळजवळ सर्वांकडे असलेले स्मार्टफोन गाडीतील संगणकाशी संपर्क करायला वापरले जाऊ शकतील असा अंदाज आहे. आणि त्यामुळे खर्च कमी होऊन ह्या तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रमाण वाढीस लागेल असा अंदाज आहे.
कागदावर वाचण्यास नक्कीच सुरेख कल्पना आहे ही! परंतु ह्यातील काही संभाव्य त्रुटी खालीलप्रमाणे (अमेरिकेतील वापरासाठी!!)
१> ह्या तंत्रज्ञानाचा सर्व गाड्यांनी वापर करणे आवश्यक आहे. समजा अर्ध्या गाड्यांत हे तंत्रज्ञान आहे आणि अर्ध्यात नाही असला प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो.
२> बराच वेळ, दिवस  सर्व काही सुरुळीत चाललं तर चालक गाफील राहू शकतो आणि ज्यावेळी खरोखर गरज आहे तेव्हा गडबड होऊ शकते.
३> समजा संदेशवहनाचे नेटवर्क अचानक बंद पडले तर रस्त्यावर सावळागोंधळ माजेल! अधिक गंभीर गोष्ट म्हणजे बंद पडायच्या क्षणी आणि त्यानंतर काही मिनिटे अपघाताची दाट शक्यता उद्भवेल!
४> घातपात करणाऱ्यांसाठी हे एक मुख्य लक्ष ठरू शकते.
५> हे तंत्रज्ञान सतत वापरात राहिलं तर एक वेळ अशी येईल की स्वतः गाडी चालवलेले मनुष्यप्राणी दुर्मिळ होतील! जसे की हल्लीचा चांगल्या संस्कृतीच्या लोप पावण्याचा काळ सुरु आहे. ज्यांनी चांगला सुसंस्कृत काळ पाहिला आहे त्यांना ही थेरं आवडत नाहीत. परंतु सतत हेच चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल ज्यावेळी ही थेरं म्हणजेच समाजाची संस्कृती बनेल.


असो ह्या तंत्रज्ञानांचे भारतीय रूप काही काळाने मुंबईत सुद्धा येईल. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांचे काही संवाद खालीलप्रमाणे!
१) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - "जरा जपून ग बाई! सिग्नल तोडू नकोस. मामा सिग्नलच्या पुढे लपून बसला आहे!"
२) सिग्नल चालू असतानासुद्धा आपल्या हातवाऱ्यांनी वाहतुकीचा बोऱ्या वाजविणाऱ्या हवालदारास - "अरे! काय चालवलंय काय तू ? व्यायाम करायचा असेल तर घरी जाऊन कर की! आमचा गोंधळ करू नकोस!"
३) एक गाडी आपल्या मागच्या गाडीला संदेश पाठवेल - " अग बाई! काय मोठा खड्डा होता हा! कंबरच मोडली माझी! बाम वगैरे आहे का तुझ्याकडे !
४) मोटार गाडी बेस्ट बसला - " अग लालुताई! बसस्टॉप वरून तुला तिरकच निघायला हवे काय? जरा सरळ चाल की!
५) मोटार गाडी रिक्षाला - "अग बाई! स्वतःची ताकद ओळख आणि उगाच भ्रुभ्रु करत माझ्याशी स्पर्धा करू नकोस!
६) मोटारगाडी रिक्षाला - "१८० अंशातून मान वळवली तर मोडणार नाय का?"
७) रस्त्याच्या उजव्या बाजूने उलट्या दिशेने भैय्याला घेऊन  येणाऱ्या सायकलीस - "एक जराशी चापटी मारली तर तुझ्या मालकासकट जमीनदोस्त होशील!"
८) कट मारणाऱ्या बाईकला "अग जीव द्यायचा असेल तर एकटी जाऊन जीव दे! उगाच मला आणि माझ्या मालकाला अडकवू नकोस!"


कालांतराने सभ्य भाषेतील संवाद काहीसा प्रभावी ठरत नाही असे प्रतिसाद मोटरगाड्या बनविणाऱ्या कंपन्यांना पाठविला जाईल. मग गाड्यांची अनेक मॉडेल्स बाहेर येतील - सुसंस्कृत स्विफ्ट, मराठीतून शेलके शब्दांचे आहेर देणारी स्विफ्ट, हिंदी - इंग्लिश मधून अपशब्द वापरणारी स्विफ्ट वगैरे वगैरे! अजून काही वेळाने ह्या भांडणात दुसऱ्या गाडीच्या मालकाशी सुद्धा सुसंवाद साधण्याची गरज भासेल. त्याचेही संशोधन होईल. "अबे बेवडे, दिखता नही क्या!" एखादी होंडा सिटी दुसऱ्या टोयाटोच्या मालकाला सांगेल. जर ते टोयाटोचे भडकू मॉडेल असेल तर ती स्वतःच होंडा सिटीवर चाल करून जाईल!


धन्य तो माणूस आणि धन्य त्या संशोधनाच्या विपुल संध्या!



Wednesday, April 9, 2014

पुन्हा आभास - भाग ४


सितुने  पहिल्या भागाचं बरंच खोल विश्लेषण केलं होतं. सिंडीच्या वास्तवातील स्वभावाशी सुसंगत अशी तिचे प्रयोगातील वागणूक पाहून तो खुश झाला होता.  प्रयोगातील बॉसचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी सितुकडे अजून पुरेशी माहिती नव्हती. त्याला ह्या विश्लेषणाची माहिती मायकलला प्रत्यक्ष भेटून द्यायची होती. परंतु प्रत्यक्ष भेटण्यासाठी मायकलकडे वेळ नसल्याने सर्व संवाद ई मेल वरच चालला होता. आणि मग मायकलला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम निघाल्याने त्याने आपल्या एका वरिष्ठ विश्वासू सहकाऱ्याकडे ह्या प्रयोगाचा कारभार सोपवला होता. तो सहकारी इस्ट कोस्ट (पूर्व किनारपट्टीवरील) न्यूयॉर्कला असल्याने त्यानेही सुरुवातीचा काही काळ ई मेल द्वारे संवाद सुरु ठेवूयात असे सितुला सुचविले. प्रयोगातील सिंडीच्या व्यक्तिमत्वाचे बॉसविषयी एकंदरीत कसे मत बनले आहे असा प्रश्न त्याने सितुला विचारला. "सध्यातरी फक्त आदर आहे बाकी काही नाही" मॉडेलच्या विश्लेषणाकडे पाहत सितुने उत्तर दिले.


पुढील काही दिवस सिंडी बराच विचार करीत होती. त्या परीक्षणाच्या कालावधीत नक्की काय घडलं हे आठवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत होती परंतु तिला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे ती बरीच बेचैन होती, आपल्या सुरक्षिततेला ह्या प्रयोगात काही धोका तर उद्भवणार नाही ना अशीही शंका तिच्या मनात येऊन गेली. परंतु इतक्या सहजासहजी हार मानणारी ती नव्हती. पुढील परीक्षणात अजून चांगला प्रयत्न करून जागृतावस्थेत राहण्याचा निर्धार तिने मनोमन केला होता. गाढ झोपेतील मनाची अवस्था आणि त्यात पडणारी / न पडणारी स्वप्ने ह्या विषयावर तिने बरेच वाचनसुद्धा केले. त्या विषयातील वाचनात तिला बराच रस वाटू लागला होता. त्यानंतर ती 'Lucid Dreams' ह्या विषयाकडे वळाली. स्वप्ने चालू असताना स्वतःला आपण स्वप्नात आहोत ह्याचे भान आणून देणे आणि मग त्यापुढे आपली स्वप्ने आपण नियंत्रणात आणणे हा विषय तिला खूप भावला. स्वप्ने नियंत्रणात आणण्याची विविध तंत्रे तिने वाचून काढली. शनिवारी रात्री जॉनला स्वप्नात आणण्याचे ठरवून ती झोपी गेली. पहाटे केव्हातरी जॉन स्वप्नात आल्यावर तिचा आनंद पराकोटीला पोहोचला. त्या खुशीतच तिने पहाटे चार वाजता जॉनला फोन लावला. अशा कारणास्तव झोप मोडल्याने जॉन जबरदस्त वैतागला. परंतु आपल्या वैतागावर कसेबसे नियंत्रण ठेवून त्याने सिंडीला झोपी जायला सांगितलं.


दुसरा आठवडा सुरु झाला. आपण स्वप्नात जॉनला आणू शकलो हे आपल्या तंत्रांच्या अंमलबजावणीचा परिणाम की निव्वळ योगायोग हे तिला समजत नव्हते. आणि स्वप्ने नियंत्रित करणे आणि ह्या परीक्षणातील आपले वागणे नियंत्रित करणे ह्या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्याचेही तिला भान होते. तरीही ह्या दोन्हीही मेंदूच्या आभासावस्था असल्याने जर आपण एका अवस्थेत आपले वागणे नियंत्रित करू शकलो तर दुसऱ्यामध्ये सुद्धा करू शकू असा आत्मविश्वास ती बाळगून होती.
अजूनही सिंडीला दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं नसल्याने तिची बेचैनी काहीशी वाढली होती. तिने सहजच आपल्या ऑफिसात फोन लावला. पण वाँग किंवा दुसऱ्या कोणीही फोनवर यायला नकारच दिला. कामाचं निमित्त सांगून ते फोन घेत नव्हते. सिंडीची निराशा पराकोटीला पोहोचत होती. नशिबाने अशा परिस्थितीत तिला पुढच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं.
सिंडी दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ऑफिसात पोहोचली. प्रयोगाचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. पुन्हा गॉगल आणि हेडफोन! मग इंटर बटण आणि मग संरक्षक कवच; त्यानंतर सौम्य झटका, मंद गूढ संगीत आणि झपाट्याने सरकणाऱ्या रंगबेरंगी प्रतिमा! पहिल्या वेळेपेक्षा आपली जागृतावस्था अधिक वेळ कायम ठेवण्यात सिंडीने यश मिळविले. पण जोपर्यंत आपण निद्रितावस्थेत जात नाहीत तोपर्यंत संगीत आणि प्रतिमांचा खेळ चालू राहणार हे ही ती समजून चुकली. मग तिने निद्रितावस्थेत जाण्याचं सोंग आणण्याचा प्रयत्न केला. ते सोंग आणि खरोखरीची  निद्रीतावस्था ह्याच्या सीमारेषेवर असताना दुसरा टप्पा सुरु झाला.
प्रोजेक्ट लीड सिंडीला भेटण्यास आला होता. तो एकदम खुशीत होता. कंपनीचा मालक एकंदरीत प्रोजेक्टच्या प्रगतीवर आणि सिंडीच्या हुशारीवर खुश होता. एकंदरीत सर्व टीमचे भविष्य उज्ज्वल दिसत होते. कंपनीच्या मालकाने प्रोजेक्ट लीड आणि सिंडीला चर्चेसाठी मुख्य कार्यालयात बोलावले होते. दुपारी ३ वाजता ही मीटिंग ठरली होती. सिंडीने ह्या मीटिंगसाठी तयारी चालू केली आणि चर्चेसाठीच्या मुद्द्यांची नोंद काढून ठेवली. अचानक तिचे घड्याळाकडे लक्ष गेले. दीड वाजला होता. ती दचकली, तिने झटपट सैंडविच खाऊन आपले दुपारचे भोजन आटपून घेतलं. सव्वादोनला निघायचं होतं. अचानक टीमलीडचा फोन आला, त्याला एक तातडीच्या प्रॉब्लेमवर काम करावं लागणार होतं आणि तो येऊ शकत नव्हता. सिंडी आता एकदम तणावाखाली आली.  तिला कंपनीच्या मालकाबरोबरची मीटिंग एकटीला सांभाळावी लागणार होती. सव्वादोनला कॅब आली आणि सिंडी निघाली.
कंपनीचे मुख्य कार्यालय अगदी आलिशान होते. स्वागतकक्षात सिंडी पोहोचली तेव्हा पावणेतीनच वाजले होते. तिथल्या स्त्रीने सिंडीला थांबण्यास सांगितलं आणि शीतपेये ऑफर केली. शीतपेयाचे घोट घेता घेता आणि कार्यालयाचे सुंदर रूप न्याहाळताना तीन कसे वाजले हे सिंडीला कळलेच नाही. आणि मग तिला बॉसचे बोलावणं आलं. बॉसच्या केबीनच्या भव्यदिव्यतेने सिंडीचे डोळे दिपून गेले. परंतु आता चर्चेस सुरुवात झाली होती आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. बॉस एकदम आता खोलात शिरला होता. ह्या संकल्पित संरचेनेविषयी तो अगदी बारीकसारीक तपशीलवार प्रश्न विचारू लागला होता. एका प्रश्नावर सिंडी अडखळली आणि त्या क्षणी तिला हा प्रयोग चालू आहे ह्याची जाणीव झाली. जागृतावस्थेतील सिंडीला ह्या प्रश्नाचे उत्तर माहित होते आणि ते तिने झटकन दिले. पण तिची ही जागृतावस्था केवळ क्षणभर टिकली. पुढील चर्चा मात्र सुरेख झाली. बॉसच्या चेहऱ्यावर खुशी ओसंडून वाहत होती. "आपण एकदा कॉफी पिण्यास बाहेर जाऊयात" बॉसच्या ह्या निमंत्रणाने ही मीटिंग संपली. आणि प्रयोगचा दुसरा टप्पाही!
घरी परतल्यावर सिंडी बराच विचार करीत होती. त्या प्रयोगातील जागृतावस्थेतील त्या एका क्षणावर ती खूप खुश होती. तिच्या इतक्या मेहनतीला यश मिळाले होते. अचानक तिला बॉसने घातलेला टाय आठवला. असाच टाय आपण कोठेतरी पाहिला आहे असे तिला राहून राहून वाटत होते. नक्की कोठे हे आठविण्याचा प्रयत्न करता करता तिचा डोळा लागला. 

Wednesday, April 2, 2014

पुन्हा आभास - भाग ३


सिंडी आपली ह्या आव्हानात्मक प्रोजेक्टसाठी निवड झाल्याने अगदी खुशीत होती. तिला एका आठवड्यातच कॅलिफोर्निआतील दुसऱ्या एका ठिकाणी ह्यासाठी हजर व्हायचं होते. जवळजवळ सहा महिन्याचे हे प्रोजेक्ट तिथूनच पार पाडायचं होते. तिचा खास मित्र जॉन ह्यामुळे बराच नाराज होता.
सितुने आपलं पूर्णपणे विकसित केलेलं मॉडेल मायकलच्या स्वाधीन केलं. मायकलने ह्या भेटीत त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ही सर्व माहिती गोपनीय राहणे फार महत्त्वाचे होते. करारामध्ये तसे खास कलमसुद्धा होते. मायकल आता एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर बिझी होणार होता. त्यामुळे त्याची भेट घेणे आता सितुला कठीण होणार होते. ई-मेल हेच केवळ संपर्काचे मध्यम राहणार होते. ह्या परिस्थितीवर सितु काही फारसा खुश नव्हता. परंतु आपण काहीसे विकलो गेलो आहोत हे त्याला कळून चुकले होते.
सिंडी रविवारी रात्री त्या ठिकाणच्या हॉटेलात जाऊन उतरली. एकंदरीत उत्सुकतेने तिच्या मनावर कब्जा केला होता. सकाळी ती दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. हे ही अत्याधुनिक हॉटेल होते. ते ऑफिस म्हणजे सुद्धा एक अलिशान सुट होता. त्याच्या दर्शनी भागात स्वागतासाठी एक स्त्री हजर होती. सिंडीचे तिने स्वागत केले. ऑफिसचे हे रूप पाहून सिंडी निराश झाली आणि काहीशी चिंतीतही! त्या स्वागतकक्षातील स्त्रीशिवाय माणसाचा तिथे मागमूस नव्हता. आपल्या फिंगरप्रिंटच्या आधारे सिंडीने आतल्या भागात प्रवेश केला. "वेलकम सिंडी!" ह्या स्वागतपर शब्दाने सिंडी अगदी दचकली. घाबरघुबर होऊन तिने त्या दालनाच्या सर्व भागावर नजर फिरवली. पण तिथल्या  मंद प्रकाशामुळे तिला फारसं काही दिसत नव्हतं. 'तू तयार असशील तर आपले स्थान ग्रहण करू शकतेस!" पुन्हा एकदा आवाज आला. एव्हाना तिची नजर अंधाराला सरावली असल्याने तिने आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर तिथे असलेले दोन छोटे स्पीकर  तिला दिसले. आता ती काहीशी धिटावली होती. एका मोठ्या स्क्रीनपुढे तिचे बसण्याचे  आसन होते. तिने पाण्याचा एक घोट घेऊन स्थानग्रहण केले. तिला तिचे फिंगरप्रिंट समोरच्या टेबलवर उमटविण्याचा संदेश पुन्हा ह्या स्पीकरने दिला. तिने बोटठसे उमटविताच स्क्रीन उजळून निघाली. "वेलकम सिंडी!" स्क्रीनवर अक्षरे उमटली. "सारखं सारखं वेलकम  काय चाललंय, कामाचं बोला!" आपला हा विचार तिने मनातच दाबून ठेवला. ह्या पुढील सूचना आता स्क्रीनवर येऊ लागल्या होत्या. सिंडीला एक विशिष्ट प्रकारचा गॉगल घालायची आणि हेडफोन लावायची सूचना देण्यात आली होती. हे सत्र सतत तीन तास चालणार होते आणि त्या अवधीसाठी सिंडी तयार असल्याचा होकार स्क्रीनने तिच्याकडून घेतला. एव्हाना त्या कक्षात मंद संगीत सुरु झाले होते.  गॉगल आणि हेडसेट घालून सज्ज झालेल्या सिंडीला तयार असल्यास समोरच्या कीबोर्डवरील इंटर बटण दाबण्याची सूचना स्क्रीनवरून आली. मनाचा हिय्या करून सिंडीने इंटर बटण दाबलं. सर्वप्रथम तिच्याभोवती सर्वत्र एक तारांचं कवच आलं. हे परीक्षण संपेपर्यंत हे कवच निघणार नाही हे ती समजून चुकली. हळूहळू तिला ह्या सर्व प्रकारात रस वाटू लागला होता! तिला अजून एक सौम्य झटका बसला आणि हेडसेटमधून हळूहळू मंद गूढ संगीत येऊ लागलं. गॉगलवर तिला हळूहळू अतिशय वेगाने पुढेमागे सरकणाऱ्या प्रतिमा दिसू लागल्या. हा सर्व प्रकार सिंडीचे भान हरपेपर्यंत चालला.
सिंडी आता एका कार्यालयात होती. तिच्या समोर एका महत्वाच्या प्रोजेक्टचे काम होते. सिंडी आपले सर्व कौशल्य पणाला लावून ह्या प्रोजेक्टची डेडलाईन पुरी करण्याचा प्रयत्न करीत होती. इतक्यात प्रोजेक्ट लीड धावतपळत सर्व टीमला बोलवायला आला. कंपनीचा मालक ह्या टीमला भेटण्यासाठी आला होता. सर्वजण धावतपळत त्याला भेटण्यास एका रुममध्ये गेले. कंपनीच्या मालकाने सर्व टीमची आतापर्यंतच्या केलेल्या कामाबद्दल स्तुती केली. आणि मग त्याने एका विशिष्ट भागाच्या संरचनेबद्दल (Design) खोलात जाऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. योगायोगाने म्हणा की काय पण सिंडीने ह्या भागावर काम केले होते. बॉसच्या पहिल्याच प्रश्नाला सिंडीने आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिलं. का कोणास ठाऊक, परंतु बॉसकडून त्याचे प्रत्युत्तर येण्यास थोडा वेळ लागला. ही चर्चा पुढे बराच वेळ रंगत गेली. मध्ये मध्ये बॉसचा प्रतिसाद धीम्या गतीने यायचा. हा भाग सोडला तर सिंडीने ह्या चर्चेचा मनापासून आनंद लुटला. आपल्या हुशारीचा खरोखर इथे वापर होतोय असे तिला वाटू लागले होते.
सिंडी पुन्हा भानावर आली. मंद प्रकाशातील तो कक्ष पाहून ती काहीशी अचंबित झाली होती. तिचे डोके काहीसं जड झालं होतं. दुपारचे दोन वाजून गेले होते. "तुमचे आजचे आणि किंबहुना ह्या आठवड्याचे काम संपलं आहे! पुढील कामाच्या दिवसाच्या माहितीसाठी तुम्हांला संपर्क केला जाईल!" मंद प्रकाशातील आवाजाचे हे बोलणे तिच्या कानाने टिपले.
सितुला बराच डेटा परीक्षणासाठी मिळाला होता. परीक्षणाचा पहिला टप्प्याचे तो कसे विश्लेषण करतो ह्यावर पुढच्या सर्व प्रयोगाचे भवितव्य ठरणार होतं!

Monday, March 31, 2014

पुन्हा आभास - भाग २


सितु घरी परतला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. नावापुरती झोप काढून सकाळी सात वाजता तो उठला. त्याचा होकार तसा ठरलाच होता. उठल्या उठल्या त्याने आपल्या वकील मित्राला फोन लावला. वकील मित्र त्याच्या सोबत मायकलकडे यायला तयार झाला. करारपत्र व्यवस्थित झाल्यास काही धोका नाही असे त्या मित्राचे म्हणणे होते. सितुने फोन करून दहा वाजताची मायकलच्या भेटीची वेळ ठरविली.
ठरल्याप्रमाणे दोघेजण मायकलच्या सूटवर ठीक दहा वाजता पोहोचले. वकीलमित्राला पाहून मायकलच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या. "ह्याची आपल्या ह्या चर्चेत गरज नाहीये! त्याला ह्या हॉटेलात फिरून येऊन देत. तोवर आपण माझ्या सर्व आवश्यक तपशिलाची चर्चा करूयात." मायकल ठामपणे म्हणाला, त्याला हो म्हणण्यावाचून सितुकडे पर्याय नव्हता.
तो वकीलमित्र बाहेर पडल्यावर मायकलने छापील कागदपत्रे बाहेर काढली. "अशा आहेत माझ्या गरजा!" असे म्हणून त्याने दोन तीन कागदे मायकलपुढे ठेवली. सितु अवाक होऊन वाचू लागला. मायकलने इतकी तयारी केली असेल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती. मायकलने स्त्री आणि पुरुष ह्यांच्या एकंदर प्रवासातील खालील टप्पे ठरविले होते.
१) दोन काहीसे परिचित पुरुष आणि स्त्री.
२) त्या दोघांची खास ओळख
३) ओळखीचे मैत्रीत आणि मग प्रेमात रुपांतर आणि मग एकत्र फिरणे
४)  विवाह
५) विवाह ते अपत्यआगमनापर्यंतचा काल
६) दोन्ही कडील नातेवाईक आणि मित्रमंडळीचा ह्या दोघांच्या जीवनावरील प्रभाव
७) दोघांचा नोकरी व्यवसाय - स्वरूप, आर्थिक प्राप्ती आणि नोकरीची ठिकाणे, वेळा
८) अपत्यांची संख्या आणि आगमनाचा कालावधी
९)  अंतिम अपत्यआगमनानंतर दहा वर्षाचा कालावधी
१०) त्या नंतरचा कालावधी
"आता  तू हे कसे हाताळणार ते सांग?" मायकलने विचारलं. सितुच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होते. त्यानेही झरझर कागदावर मुद्दे लिहावयास सुरुवात केली. मायकल एक कॉफी ब्रेक घेऊन आला तोवर सितु तयार होता. मधल्या वेळात त्याचा वकीलमित्र कंटाळून निघून गेला होता. सितुने दिलेला कागद मायकल वाचू लागला.
१) दोघांच्याही स्वभाववैशिष्ट्यांचे जमेल तितके पैलू ह्या मॉडेलमध्ये स्वीकारले जातील. जितकी अधिक आणि अचूक स्वभावपैलू गोळा करू शकतो तितका निकाल अधिक खात्रीशील!
२) दोघांनीही ऑनलाईन आभासी दुनियेत प्रवेश करायचा. त्यासाठी एका बंदिस्त खोलीची स्थापना केली जाणार.  एकदा आभासी दुनियेत प्रवेश केला की मग काही काळ ह्या व्यक्तींना एका मंद संगीताच्या तालीवर झोपविले जाणार. आणि मग त्यांचा मेंदूचा ताबा संगणक घेणार. ह्या कालावधीत मॉडेलमध्ये टाकलेल्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांचा त्यांच्या मेंदूवर छापा उठणार.
३) प्रत्येक टप्प्यात ह्या दोघांच्या जोडीसाठी वरील यादीतील ६, ७, ८, ९ मधील घटकांचा प्रभाव कसा पडतो ह्याची तपासणी करणाऱ्या विविध चाचण्या आखल्या जाणार. आणि ह्या जोडीने लॉगइन केल्यावर ह्या सर्व चाचण्याची म्हणजे तिथल्या विविध प्रसंगांची त्यांच्यावर तपासणी केली जाणार. त्यांना ह्या विविध प्रसंगातून जावे लागणार. एका टप्प्यातील सर्व चाचण्या झाल्या की ह्या चाचणीचा विस्तृत अहवाल सादर केला जाणार. ह्या चाचणीत जर ह्यातील कोणाचेही अधिक स्वभावपैलू मिळाले तर ते परत ह्या मॉडेलमध्ये टाकून मॉडेल विकसित केले जाणार.
४) जसेजसे अधिकाधिक टप्प्यांचे परीक्षण होत जाईल तसतसे ह्या नात्याच्या भविष्याविषयी भाकीत केले जाणार!


मायकलच्या चेहऱ्यावरील ख़ुशी अगदी स्पष्ट दिसत होती. मध्येच त्याला एक शंका आली.  त्याने विचारले, "जर आपण खरोखरच्या दोघांना ही परीक्षा द्यायला लावली तर?" "मग काय,  निकाल अजून अचूक येतील" सितुने तत्काळ उत्तर दिले खरे, पण मायकलच्या हेतूविषयी त्याला नक्कीच शंका आली! त्या शंकेचा मनातील विचार बाजूला ठेवून सितुने आपली योजना पुढे स्पष्ट करणे चालू ठेवले. ह्या आभासी जगातील विश्व प्रत्यक्षातील युगुलाच्या दुनियेशी जमेल तितके मिळतेजुळते असणे निकालाच्या अचूकतेच्या दृष्टीने फायदेशीर होते. "ह्या दोघांचीही सर्वच माहिती मी देऊ शकणार नाही" मायकल म्हणाला. "ठीक आहे" सितु म्हणाला.
पुढे दोन दिवसात करारपत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. आपल्याला मिळालेल्या सहा महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी सितुने कंबर कसून सुरुवात केली होती आणि इथे मायकलने सर्व माहिती गोळा करण्यास! जॉईनिंग बोनस बँकखात्यात जमा झाल्याने आणि घरबसल्या काम  असल्याने सितुच्या प्रकृतीत नको तितकी सुधारणा होत होती. पण वर्षाखेरीस जमा होऊ शकत असलेल्या १ मिलियन डॉलर्सकडे पाहत त्याने तब्येतीकडे सध्यातरी दुर्लक्ष करण्याचे ठरविले होते.
सहा महिने पाहता पाहता संपायला आले. सितुच्या मेहनतीला फळ येऊ लागले होते. मॉडेल तसे बऱ्यापैकी बनले होते. परंतु सितुला एकाच गोष्टीची खंत वाटत होती. ह्याचे परीक्षण करायला आपली एक मैत्रीण हवी होती! मोठ्या मुश्कीलेने त्याने हा विचार बाजूला सारला होता.


बे एरियातील अशाच एका ऑफिसात आज जरा जास्तच चहलपहल दिसत होती. कारणही तसेच होते. बॉस वाँग एका महात्वाकांशी प्रोजेक्टसाठी त्या ऑफिसातील एकाची निवड करणार होता. हे प्रोजेक्ट अगदी गोपनीय स्वरूपाचे होते आणि निवड झालेल्या कर्मचाऱ्यास सहा महिने एका विशिष्ट ठिकाणी काम करावे लागणार होते. ह्या प्रोजेक्टवर अगदी नवीन तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार असल्याने त्यावर काम करण्याची सर्वांचीच इच्छा होती. पाचजणांची गुणवत्तेनुसार अंतिम यादीत निवड झाली होती. आणि ते बऱ्यापैकी समान पातळीवर असल्याने त्यातील अंतिम एकाची निवड करण्यासाठी एका नवीन सॉफ्टवेयरचा वापर करण्यात येणार होता. लॉटरीसारखाच हा प्रकार होता. आणि सर्व कर्मचाऱ्यांना ही अंतिम निवड पाहण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
हे सॉफ्टवेयर जसजसे एकेका कर्मचाऱ्यांला वगळू लागले तसतसा पाहणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. शेवटी दोघेजण बाकी राहिले. रॉजर आणि सिंडी! केवळ गुणवत्तेनुसार पाहायला गेलं तर रॉजर नक्कीच उजवा होता. आणि शेवटची फेरी सुरु झाली, सॉफ्टवेयरने चित्रविचित्र आवाज आणि चित्र निर्माण केली. आणि शेवटी विजेता घोषित केला. सिंडीची निवड झाली होती. सर्वांबरोबर वाँगलाही आश्चर्य वाटलं. परंतु तो हाडाचा व्यवस्थापक होता. आपलं आश्चर्य बाजूला ठेवत त्याने सिंडीचे अभिनंदन केले. रॉजर काहीसा खिन्न झाला होता. परंतु त्यानेही मोकळ्या मनाने निर्णय स्वीकारला. मग सर्वजण आपापल्या कामाला लागले.
संध्याकाळी सात वाजता आपलं काम आटपले तेव्हा वाँगने सहज म्हणून ह्या  सॉफ्टवेयरचे पुन्हा एकदा ह्या पाचजणांच्या यादीवर परीक्षण करून पाहायचे ठरवलं. आणि अहो आश्चर्यम! पुन्हा सिंडीचीच निवड झाली. "कमाल आहे बुवा!" वाँग स्वतःशीच म्हणाला. अजून एकदा हे सॉफ्टवेयर वापरायचा मोह त्याला टाळता आला नाही. आणि पुन्हा सिंडीचीच निवड झाल्यावर मात्र तो काहीसा साशंक झाला. ह्या सॉफ्टवेयरच्या प्रत्येक वापराची नोंद होत आहे हे त्या बिचाऱ्याला कोठे माहित होते!

Friday, March 28, 2014

पुन्हा आभास - भाग १


सितु हताश होऊन सिलिकॉन व्हॅली, बे एरियातील आपल्या फ्लैटमध्ये बसला होता. शुक्रवार संध्याकाळ होती आणि एक निराश वीकएंड समोर उभा ठाकला होता. साथीला केवळ एकटेपणा होता. अंधारात बसून सितु गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रम डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीत होता.
सितु गेले कित्येक महिने आभासी जगाचे मॉडेल बनवीत होता. सितुने विकसित केलेलं आभासी जगाचं मॉडेल त्याच्या अपेक्षेनुसार अगदी झकास उतरलं होतं. त्यात एका व्यक्तीला लॉगइन करण्याची सोय होती आणि मग एकदा का त्या आभासी जगात त्या व्यक्तीने प्रवेश केला की त्याला त्या जगातील विविध अनुभवांना सामोरे जावे लागत असे. आणि त्या विविध अनुभवांना व्यक्ती कशी सामोरे जाते त्यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावपैलूचे सर्व कंगोरे हे मॉडेल एका विश्लेषणरुपात मांडत असे. हे मॉडेल सितुने आज एका मोठ्या कंपनीसमोर सादर केले होते आणि जर ह्या कंपनीने त्याची निवड केली, तर सितुला त्या कंपनीतर्फे मिलियन डॉलर स्वरूपातील ऑफर मिळणार होती. सितुचा आत्मविश्वास जोरदार होता. आणि ही ऑफर मिळाल्यावर पुढे काय काय करायचे ह्याची मनोरथे उभारण्यास त्याने सुरुवात सुद्धा केली होती.
परंतु  आजची बैठक अगदी त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळी झाली होती. आज आलेल्या त्या कंपनीच्या मंडळींच्या अपेक्षा अगदी वेगळ्या होत्या. सुरुवातीला ज्याच्याशी बोलणी झाली होती आणि ज्याने अगदी उत्साहवर्धक चित्र सितुपुढे उभारलं  होतं तो उच्चपदस्थ माणूस कंपनी सोडून गेला होता आणि मग नवीन मंडळींच्या प्राधान्यक्रमात हे प्रोजेक्ट बसत नव्हतं.
पुढील आठवडाभर सितु अगदी निराश होऊन बसला होता. ह्या प्रोजेक्टच्या खुळापायी त्याने आपली चांगली नोकरी सोडली होती आणि गेले ६ महिने ह्या प्रोजेक्टवर काम केले होते. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. आपण ह्यात इतकं गुरफटून गेलो की दुसरा एखादा पर्याय समोर ठेवायचा आपल्याला सुचलंच नाही आणि आपल्याकडून ही मोठी चुक झाली हे त्याला कळून चुकलं होतं.
पुढच्या आठवड्यातील शनिवारची सकाळ उजाडली. एव्हाना सितु सावरला होता. आपलं हे मॉडेल इंटरनेटच्या अफाट जगात विकायला काढायचा त्याने निर्णय घेतला होता आणि त्याचबरोबर एखाद्या नोकरीसाठी अर्ज करण्याचा निर्णयसुद्धा! सकाळी आठच्या सुमारास त्याने आपल्या मॉडेलची जाहिरात टाकली आणि आपला बायोडाटामध्ये काही फेरफार करण्याच्या कामात तो गढून गेला. साधारणतः दोन तासात बायोडाटा बऱ्यापैकी आटोक्यात आला. त्याने हळूच एक नजर मॉडेलच्या जाहिरातीला काही प्रतिसाद मिळतोय का  ह्याकडे टाकली. असेच काही फुटकळ प्रतिसाद आणि तशाच स्वरूपाच्या टिपण्या होत्या. ह्याचसाठी आपण इंटरनेटचा मार्ग पत्करीत नव्हतो हे त्याला जाणवलं. पण आता त्याचा जास्त विचार न करण्याचे त्याने ठरवलं. बायोडाटा मात्र झकास बनला होता. दुपारच्या जेवणाआधी त्याने तो वेगवेगळ्या साईटवर अपलोड केलासुद्धा!
दुपारचे कामचलाऊ जेवण आटपून तो टीव्हीवरील चॅनेल्स धुंडाळीत बसला होता. त्यात कशी काय डुलकी लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही. त्याची ही डुलकी फोनच्या रिंगने उडाली. नोकरीसाठी पहिला फोन होता तो! सितुने घड्याळाकडे पाहिले.  दुपारचे तीन  वाजले होते. "गिव्ह मी कपल ऑफ मिनिट्स, एण्ड आय विल बी बॅक!" पूर्ण अमेरिकन स्वरात सितु उत्तरला! तोंडावर खळबळून पाणी मारून सितु दोन मिनिटात परतला. त्यानंतर पुढील जवळजवळ सहा तास सितुचा फोन व्यग्रच होता. आपण सात की आठ मुलाखती दिल्या हे ही त्याला आठवत नव्हतं. पण आपल्याकडे १५० K आणि १३० K च्या दोन ऑफर्स आहेत हे मात्र त्याला नक्की आठवत होते. १३० K च्या ऑफरमधील कामाचे स्वरूप त्याला अगदी आवडलं होतं पण त्याचवेळी त्याला दुसऱ्या ऑफरमधील अधिकचे २०K खुणावत होते.
आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि सितु आजच्या दिवसातील घडामोडीवर खुश होता. त्याने एक मस्तपैकी पिझ्झाची ऑर्डर दिली. वीस मिनिटात पिझ्झावाला  दारावर येऊन धडकला सुद्धा! भरपूर चीझयुक्त पिझ्झाचा पहिला बाईट तोंडात विरघळत असतानाच वाचा बंद करून ठेवलेला फोन थरथरला! आजच्या दिवसात अजून अधिक फोन घेण्याची सितुची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे थरथरणाऱ्या फोनकडे त्याने दुर्लक्ष केले. पुढील दोन मिनिटात फोन  पुन्हा एकदा थरथरला! चीझयुक्त पिझ्झाचा आस्वाद घेण्यात मग्न झालेल्या सितुने त्याकडे लक्ष दिले नाही. दहा मिनिटात त्याचा पिझ्झास्वाद कार्यक्रम आटोपला आणि सर्व काही आवराआवर करून तो निवांतपणे सोफ्यावर बसला. आता एखादा मस्त चित्रपट केबलवर ऑर्डर करून पाहायचा त्याचा बेत होता. अचानक त्याला ते दोन फोन कॉल्स आठवले. त्याने सहजच गंमत म्हणून त्या नंबरवर फोन करण्याचं ठरवलं. "२०० K मागून पाहूयात" पिझ्झाने तृप्त झालेले मन त्याला सांगत होते. दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला. उच्चारावरून एखाद्या उच्चभ्रू अमेरिकन माणसाने फोन उचलला असावा अशी अटकळ सितुने बांधली. समोरच्या माणसाने मायकल म्हणून आपली ओळख करून दिली. आणि हा कॉल आपण सितुच्या मॉडेलच्या चौकशीसाठी करीत आहोत असे सांगितले. "अरेच्या आपण तर ह्या मॉडेलविषयी विसरूनच गेलो होतो!" सितुच्या मनात विचार आला. "ह्या चर्चेस वेळ लागेल आणि हवे असेल तर मी उद्या सकाळी फोन करीन" असे मायकल म्हणाला. आज सर्व काही मनासारखे होत असताना ही संधीसुद्धा का गमवावी असा सितुने विचार केला. "नाही नाही, आताच आपण बोलूयात! " सितु उत्तरला. "पण हे बोलणे फोनवर होण्यासारखे नाही!" मायकलच्या स्वरात काहीसा निग्रह होता. "मी इथल्या सेंट रेजीस हॉटेलात उतरलो आहे, तुला घेण्यासाठी मी कॅब पाठवतो!" मायकल म्हणाला. सितुच्या मनात थोडी शंका निर्माण झाली. 'अनोळखी माणसाला आपला पत्ता द्यायचा, त्याने पाठविलेल्या कॅबमध्ये बसायचे' त्याने मायकलच्या ह्या प्रस्तावाला नकार दिला आणि स्वतः तिथे येण्याचे सुचविले. मायकलने बहुदा त्याच्या मनातील शंका ओळखल्या असाव्यात आणि म्हणून त्याने काही न बोलता "मी वाट पाहतो" असे सांगून फोन ठेवला. इतक्या झकास हॉटेलात जायचे म्हणजे चांगली तयारी करून जायला हवे असे सितुने ठरविले आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी ठीकठाक तयारी करून सितु बोलाविलेल्या कॅबमध्ये बसला. अशा आलिशान हॉटेलला नेऊ शकेल अशी गाडी आपल्याकडे असली पाहिजे असे स्वप्नरंजन कॅबमध्ये करीत असताना कॅब कधी हॉटेलला पोहोचली हे त्याचे त्यालाच कळलं नाही. स्वागतकक्षात मायकलने निरोप ठेवलाच होता. त्यामुळे त्याला तात्काळ पंचविसाव्या मजल्यावरील मायकलच्या आलिशान सूटकडे नेण्यासाठी एक सेवक पुढे धावला. ह्या हॉटेलचे वैभव डोळ्यांनी साठवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना उद्वाहक पंचविसाव्या मजल्यावर पोहोचला देखील!
मायकल स्वागतासाठी पुढे आला. त्याचे व्यक्तिमत्व अगदी आकर्षक होते. श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावरून प्रकट होत होती. त्या आलिशान सूटच्या एका बाजूला एक भव्य बाल्कनी होती आणि तिथून सन फ्रान्सिस्को शहराचा नयनरम्य नजारा दिसत होता. त्या दिशेने एक छोटेखानी बार होता आणि मायकलने सितुला तिथेच आसनासाठी निमंत्रित केले. विविध उंची मद्याची तिथे कमतरता नव्हती! परंतु सितुला त्याचा काहीच उपयोग नव्हता. सितुने फळाचा रस स्वीकारला.
मायकल बोलू लागला. सितुच्या  मॉडेलने त्याला नक्कीच प्रभावित केले होते. परंतु त्याला त्याचे पुढचे रूप हवे होते.  ह्यामध्ये त्याला दोन व्यक्तीची माहिती स्वीकारण्याची तरतूद करून हवी होती आणि त्यांच्या स्वभावाचं विश्लेषण  करून मग ते एकमेकास अनुरूप आहेत की नाही हे ठरवता आले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. सितु अगदी खुश झाला होता, त्याच्याही मनात ही संकल्पना होतीच. "ह्या सुधारणेस किती वेळ लागेल ?" मायकल विचारीत होता. "किमान सहा महिने" सितु उद्गारला. आणि "त्यात माझे सहा महिने वाढव!" मायकल म्हणाला. "ते कशासाठी?" सितुने विचारलं. "मला  प्रत्यक्षातील दोन व्यक्तींवर ह्या मॉडेलचा वापर करून हवाय!" मायकल म्हणाला. सितुला अचानक १३० K आणि १५० K आठवले. "पण मला ह्यासाठी इतका वेळ देता येणार नाही! मला आजच दोन चांगल्या ऑफर्स आल्या आहेत!" "आणि जर आपण एका वर्षाचा करार करणार असू तर?" मायकलने विचारलं. "तर मग मी विचार करायला तयार आहे!" सितु म्हणाला. "तुझी अपेक्षा कितीची आहे?" मायकलने विचारलं. "एका वर्षासाठी - एक मिलियन डॉलर्स! - तिथल्या सप्ततारांकित वातावरणात एव्हाना रुळलेल्या सितुला मिलियन डॉलर्सपेक्षा कमी आकडा उद्गारणे म्हणजे मायकलचा अपमान होईल असे वाटलं आणि म्हणून त्याने हा आकडा सांगितला! "ठीक आहे, तुझ्या पुढील एका वर्षाच्या वेळेसाठी १ मिलियन डॉलर्स आणि जर त्या प्रयोगाचे भाकीत  यशस्वी होत राहिले  तर पुढच्या १०  वर्षासाठी प्रतीसाल १ मिलियन डॉलर्स!"मायकलच्या ह्या उद्गारावर सितुचे डोळे पांढरे व्हायचेच बाकी राहिले होते! "तू जर ह्या प्रस्तावास तयार असशील तर उद्या सकाळी दहा वाजता ये! मी कराराची कागदपत्रे तयार ठेवतो आणि करारावर सह्या झाल्याच्या क्षणी तुझा जॉईनिंग बोनस तुझ्या खात्यात जमा!" मायकल म्हणाला. "तो कितीसा?" न राहवून सितुने विचारलं. "१५० K" पक्का बिसिनेसमन असलेला मायकल उत्तरला.
पंचविसाव्या मजल्यावरून सितू उद्वाहकातून खाली उतरत होता. तिथून दिसणारे सन फ्रान्सिस्को शहर बऱ्याच प्रमाणात झोपी गेले होते. परंतु रस्त्यावरून मात्र मोटारींचे मिणमिणते दिवे दिसत होते. सितूचे मन मात्र त्या मॉडेलच्या सुधारणेच्या विचारात गुंगून गेले होते.


क्रमशः


(शीर्षकाविषयी बराच संभ्रम आहे सध्यातरी!)


Friday, March 21, 2014

आधुनिक नाती!


आजच्या लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील सुचित्रा कुलकर्णी ह्यांचा 'आपली मुलगी, आपली वैरीण ?' हा अतिशय सुंदर लेख वाचला. शीर्षक आधी काहीसं खटकलं तरी लेखातील विचार मात्र खूप आवडले. त्या लेखातील काही मुद्दे आणि त्या अनुषंगाने माझे विचार असे -
हल्ली मुली, (अगदी चांगल्या घरातील सुद्धा) लहान वयात प्रेमात पडण्याचे प्रमाण वाढलं आहे, जवळजवळ अमेरिकेला गाठण्याइतकं! आता चांगलं घर ह्या संकल्पनेचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझ्या मतानुसार चांगलं घर म्हणजे ज्यात आई- वडिलांसोबत आजी- आजोबा, काका- काकी, भावंडांचा गोतावळा असतो ते गोकुळ! मुलांच्या विविध वयोगटातील विविध भावनिक गरजा असतात. एकटे आई वडील त्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यावेळी हे बाकीचे नातेवाईक चित्रामध्ये येतात. परंतु ज्यावेळी काळाच्या गरजेनुसार हे गोकुळ आणि त्यातील बालगोपाल विखुरले जातात त्यावेळी त्यांच्या अनेक भावनिक गरजा अपूर्ण राहतात. ही मंडळी जरी समाजव्याख्येप्रमाणे म्हटल्या जाणाऱ्या चांगल्या घरातून आली असली तरी त्यांना चांगल्या घरातील त्या पोषक वातावरणास मात्र मुकावे लागलेले असते.
ह्यातील एक मुख्य गरज म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची गरज, स्वतःला कोणीतरी खास वाटून देण्याची गरज. आई वडील ह्या बाबतीत कठीण स्थितीत असतात. एक तर वेळ कमी असतो आणि त्यात ही जी खास वाटून घेण्याची गरज असते ती लहान वयापेक्षा वेगळी असते आणि बिचाऱ्या पालकांना ह्या बदलत्या गरजेला समजून घेऊन त्यानुसार आपल्या अपत्याबरोबर असलेले आपले नाते बदलायची मेहनत घ्यायला एकतर वेळ नसतो किंवा हे बदलते नाते समजून घ्यायची क्षमता कमी पडते. मग ही गरज पूर्ण करायला आजूबाजूच्या मित्रमंडळीकडे पाहिले जाते आणि मग त्यातल्याच एखाद्याविषयी प्रेमभावना निर्माण झाली आहे असे वाटू शकते.
स्वतःकडे लक्ष वेधून घेणे ही केवळ वयात येणाऱ्या मुलांचीच गरज नव्हे तर ती प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची गरज आहे. आणि ही गरज पूर्वीसुद्धा होती. पण पूर्वीच्या जमान्यातील स्त्रियांनी ह्या भावनेचे त्याग ह्या भावनेत रुपांतर केले. आपण कुटुंबातील सर्वांची काळजी घेवूयात म्हणजे आपल्या ह्या जन्माचं चीज होईल असा विचार करून त्यांनी समाधान मिळविले आणि त्यामुळे कुटुंबसंस्था टिकली. अशा कुटुंबातील पुरुषांचे काय? बहुतेक उदाहरणात त्यांनी आपली लक्ष वेधून घ्यायची गरज भागविण्यासाठी मित्रमंडळीचा आधार घेतला.
ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रेम करणे म्हणजे अगदी चुकीचे आणि जमवून केलेला विवाह चांगला असं होईल असेही सांगता येत नाही. विवाह हे एकप्रकारचे व्रत आहे. आयुष्यभर निभावायला लागणारं! लग्नाचे समाजमान्य वय विशी - तिशीतील. पतीपत्नीच्या अनुरुपतेचा आयुष्यभराचा आलेख काढण्याचा प्रयत्न केला तर? एक जोडपं आयुष्याच्या प्रत्येक कालखंडात  एकमेकाला अनुरूप असेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीत वयानुसार बदल होत जातात. मध्येच पत्नी प्राजक्ता म्हणाली की वयाच्या पस्तीशीनंतर आपले अनुवांशिक गुण उफाळून येतात. व्यक्तीची समाजात मिसळण्याची गरज वाढू लागते आणि बऱ्याच वेळा ही गरज आपण लहानपणी ज्या समाजात , संस्कृतीत वाढलो त्या समाजाशी, संस्कृतीशी निगडीत असते. मला बऱ्यापैकी हे विधान पटले. बहुदा तिने माझ्या उदाहरणावरून हे विधान केले असावे आणि म्हणून ते मला पटले असावे! आणि इथे आंतरजातीय, धर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना कठीण परिस्थितीचा मुकाबला करावा लागू शकतो. इथे एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण बदलत्या वयानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, आपल्या जीवनसाथीच्या स्वभावानुसार स्वतःला किती बदलू शकतो? पूर्वीच्या काळात पुरुषांना स्वतःचे व्यक्तिमत्व कायम ठेवण्याची मुभा एकत्र कुटुंबपद्धतीने दिली होती. कारण स्त्रिया आपला स्वभाव, वागणे आपल्या पतीनुसार बदलत असत. आता तसे नाहीये, आधुनिक स्त्रियांना तसे जमणार नाही त्यामुळे पुरुषांना हा मानसिक बदल करावा लागेल.  त्याच वेळी स्त्रियांनी देखील पुरुषांचा ह्या बाबतीतला इतिहास पाहता त्यांना थोडी संधी देणे, त्यांच्यावर संस्कार (!) घडवून आणणे आवश्यक आहे!
लेखातील अजून विचार करण्याजोगा मुद्दा! आपल्याकडे हल्ली लहान वयात प्रेम करण्याची अक्कल आली असली तरी आर्थिकदृष्ट्या मात्र पालकांवर असलेली अवलंबिता! ह्या बाबतीत लेखिकेने अमेरिकेचे उदाहरण दिलेय, अमेरिकत मुलं लवकर प्रेम करतात पण त्यावेळची जी स्थिती असेल त्याच स्थितीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे राहतात. नक्कीच धडपडतात, पण वेगळी राहतात. मला असं वाटतं की आपण अपत्य आणि पालक ह्या दोन्ही घटकाच्या बाबतीत स्थित्यंतराच्या कालावधीतून जात आहोत. हल्लीचे किती पालक आपल्या मुलांना असे आर्थिकदृष्ट्या धडपडत असताना एकटे राहून देतील? त्याचवेळी मुले जरी कळत नकळत प्रेमात पडली असली तरी त्यांनी आतापर्यंत कधी असे एकटे राहणे अनुभवले नसणार! पण आता ही जी मुलांच्या भूमिकेत असलेली पिढी ज्यावेळी पालक बनेल त्यावेळी मात्र बहुदा ती त्यांच्या अपत्यांना वेगळे राहू देईल.
बदलांचे बघा कसं असतं एकदा का हा बंद पेटारा उघडला की मग त्यातून काय काय बाहेर येईल ते फक्त अचंबित होऊन पाहत राहायचं!
लेखाच्या शेवटच्या भागातील एक काहीसा मजेदार मुद्दा! १९८० च्या आधी मुलगे असणाऱ्यांना भाव होता मग सुनांना सांभाळणे कठीण आहे हे समजल्यावर पुढील दोन दशके मुलीवाल्यांचा भाव वधारला! त्यानंतर काहीसा गंभीर मुद्दा; हल्ली मुली लग्नाआधी आणि नंतरही बरेच प्रश्न निर्माण करत असल्याने ही सर्व समीकरणे बदलली गेली आहेत.
लेखाचा शेवट काहीसा हतबल होऊन केल्यासारखा वाटतो. हल्ली ज्याप्रमाणे कर्तृत्ववान मुलींची संख्या वाढली आहे त्याचप्रमाणे मुल्यविरहीत शिक्षणाचा रुबाब आणि मिळविणाऱ्या पैशाचा तोरा मिळविणाऱ्या मुलींनी पालकांचा भ्रमनिरास करायला सुरुवात केली आहे. आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने मुली स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष तर वाढवून घेताहेत पण पालकांचे जगणेही मुश्किल करीत आहेत. तर अशा आई बाबांनी करायचं तरी काय?
मला ह्याच एकच उत्तर वाटत! पालकांनी आपल्या लग्न झालेल्या किंवा लग्नाचे वय झालेल्या मुलींविषयीच्या भावनिक गुंतवणुकीची सीमारेषा स्वतः आखून घ्यावी. ह्या सीमारेषेपर्यंत मदत करावी, त्यापलीकडे परिस्थिती गेल्यास स्पष्ट नकार द्यावा! हा जर नकार देण्याचे धारिष्ट्य जर तुमच्याकडे नसेल तर मात्र समोर असेल ती परिस्थिती मुकाट्याने स्वीकारावी! शेवटी व्यावसायिक जग असो वा वैयक्तिक, तुमच्याकडे स्पष्ट विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची क्षमता हवी. ती जर नसेल तर दैवाला दोष देत रडगाणे गायला तयार राहावं!
जरा नंतर सुचलेला मुद्दा! हा लेख केवळ मुलींच्याच बाजूने का लिहिला गेला बरे? जशा मुली लहान वयात प्रेमात पडतात त्याचवेळी त्यांच्या प्रेमात पडणारी बऱ्याच वेळा मुलेसुद्धा लहानच असतात? म्हणून मला शीर्षक जरा खटकलं!
एका सुंदर लेखाबद्दल सुचित्राताईचे अभिनंदन!

Sunday, March 16, 2014

होळी, वसईचे केशकर्तनालय




आठवडाभर बोरीवली आणि मग साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वसई केल्याने सोहम आणि माझ्यावर बऱ्याच वेळा  होळीला केस कापण्याची वेळ येते. होळीवर तशी दोन तीन केशकर्तनालये आहेत, आम्ही लहानपणी जगदीश ह्यांच्या केशकर्तनालयात जायचो. परंतु आता छगन आणि विकास  दोघां भावांच्या केशकर्तनालयात जातो. त्यांचे दुकान होळीत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. केशकर्तनालयात गेल्या गेल्या आपला नंबर लागला असे कधी होत नाही. त्यामुळे आपण प्रथम एक नजर आधीपासून येवून बसलेल्या लोकांकडे टाकतो आणि आपला क्रमांक कधी लागेल ह्याचा विचार करू लागतो. पूर्वी लोक आपला नंबर आधी लागावा म्हणून "मला लवकर मुंबईला जायचे आहे" असे बोलत. मग त्या माणसाच्या वजनानुसार आणि वाट पाहत असलेल्या माणसांच्या प्रतिक्रियेनुसार त्याचा नंबर आधी लावला जात असे. हल्ली असे काही होत नाही. बाजूलाच पेपर पडलेले असतात. अशा दुकानात शक्यतो लोकसत्ता, टाईम्स (केवळ मुख्य पेपरविषयी बोलतोय मी!) वगैरे गंभीर पेपर ठेवण्याची पद्धत नसावी. त्यामुळे अशा ठिकाणचे पेपर हलक्या फुलक्या बातम्यांनी भरलेले असतात. पूर्वी वाचलेल्या  बातम्या जशा  की  'शेजाऱ्याशी झालेल्या बाचाबाचीत दारुड्याला बेदम मारहाण!, 'अमुक अमुक गावात दोन डोक्याचा साप सापडला" अशा बातम्या वाचून माझी करमणूक व्हायची. केस कापताना, डोक्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या (किंवा शिरता शिरत नसलेल्या) गंभीर बातम्या केसांबरोबर बाहेर जायला नकोत हा ह्यामागचा सद्हेतू असावा. हे पेपर साधारणतः पाच मिनिटात चाळून झाले की मग नजर टीव्हीवर जाते. प्रत्येकवेळी जनतेचे टीकाटिपण्णी करण्यासाठी एक आवडतं व्यक्तिमत्व असतं. हल्ली ते केजरीवाल हे आहे. त्यामुळे कालसुद्धा माझ्यासारख्या आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असलेल्या सर्वांनी केजरीवालवर आपली मते प्रदर्शित केली.  ह्यात एक कॉंग्रेसचे समर्थक होते. त्यांनी काँग्रेसची चांगली कामे लोकांना कशी दिसत नाहीत आणि हा सर्व प्रसारमाध्यमाचा खेळ आहे असे विधान केले. ते शांत झाल्यावर मी जागा झालो. बेपत्ता मलेशियन विमानाद्वारे भारतीय शहरांवर ९/११ स्वरूपाचा हल्ला करण्याची योजना असू शकते असे वक्तव्य करणाऱ्या माजी अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्याचा मी खरपूस समाचार घेतला. त्याच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने प्रसारमाध्यमासमोर असे विधान करताना थोडेतरी तारतम्य बाळगायला हवे होते असा सात्विक संतापही  मी व्यक्त केला. तो बिचारा जर तिथे हजर असता तर पुरेपूर पश्चातापदग्ध झाला असता ह्यात तिळमात्र शंका नाही. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या संघातर्फे T२० विश्वचषक स्पर्धेत निवड झालेल्या आणि मुळचा वसईकर असलेल्या स्वप्नील पाटीलचे काका तिथे दुकानात आले. त्यामुळे चर्चेचा ओघ त्याच्याकडे वळला. स्वप्नीलला ह्या विश्वचषक स्पर्धेसाठी आम्हां सर्व वसईकरांतर्फे हार्दिक शुभेच्छा!


ह्या दुकानाच्या मागच्या खिडकीतून गावठी कोंबड्या विकायला बसलेल्या विक्रेत्या स्त्रिया दिसतात. त्यांच्याशी बरेचजण येऊन योग्य भावासाठी घासाघीस करीत असतात. एकदा का सौदा झाला की मग दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसतात.


ह्या दोन्ही भावांचे संभाषणकौशल्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक माणसाचा व्यवसाय आणि आवडीचे मुद्दे ते व्यवस्थित लक्षात ठेवून असतात. सोहम आल्यावर त्यांनी बाकी उपस्थित लोकांना हा बोरीवलीवरून केस कापायला इथे  येतो अशी ओळख करून दिली. त्यामुळे सोहम तर खुश झालाच आणि उपस्थित ग्राहकांचा ह्या बंधूविषयी आदर दुणावला. क्रिस्ती भावंडांची एक जोडी दुकानात बसली होती. 'मामारा कवा जायचा?" असा त्यातील मोठ्याला प्रश्न केल्यावर त्याची कळी खुलली आणि तो खुशीत आला. त्या दोघांना बसवून त्यांचे वडील बाजार आटपायला गेले होते. ह्या मोठ्याने आपले केस जास्त कापू नयेत ह्यावरून छगनकाकाशी बरीच चर्चा केली. परंतु तुझ्या वडिलांनी जसे सांगितले त्याचप्रमाणे मी केस कापणार असे सांगून छगनकाकाने त्याला फेटाळून लावले. मलाही साधारणतः कामाचा तणाव कसा आहे? ऑफिस मालाडलाच आहे का असे प्रश्न ते विचारतात. बाकी एकदा त्यांनी जेपी मोर्गन जोरात आहे असे वगैरे सांगितल्यावर मी सावरून बसलो. जेमी डायमनशी भेटलास वगैरे का, तिमाही अहवालात कसे आकडे आहेत असे पुढे प्रश्न ते मला विचारतील अशी उगाचच भीती त्यावेळी मला वाटली होती!


रविवारची होळीवरील गर्दी वाढत होती. त्यात एकाने आपली कार रस्त्याच्या कडेला लावून तो बाजूला निघून गेला. तितक्यात एक अर्नाळा बस आली त्यामुळे तिथे थोडा छोटा ट्रैफिक जैम झाला! दुकानातील सर्वांनी त्या कारवाल्यावर इथेच्छ वाकसुख घेतले.


वेळ बरा चालला होता. आणि मग माझा नंबर लागला. मागून पुढून लावलेल्या आरशांनी माझ्या विरळ झालेल्या केसांचे अगदी भेदक चित्र डोळ्यासमोर ठेवले. आणि त्यामुळे निमुटपणे मी उरलेसुरले केस कापून घेण्यास सज्ज झालो. "केस कसे कापायचे? बारीक की मिडीयम?" ह्या छगनच्या प्रश्नाला मी केविलवाणे हास्य केले. तो ही समजला आणि केस कापण्याचा उपचार पार पाडण्यास त्याने सुरुवात केली!



परीक्षामय - भाग २!


दिनांक १६ मार्च २०१४

दहावी बारावीच्या परीक्षाही सध्या सुरु आहेत. आम्ही ८८ - ९० साली दहावी बारावी दिली तेव्हा मामला सोपा होता. दहावीच्या परीक्षेचे सर्व पेपर रविवारची सुट्टी वगळता सलग असायचे. त्यामुळे शैथिल्य वगैरे यायचं नाही. सर्वांना एकाच प्रश्नपत्रिकेचा सामना करायला लागायचा. गेल्या काही वर्षात दहावी बारावीच्या परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झालेला दिसतोय.
दहावीच्या परीक्षेतील गुणवत्ता यादी पद्धत आपण काढून टाकली. का तर? शालेय मुलांना इतक्या वयात गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याचे दडपण येऊ नये. ह्या मुद्द्यावर माझं वेगळं मत आहे. आपण अजूनही गुणवत्ता यादी ठेवावयास हवी होती. असो, एस. एस. सी. बोर्डाचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा मुद्दा नाही म्हटलं तरी गौण बनत चालला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत वाढलेले टक्क्यांचे प्रमाण!  हे प्रमाण इतके वाढले ही पूर्वी ९० टक्क्यांचे जे अप्रूप होते ते आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे.
आता वळूयात अभियांत्रिकी पदवीसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरीक्षांविषयी.  हल्ली नक्की कोणती पद्धत अवलंबली जाते ह्याविषयी माझा बराच गोंधळ आहे. माझ्या सध्याच्या ज्ञानानुसार प्रथम बारावीतील भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयातील गुण आणि त्याचबरोबर IIT च्या MAINS ह्या परीक्षेतील गुण लक्षात घेतले जातील. आता हा सध्या नवीन आलेला बदल असावा. बारावीची परीक्षा मार्च महिन्यात तर IIT MAINS एप्रिल - मे महिन्यात! इतका काळ सतत परीक्षेचे दडपण मुलांना घ्यायला लावणे हे कितपत योग्य आहे? आणि सर्वच मुलांनी हे दडपण इतका काळ घेण्याची गरज आहे काय?
ज्यांना खरोखर IIT ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी IIT प्रथम MAINS मध्ये चांगले गुण मिळवावेत आणि IIT ADVANCED ला पात्र व्हावे. आता साध्या अभियांत्रिकी पदवीच्या परीक्षेला सुद्धा IIT ची मिती समाविष्ट केल्याने आता मामला क्लिष्ट बनला आहे. त्यामुळे असे काही संयुक्त (Integrated) शिकवणी वर्ग निघाले आहेत जे मुलांची बारावी आणि IIT ह्या दोघांसाठी एकदम तयारी करून घेतात. आता त्यांचे लक्ष असते ते IIT ADVANCED साठी मुलांची तयारी करून घेणे. परंतु ह्यात प्रवेश घेणारे काहीजण केवळ बारावी आणि IIT MAINS ह्या पहिल्या भागासाठीच उत्सुक असतात. परंतु त्यांना  नाहक संपूर्ण क्लिष्ट भागाचे दडपण घ्यावे लागते. आणि नक्कीच  IIT ADVANCED चे नुसते दडपण घेणे हे सुद्धा येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे! आता हा इतका सर्व अभ्यासक्रम  शिकवायचा असल्याने हे शिकवणी वर्ग मुलांची दहावी परीक्षा संपली की सुरु होतात. माझ्या माहितीतला एक शिकवणी वर्ग एकदा अकरावी सुरु झाली की अगदी रविवारीची सुद्धा सुट्टी देत नाही. सतत परीक्षा सुरूच राहतात. मुलांच्या उपस्थितीचा रिपोर्ट तत्काळ पालकांना जातो. सर्व मुलांना हे कितपत झेपते हा महत्वाचा मुद्दा! बाकी ह्यांचा दर्जा तसा चांगला! शिकवायला सर्व IIT मधून  पदवी घेतलेला शिक्षकवर्ग! आणि शंकानिरसन करण्यासाठी नियमितपणे खास सत्र!
ह्यात खटकण्याजोग्या काही गोष्टी! एखाद्या शिक्षकाची शिकविण्याची पद्धत जर मुलांना आवडली नाही तर लगेच ते त्याविषयी तक्रार करून शिक्षकवर्ग बदलून घेऊ शकतात. शिक्षकांना किती पॅकेज मिळते हे मुलांना माहित असते. एकंदरीत आपण एक ग्राहक आणि शिक्षकवर्ग हा आपल्याला सेवा पुरविणारा असा अयोग्य समज मुलांनी करून घेतलेला दिसतो.
अपरिहार्यपणे २५ वर्षापूर्वीची बारावीतील मुलांची (आमची) मानसिकता आणि हल्लीच्या मुलांची मानसिकता ह्याची तुलना मनातल्या मनात होते. त्यावेळी बारावीत सुद्धा शिक्षकांविषयी बराच आदर असायचा. कॉलेजात, शिकवणी वर्गात चांगलं इंग्लिश बोललं जायचं. WHATSAPP च्या भाषेने सर्वत्र धुमाकूळ घातला नव्हता. आता मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. मला यश मिळाले नाही तर ते केवळ मी मेहनत केली नाही म्हणून असाच समज बऱ्यापैकी पसरलेला आहे.
एकंदरीत आपल्याकडील हा फरक माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अजून काही वर्षे तेजीत राहणार ह्या गृहितकावर आधारित आहे असे माझे मत! परंतु ह्या क्षेत्रातील बाहेरचे चित्र काहीसे बदलते आहे! हे क्षेत्र पूर्वीइतके आकर्षक राहिले नाही. आणि बरेच अभियंते ह्या क्षेत्रात गेल्याने स्थापत्य, विद्युत आणि मेकॅनिकल (यांत्रिकी?) ह्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये दर्जेदार अभियंत्यांची चणचण भासत आहे! आपण बारावीनंतर ह्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी वेगळा प्रवेशमार्ग आखू शकतो का?
कोणत्याही यशस्वी कंपनीत बहुदा 'यशासाठी लागणाऱ्या गोष्टीची योग्य प्रकारे व्याख्या करून त्यासाठीचा मार्ग आखून ठेवला जातो'. ह्या तत्वाला 'Keep the things simple' असे म्हटले जाते. आपल्याकडे असा कोणी शिक्षणतज्ञ  आहे काय जो शिक्षणक्षेत्रात ह्या तत्वाची अंमलबजावणी करू शकेल?
होळीच्या सर्वांना शुभेच्छा!

Monday, March 10, 2014

परीक्षामय - भाग १!


दिनांक - २०१४ मार्च 

नाही, नाही! शीर्षक वाचून आमच्याकडे कोणी दहावीच्या परीक्षेला बसले आहे असा समज बिलकुल करून घेवू नका. सोहमची सीबीएसई बोर्डाची इयत्ता चौथीची परीक्षा सुरु होतेय आज! आणि आम्ही सर्वजण त्याच्या तयारीत गुंतलो आहोत. विषयाची यादी ह्याप्रमाणे
मुख्य विषय
इंग्लिश
हिंदी
गणित
विज्ञान
सामाजिक शास्त्र
संगणक

छोटे विषय
मराठी
जनरल नॉलेज
मुल्य शिक्षण (Value Education)


एकूण वर्ष तीन सत्रात विभागलेले असते. ह्या तीन सत्रात सुद्धा प्रत्येकी दोन परीक्षा असतात. पहिली संगणकाधारित  - वस्तुनिष्ठ प्रश्नांची! आणि दुसरी मुख्य परीक्षा! एक सत्र कसेबसे तीन महिन्याचे, त्यात ह्या दोन परीक्षा! मुख्य परीक्षेच्या आधी एक आठवडा त्याची सराव परीक्षा आणि प्रोजेक्ट! एकंदरीत, दर महिन्यात परीक्षेचा हाहाःकार! एक मात्र बरे, नवीन पिढीतील सोहम आणि त्याची मित्रमंडळी ह्या परीक्षा प्रकाराविषयी जास्त काही दडपण घेत नाहीत. सोहमला परीक्षेचे दडपण येत नाही ह्याचे पूर्वी मला दडपण येत असे ! पण हल्ली मला कळून चुकले की मनुष्यजात उत्क्रांतीचे नवनवीन टप्पे गाठत आहे त्यामुळे बहुदा  हल्लीच्या युगात वावरण्यासाठी योग्य अशी दडपण न घेणारी पिढी आता निर्माण झाली असावी!

आता आपण सोहमच्या अभ्यासक्रमाकडे पाहूयात! एक लक्षात ठेवा हा तिसऱ्या सत्रातील दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे! म्हणजे एकंदरीत वर्षाचा एक सष्टांश (१/६) भाग!

इंग्लिश -
मुख्य पुस्तक
The Wonderful Tea Kettle
The Violet
A Man's Club
A Wolf's Cub

ह्यातील वानगीदाखल एक प्रश्नोत्तर!
Describe the badger's performance.
Answer - The tinker dressed up in colorful clothes, with a big fan in his hand, came out on the platform. He made a polite bow and set the wonderful tea-kettle on the stage. At the wave of his fan, the kettle ran around on four legs, half badger and half kettle, clanking its lid and wagging its tail. How the children shouted! Next it turned into a badger, swelled out its body and beat a tune on it like a drum. It danced on the tight rope and walked the slack rope, holding a fan or an umbrella in its paw, stood on its head, and finally at a flourish of its master's fan became a cold brass tea-kettle again.

व्याकरण - १
Verb Like Adjective
The Merchant of Seri
Homophones and Irregular Verbs
Uses of Simple Present Tense
auxiliary will

व्याकरण - २
Prepositions
conjunctions
Proverbs
Comprehension C
Writing Skills - Formal Letter, Messages

हिंदी (शुद्धलेखन चूकभूल द्यावी घ्यावी!)
चतुर चरवाहा
डरना कभी न जाना
कौन जीता
बुद्धिमान बगुला
बाँकी बाँकी धुप
पिटारे में कुछ और!

अधिक व्याकरण

गणित
काळ (Time)
Money

विज्ञान
Force, Work and Energy
Air, Water and Weather
Our Environment

एक उदाहरण
Write a note on radioactive pollution
Radiation is an invisible pollutant that can be highly dangerous. Some radiation reaches the earth from the sun and outer space. Larger amounts come from radioactive materials like fallout from nuclear weapons and waste material from nuclear power plants and other electronic devices. Exposure to large amounts of radiation causes cancer in human.

सामाजिक शास्त्र
Soils of India
Our Water Resources
Our Mineral Resources
They showed us the way!

आता मध्यप्रदेशात एखाद्या ठिकाणी बॉक्साईट (चूकभूल द्यावी घ्यावी) मिळत असेल ते लक्षात ठेवायचे आणि पुन्हा ते ठिकाण नकाशात नक्की कोठे आहे हे ही दाखवायचं हे कठीण काम ह्या बिचाऱ्या मुलांना करावं लागतं!

संगणक
 Kid Pix - ह्या सॉफ्टवेअर संबंधित प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरे!
आता हे सॉफ्टवेअर  ही मुले आरामात वापरू शकतात . परंतु त्यावर प्रश्नोत्तरांचा पेपर आवश्यक का आहे हे मला कोणी समजवून सांगेल काय? जसे की टास्कबार वर कोणते आयकॉन आहेत हे मुलांनी का बरे लक्षात ठेवावे?


छोटे विषय
मराठी
पावसाची मजा
फळांची मेजवानी
आवडता खेळ
मराठी वर्णमाला
माझे घर

जनरल नॉलेज (GK)
एका पानाचे १८ धडे ह्यात प्रत्येक राज्याच्या नृत्य, इंग्लिश साहित्यातील इतिहास, ते भगतसिंग ह्या चित्रपटात त्यांची भूमिका कोणी (अजय देवगण) ह्याने साकारली. असे प्रत्येकी ७ -८ प्रश्न!

मुल्य शिक्षण (Value Education)
प्रत्येक मूल्य उदाहरणासकट समजवून देणारा एक धडा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे!

सारांश

कोठेतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकतेय! मागची पिढी मराठी माध्यमातून वरील उल्लेखलेल्या अभ्यासक्रमापेक्षा बराच कमी अभ्यास करून बाहेर पडली आणि बऱ्यापैकी टिकली. ह्या पिढीला प्रश्न उदभवतो तो अगदी उच्चपदाच्या नजीक आल्यावर ती शेवटची पायरी ओलांडायला! परंतु त्यावर हा असा उपाय नक्कीच नाही! सतत परीक्षांचा मारा ह्या वयातील मुलांवर करणे किती योग्य आहे? आमचे तत्व आहे की शिकवणी लावायची नाही त्यामुळे अजूनही आम्ही धडपडत त्याचा अभ्यास घेतो! त्याची काही उत्तरे त्याला बरे वाटावे म्हणून आम्हीही पाठ करतो!
सत्य एकच आहे! आपण व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीची निर्मिती करण्यात सपशेल अयशस्वी ठरलो आहोत. त्यावर उपाय म्हणून आपण दहावीपर्यंत मुलांना सर्व शाखांसाठी तयार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पालकांना एकच सल्ला - स्वतःला त्या मुलांच्या जागी ठेवून पहा! एखादा विषय, त्यातील प्रश्नोत्तरे स्वतःला पाठ करता येतील कि नाही हे स्वतःला विचारून पहा. उत्तर जर नाही असेल तर मुलावर त्याची सक्ती करू नका! शेवटी तो तुमचा मुलगा / मुलगी आहे! परवाच सराव परीक्षेला सोहमला नकाशावरील प्रश्न - खनिजे आढळणाऱ्या ठिकाणाचे नकाशातील स्थान दाखवा हा ५ गुणांचा प्रश्न होता. गुगलच्या युगात हे पाठ करण्याची गरज नाही हे आमचे मत त्यामुळे त्याला ह्या प्रश्नांचे दडपण न घेण्याचा सल्ला आम्ही दिला!

असो परीक्षा आज सुरु झालीयं! आम्हांला आणि सोहमसोबत त्याच्या सर्व मित्रमंडळी, त्यांच्या पालकांना तुमच्या शुभेच्छांची गरज आहे!

Sunday, March 9, 2014

आपले विश्व आणि आयुष्यातील टप्पे!




स्वतःला केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येकजण आपले विश्व स्थापन करीत असतो. ह्या विश्वात समाविष्ट असतात आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि जीवनरहाटीच्यानिमित्ताने संपर्कात येणारी लोकं! ह्यातील प्रत्येकाशी आपले लौकिकार्थाने लिखित / अलिखित असे नाते असते. आता ह्या नात्याकडे बघण्याचा दोन्ही बाजूंचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक दिवसागणिक ही नाती बदलत जातात, दररोज बदलणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे!

आपल्या आयुष्याचे ढोबळमानाने असे काही टप्पे मानता येतात. माझ्या बाबतीत शालेय जीवनाचा टप्पा, १२ वी पर्यंत रुपारेलचा टप्पा, सरदार पटेल महाविद्यालयात अभियांत्रिकीतील पदवी आणि त्यानंतरच्या शिक्षणाचा एक टप्पा, त्यानंतर स्थापत्य क्षेत्रातील काहीसा अस्थिर काळ, मग माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशानंतरचा उमेदवारीचा काळ, पहिली परदेशवारी, लग्न, २००७ पर्यंतचा सततचा परदेशप्रवास आणि त्यानंतर काहीसा मध्यमवयात प्रवेश केल्यानंतरचे भारतातील वास्तव्य!

ह्या प्रत्येक टप्प्यात आपण अनेक वेगवेगळी लोक, ठिकाणे पाहतो. ह्यातील काहीजणांशी, ठिकाणांशी  आपलं दृढ नातं बनतं. काळ पुढे सरकतो, माणूस शिक्षणानिमित्त , नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतर करतो. एका नव्या विश्वात आपले एक स्वतःचे नवीन विश्व निर्माण करतो. त्यात गुंगून जातो. आधीचे विश्व काहीशा प्रमाणात विसरतो. व्यक्तीने आयुष्यभर अनुभवलेली ही अनंत विश्वे, नाती  त्याच्या मनाच्या कोपर्यात कोठेतरी अडगळीत पडलेली असतात.

कधीतरी कोणत्यातरी क्षुल्लक निम्मिताने ह्या अनंत विश्वातील एखादे विश्व उफाळून बाहेर येते. मनाला अस्वस्थ करून सोडते. ह्या विश्वाला आपण परत आणून शकत नाही ही जाणीव आपल्याला बोचत राहते, मग आपण शोधतो त्या विश्वातील आपल्याला, तो तरी आपणास नक्की सापडेल असा आपणास विश्वास असतो. पण हा शोध घेता घेता आपणास जाणवते की त्या विश्वातील स्वतःला आपण हरवून बसलो आहोत!  मागच्या विश्वातील एखादी व्यक्ती अचानक समोर येते आणि आपणास नक्की कसे वागावे हे कळत नाही. आपण अगदी एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे त्या व्यक्तीशी वागतो! आपण त्या व्यक्तीशी अनोळखी असतो की आपल्या स्वतःशी हा न उलगडणारा प्रश्न! आपण आपल्याशीच त्या वागण्याचे समर्थन द्यायचं प्रयत्न करतो परंतु त्या व्यक्तीचं काय? त्या व्यक्तीला स्पष्टीकरण कोण आणि केव्हा देणार!

काल रात्री असेच बसलो असता ह्याच संदर्भातील काही सुंदर गाणी ऐकायला मिळाली! पहिलं १९६६ च्या चित्रपटातील दिलीपकुमार आणि वहिदावर स्वतंत्रपणे चित्रित केले गेलेलं 'दिल दिया दर्द लिया' ह्या चित्रपटातील 
'फिर तेरी कहानी याद आयी, फिर तेरा फसाना याद आया'
'फिर आज हमारी आँखों में, एक ख्वाब पुराना याद आया!'

त्यानंतर १९८१ च्या उमराव जान मधील रेखावर चित्रित केले गेलेलं 
'ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दायर हैं
'हद हैं निगाह तक जहाँ गुबार ही गुबार हैं!

आणि मग पुढे 'तमाम उम्र का हिसाब माँगती है जिंदगी!"

अशीच गाणी ऐकल्यावर १९८५ साली १० मार्चला भारताने जिंकलेला बेन्सन आणि हेजेस कप आठवतो. भारताचा एक खरोखर गुणवान संघ त्या स्पर्धेत उतरला होता आणि भारत पूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला!
असो रविवार संध्याकाळी आलेल्या आठवणी सोमवारी सकाळी कागदावर (ब्लॉगवर) उतरविल्यावर भूतकाळात रमलेले मन वर्तमानकाळात परत आणायला हवे!
बाकी ह्या ब्लॉगमधील काही भाग माझ्याच जुन्या ब्लॉगमधून उचलला आहे! :)


Thursday, March 6, 2014

Empathy


अमेरिकतील एक हॉस्पिटल. कॅमेरा तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर क्षणभर स्थिरावतो. कोणाला आपण प्रथमच बाप होणार असल्याची बातमी कळली असते, तर कोणाला स्वतःला कॅन्सर झाल्याचे नुकतेच समजले असते, कोणाला उपचाराचा खर्च कसा फेडायचा ह्याची चिंता भेडसावत असते, कोणी एक छोटुकली आपल्या आजारी बापाला भेटायला जात असते आणि ही बहुदा वडिलांबरोबरची तिची शेवटची भेट आहे हे तिच्यासोबत चालणाऱ्या तिच्या आईला माहीत असते. कंपनीतल्या एका प्रेसेंटेशनच्या वेळी ही चित्रफीत दाखविण्यात आली.
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या भावनांतून जात असतो. अशा ठिकाणी Empathy म्हणजेच परभावनांची अनुभूती ही महत्वाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. पुढील भाग मला बहुदा पूर्णपणे समजला नाही. तरीपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
परभावनांच्या अनुभूतीचे तीन टप्पे मानू शकतो.
१) मेंदू - आपण आपल्या मेंदूत दुसरा कोणत्या मानसिक परिस्थितीतून जात आहे ह्याविषयी  विचार करू शकतो.
२) हृदय - दुसऱ्याच्या त्या स्थितीतील भावना आपल्या हृदयात सुद्धा निर्माण होतात.
३) हस्त - त्या दुसऱ्या व्यक्तीची त्या स्थितीत असताना आपल्याकडून कोणत्या कृतीची अपेक्षा आहे ह्याचा अंदाज बांधून आपण तशी कृती करू शकतो.
आता हे बोलायला, लिहायला सोपे आहे पण प्रत्यक्ष आचरणात आणायला फार कठीण! कारण आपण सुद्धा एका वेगळ्या मानसिक स्थितीतून जात असतो.
पुढे अजून एक चित्रफीत दाखवली गेली. एक वक्ता बोलत होता. सकाळी न्हाणीघराकडे जाताना त्याची नजर पत्नीकडे गेली. ती एकटीच खिन्न होऊन आरशात पाहत बसली होती. वक्ता म्हणाला की मी तिला पाहिलेच नाही असे भासवू शकलो असतो. आणि माझ्या कामकाजात स्वतःला गुंगवू शकलो असतो, परंतु ती काहीतरी
उदासीतून जात आहे हे मी जाणले, तिच्याजवळ गेलो. तिच्याशी दोन शब्द बोललो. आणि मग माझ्या कामाला लागलो. त्या क्षणी कोणीतरी तिला उदासीतून बाहेर आणण्याची गरज होती आणि ती मी जाणून त्या क्षणाच्या तिच्या गरजेला मी उभा राहिलो.
मग आमचे मोठे बॉस उभे राहिले आणि त्यांनी ह्या क्षणाला 'क्लोजिंग डोअर मोमेंट' असे संबोधिले. बऱ्याच वेळा असे होते की आपण धावत धावत उद्वाहक पकडण्यासाठी येत असतो आणि त्याच वेळी स्वयंचलित दार बंद होत असते. आत उभा असणारा माणूस आपल्या हाताने हे बंद होणारे दार थांबवू शकतो आणि आपल्याला प्रवेश देवू शकतो.
प्रत्यक्ष जीवनात आपल्या जीवनसाथीच्या बाबतीत असे अनेक क्षण येतात ज्यावेळी त्यांना आपली गरज असते. प्रश्न असा येतो की आपण हे क्षण ओळखू शकतो का आणि ओळखू शकलो तरी त्यावेळी आवश्यक कृती करू करतो का? हे असे गरजेचे क्षण स्त्रियांच्या बाबतीतच येत नाहीत तर ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा येवू शकतात. ह्या क्षणाची गरज प्रत्येकाची अशी खास (UNIQUE) असते. आणि ती ओळखण्याची सर्वात जास्त संधी जीवनसाथीला असते.
नंतर मग चर्चा कार्यालयीन जगाकडे वळाली. आपल्या टीममधील लोकांकडून काम करून घेताना त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार किती व्यवस्थापक करतात वगैरे वगैरे! त्यांचे आपण वेळच्या वेळी कौतुक करतो का? प्रत्येकाच्या कौतुकाच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात आणि त्या आपण कशा ओळखल्या पाहिजेत!
मोठ्या बॉसने अजून एक लक्षात राहण्यासारखे विधान केले. परभावनांच्या अनुभूतीचे जे तीन टप्पे असतात, त्यात आपण सद्यस्थितीत एका कोणत्या स्थितीत असतो. त्या स्थितीतून पुढच्या स्थितीत जाणे हे जरा कठीण काम आहे. त्यासाठी खूप प्रयत्नांची गरज असते.
एक सुंदर सत्र! ह्याचा शेवट एका यु ट्यूब वरील एका चांगल्या क्लिपने केला.
http://www.youtube.com/watch?v=Cl7qgaO36O8
ह्यातील नातवंडे परभावनांच्या अनुभूतीचा कोणता टप्पा दर्शवितात बरे?










थरारचा शेवट बऱ्याच वाचकांना आवडला नसावा. नेहमीप्रमाणे अचानक शेवट केला वगैरे वगैरे! बहुदा मध्येच ह्या सत्राला उपस्थित  राहिल्यामुळे माझे लक्ष विचलित झाले असावे! तरीपण आधीच्या कथांपेक्षा थोडी प्रगती!

Wednesday, March 5, 2014

थरार अंतिम भाग..


बालीतील त्या छोटेखानी हॉटेलातील गोळीबार आणि चारजणांचा खून लपविणे सुप्रीम आणि कंपनीला सुद्धा कठीण गेले. ह्या घटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर (कु) प्रसिद्धी मिळाली. आणि मग मात्र पावले अगदी वेगळ्या दिशेने पडायला लागली. सोमणला वरिष्ठ मंडळीकडून फोन आला आणि ह्या सर्व कटकारस्थानाला मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश देण्यात आले.
सायलीच्या कंपनीत आज मोठी धामधूम होती. तिच्या कंपनीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होते आणि ह्या उद्घाटनाच्या समारंभाच्या संचालनाची जबाबदारी सायलीकडे सोपविण्यात आली होती. सर्व तयारीवर शेवटचा हात फिरविण्यात सायली अगदी व्यस्त होती.
छोटेखानी हॉटेलात जो एक मारेकरी मारला गेला त्याच्या फोनवरून भारतातील काही संपर्क क्रमांक मिळाले होते आणि त्यावर सोमण आणि मंडळीचे संशोधन चालू होते. अजूनही नंदन आणि भोसलेकाकांना उघडपणे बाहेर फिरू देणे धोक्याचे होते.
समारंभाच्या उद्घाटनासाठी मान्यवरांचे कंपनीच्या आवारात आगमन झाले आणि सायलीने पुन्हा एकदा सर्व हॉलवर नजर फिरवली. खिडकीतून गेटमधून प्रवेश करणारी मान्यवर आणि मंडळी दिसत  होती. इतक्यात सायलीची नजर कोपऱ्यावरील चहाच्या टपरीकडे गेली. मामांची परिचित आकृती तिथे पाहून तिच्या काळजात धस्स झाले.
पुढील दहा पंधरा मिनिटं कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मान्यवरांचे स्वागत करीत होते. इतक्यात सायलीला तिच्या भ्रमणध्वनीवर एक लघुसंदेश आला. "सायली, क्षमस्व, तुझे प्रेसेंटेशन बदलले गेले आहे, परंतु एकंदरीत प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हे आवश्यक आहे! - तुझा मामा!" सायलीला एक क्षणभर तिथून पळून जावेसे वाटले. परंतु तिने स्वतःला लगेचच सावरले. मामाला मदत करणे किती आवश्यक आहे हे तिने स्वतःलाच बजावले.
समारंभ सुरु झाला. कंपनीच्या अध्यक्षांचे भाषण झाले आणि तो क्षण उगवला. सायली व्यासपीठावर आली आणि तिने मान्यवरांचे स्वागतपर भाषण सुरु केले. "मान्यवरांच्या कार्यांची महती शब्दात सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी  ते महतकठीण काम आहे! त्यामुळे मी या चलतचित्रफितीच्या आधारे हे करू इच्छिते! समोरून तिच्या सहायकाने सर्व काही ठीकठाक असल्याची खुण केली! आणि आपल्या हृदयाच्या वाढत्या धकधकीला नियंत्रित करीत सायलीने इंटर बटन दाबले.
प्रेसेंटेशन सुरु झाले. परंतु बराच अंधार दिसत होता. हळूहळू त्या चित्रफितीतील व्यक्ती दिसू लागल्या, मान्यवरांच्या चेहऱ्यावर अचानक जबरदस्त तणाव दिसू लागला. आणि ज्या क्षणी मान्यवरांची आकृती स्पष्ट दिसली त्या क्षणी सर्व उपस्थितांमध्ये खळबळ माजली. एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या नियोजनाची ही चर्चा होती. आणि मान्यवर आणि अनेक मंडळी त्यात सहभागी होती. प्रथम कुजबुजीचे नंतर गडबडीत रुपांतर होत असतानाच मान्यवर आपल्या आसनावरून उठले आणि बाहेरजायच्या मार्गाकडे त्यांनी जोरात धाव घेतली. परंतु राजवाडे आणि गटाचे नियोजन अगदी व्यवस्थित होते. बाहेर जाण्याचे सर्व मार्ग रोखून धरण्यात आले होते. आणि जिथून पळून जाण्याचा मान्यवरांनी प्रयत्न केला तिथे दस्तुरखुद्द सोमण उभा होता.
एका मोठ्या कुटकारस्थानाचा छडा लावण्यात राजवाडे, भोसले, नंदन, सोमण आणि हो सायलीने यश मिळविले होते. सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक चालले होते. ह्या कौतुकाचा धुरळा खाली बसल्यावर राजवाड्यांनी सर्वांना आपल्या गावी आग्रहाचे निमंत्रण दिले.
मार्चमधील कोकणातील रम्य संध्याकाळ होती. राजवाड्यांच्या जुन्या घरी सर्वजण एकत्र जमणार होते. राजवाडे, भोसले आणि सोमण तर हजर होते परंतु सायली आणि नंदनचा पत्ता नव्हता. "ह्यांना फोन लावूयात" असे भोसले म्हणणार तितक्यात दोघेजण नंदनच्या बाईकवरून येताना दिसले. "या वेळेत आलात", भोसलेकाकांनी त्यांचे स्वागत केले. ते दोघे स्थिरस्थावर होणार इतक्यात राजवाडे म्हणाले, :ह्या आनंदाच्या प्रसंगी मला अजून एक गोड घोषणा करायची आहे!" "नाही, नाही! प्रथम मला एक घोषणा करायची आहे" नंदनने अचानक उठून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. "खबरदार! हे माझे घर आहे! आणि इथे माझाच हुकुम चालणार!" राजवाडे लटक्या आवेशात म्हणाले. नंदन मात्र खरोखर घाबरला आणि शांतपणे जागी बसला. सायलीच्या चेहऱ्यावर मात्र नंदनविषयी निराशेचे भाव उमटले. "उ उ हुम" राजवाड्यांनी वातावरणातील उत्सुकता अजून वाढविण्यात यश मिळविले. "मी माझी भाची सायली आणि माझे परममित्र भोसले ह्यांचा पुतण्या नंदन ह्यांच्या वाडनिश्चयाची इथे घोषणा करीत आहे!" आणि ते आपल्या स्थानावर आसन्न झाले. फक्त भोसलेच आश्चर्यचकित दिसत होते. त्यांना काय बोलावे ते कळेना! "आता, तुमची घोषणा येवुद्यात!" राजवाड्यांनी नंदनकडे बघून मिश्किलपणे इशारा केला. एव्हाना नंदन आणि सायली ह्यांनी पूर्ण शरणागती पत्करली. "मामा, तुम्हांला कळले कसे!" सायलीने शेवटचा प्रयत्न केला. "मी गुप्तहेर काय उगाच नाही!" मामा उत्तरले. "बाली ते भारत फक्त चांडाळचौकडीचेच फोन चालू नव्हते!" हसतहसत मामा उद्गारले! इतका वेळ गप्प बसलेले भोसलेकाका एव्हाना सावरले होते. "बाकी नंदन, हनिमूनसाठी मात्र जोश्यातर्फे बालीलाच जायचे हो!" आपणसुद्धा विनोदबुद्धीत कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. बैठकीच्या खोलीत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते!
रात्री जेवून झोपायला जवळजवळ मध्यरात्र झाली. बऱ्याच दिवसांनी शांतचित्ताने राजवाडे झोपी गेले.…
. . .
.
. .
.


दोनच्या सुमारास त्यांच्या फोनची घंटा किणकिणली… "राजवाडे बोलतोय!" एक दोन मिनिटे फोनवरून बोलून राजवाड्यांनी फोन ठेवला. पाचच मिनिटात आपली जीवनसाथी बाईक बाहेर काढून राजवाडे निघाले होते एका नवीन रहस्यभेदासाठी!


Tuesday, March 4, 2014

थरार भाग १२..


राजवाड्यांना भारतात परत जाऊन देण्याचा निर्णय तिघांनी मिळून घेतला होता. परंतु आता भोसले काकांना राजवाड्यांची फार आठवण येऊ लागली होती. नंदन अगदी धडाडीचा आणि हिंमतवान असला तरी अनुभवी माणसाची गरज भोसलेकाकांना वाटत होती. नायलॉनच्या दोरीवाल्याचा पिच्छा ताबडतोब करावा असे भोसलेकाकांचे म्हणणे होते परंतु नंदन भुकेने कासावीस झाला होता. त्यामुळे नाईलाजाने भोसलेकाकांना सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर जेवायला जावे लागले.
वर्माच्या खुनानंतर गटातील सर्वजण अगदी हतबल झाले होते. वर्मा आणि मुलकानीच्या विधवा पत्नींना आपली दुःखे बाजूला टाकून स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी पावले उचलणे भाग पडले होते. रहस्य उघड झाल्याने सुप्रीमने ही पावलं उचलली असावी ह्या काही संशय नव्हता. सहा कुटुंबातील बाराजण आधी बेटावर आले होते आणि आता दहाजण उरले होते. उघडपणे पोलिसात गेलं तर सुप्रीम काय करेल ह्याची कोणालाच खात्री नव्हती. सुप्रीम आहे कोण हे ही कोणालाच माहित नव्हते. त्यामुळे जीवाच्या भीतीने सर्वजण भयभीत झाले होते. आपली नेहमीची राहण्याची ठिकाणे सुप्रीमला माहित असल्याची शक्यता ध्यानात घेऊन त्या सर्वांनी किनाऱ्यालगतचे अगदी घरगुती असे साधे हॉटेल राहण्यासाठी निवडले होते. त्यात जीव मुठीत ठेवून हे सर्व रहात होते.
एकदा अन्न पोटात गेल्यावर नंदनचे डोके ताळ्यावर आले. "अरे, आपण त्या दोघांचा ताबडतोब पाठलाग करायला हवा होता! काका तुम्हीपण ना, मला थांबवायचं ना?" नंदनच्या ह्या बोलण्यावर काय बोलण्यात अर्थ नाही हे काका चांगलेच जाणून होते. धावतपळत ते दोघे परत जोशीच्या सहलीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. जोशीने रात्री सर्वांसाठी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. नंदन आणि भोसलेकाका मोठ्या आवेशाने त्यात सहभागी झाले खरे पण त्यांची नजर त्या दोघांना शोधण्यात गुंग होती. परंतु काही केल्या ते दोघे दिसेनात तेव्हा जोशीला कोपऱ्यात घेऊन नंदनने विचारले, "सहलीतील सर्वजण इथे आले आहेत ना?" एकंदरीत सर्व पर्यटकांच्या गटाकडे लक्ष देत जोशी म्हणाला, "दोघे तिघे दिसत नाहीत!" आता त्या दोघांचा त्यात नक्की समावेश होता. "आम्हांला सर्व पर्यटकांचे भारतातील पत्ते मिळतील का?" ह्या भोसालेकाकांच्या प्रश्नावर जोशीने उघड नाराजी व्यक्त केली. आपल्या व्यवसायातील प्रतिमेला तडा जाईल असे ह्या दोघांना काही करू देण्याची जोशीला अजिबात इच्छा नव्हती. परंतु नंदनने जवळजवळ दडपशाही करत त्याच्याजवळून सर्वांच्या पत्त्यांचे पुस्तक मिळविले. त्यानंतर मात्र लगेचच काही मिनिटात हजारो मैलावर भारतात शांत झोपलेल्या राजवाड्यांना फोन आला आणि उत्तर भारतातील दोन पत्त्यांचा छडा लावण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
आता हे दोघे कोठे गायब झाले ह्याचा नंदन आणि भोसले विचार करीत असतानाच भोसलेना एक फोन आला आणि त्यांची मुद्रा अगदी गंभीर झाली. वर्माच्या खुनाची बातमी त्यांना मिळाली होती. आता ही अगदी आणीबाणीची परिस्थिती होती ह्यावर दोघांचे एकमत झाले. मुलकानीच्या बायकोचा पत्ता लावणे आवश्यक होते. कारण आता ह्या सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक होते. नशिबाने भोसलेकडे तिचा नंबर होता. परंतु तिला लावलेला फोन एका रिंगमध्येच कट झाला. आणि त्यानंतर तो फोन बंद केला गेला. ताबडतोब जोशीच्या ढापलेल्या फोनवरून भोसलेनी सोमणला फोन लावला आणि मुलकानीच्या पत्नीचा बालीतील नक्की ठावठिकाणा काढून द्यायची विनंती केली. गाढ झोपेतून उठविल्या गेलेल्या सोमणने केवळ मैत्रीखातर ही विनंती मान्य केली. पाचच मिनिटात सोमणचा तिचा ठावठिकाणा सांगणारा फोन आल्यावर ह्याच्या संपर्कांना दाद द्यायला हवी अशी मनातल्या मनात ह्या दोघांनी कबुली दिली.
एक पळवलेली बाईक दामटवत दोघे समुद्रकिनाऱ्याजवळील त्या छोटेखानी घरगुती हॉटेलजवळ पोहोचले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. एकदम त्या हॉटेलात घुसण्याआधी काही मिनिटे बाहेरून निरीक्षण करावे असे दोघांचेही मत पडले. एक दोन मिनिटे ते बाहेरून त्या घरात काही हालचाल दिसते आहे का हे पाहत असताना अचानक कोपऱ्यातील खोलीतून त्यांना बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आले. नंदनने अगदी दचकून काकांकडे पाहिले. आपल्याकडे बंदूक आहे ह्याची काकांनी नजरेनेच ग्वाही देताच ते दोघे मागचा पुढचा विचार न करता त्या हॉटेलकडे जोरात धावले. खिडकी फोडून त्यांनी त्या खोलीत प्रवेश केला तर समोर चार पुरुषांचे मृतदेह पडले होते आणि बाजूच्या खोलीतून स्त्रियांचे ओरडणे ऐकू येत होते. सर्वत्र अंधार असला तरी ह्या दोघांची आवाजावरून लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता जबरदस्त होती.
नंदनने दरवाजा उघडून 'ऑल क्लियर' चा इशारा काकांना दिला. काका बाहेर पडताच त्यांना दोन खोल्यातील मार्गिकेत ठेवलेल्या मेजाच्या मागे काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी अंदाजाने त्या आवाज करणाऱ्या लक्ष्याचा एका क्षणात वेध घेतला. एक जोरदार किंचाळी ऐकू आली. आणि त्याच क्षणी एक काळी आकृती खिडकीतून उडी मारून पळत जाताना त्यांना दिसली. आता एकेक क्षण महत्वाचा होता. तत्काळ नंदनने अंधारातच विजेची स्विच शोधला. काकांनी वेध घेतलेला माणूस काही वेळापूर्वी जोशीच्या हॉटेलात पाहिलेल्या दोघातील एक होता आणि तो अगदी शेवटच्या घटका मोजत होता. दुसरा पळाला होता. काकांना किंवा नंदनला शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसाकडून कशी माहिती काढून घ्यायची ह्याचा अनुभव नव्हता. तरीही नंदनने "तुम्हांला कोणी पाठविले आहे" असा दरडावून प्रश्न त्याला केला. "राज्याचे गृह….…' त्याच्या नशिबाने उत्तर द्यायला लागलेल्या त्या  जखमी माणसाने अर्ध्या उत्तरातच दम सोडला होता.
दुसऱ्या खोलीत सहा विधवा स्त्रियांना तोंड देण्याची आणि त्याचवेळी त्यांना आपण मदत करण्यासाठी आलो आहोत हे पटवून देण्याची जबाबदारी ह्या दोघांवर होती. आणि त्या पळालेल्या एकाची चिंता न करणे त्यांना परवडणारे नव्हते!



Sunday, March 2, 2014

थरार भाग ११..


बाली पोलिसांनी मुख्य दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना फक्त मुलकानीचा निष्प्राण देह सापडला. त्यांना मिळालेल्या खबरीनुसार तिथे मुलकानीचे मारेकरी सुद्धा असायला हवे होते. लगेचच त्यांनी सर्व घराला सीलबंद केले. आणि हाताचे ठसे घेणाऱ्या तज्ञ लोकांना पाचारण केले.
ज्या प्रकारे नंदनने आपल्याला त्या घराच्या मागच्या दलदलीच्या भागातून पळायला लावले त्यावर भोसले जबरदस्त नाखूष होते. आपण पोलिस आणि त्यात आपण काहीही चुकीचे केले नसताना आपण पळायचं कशाला हा त्यांचा प्रश्न तसा रास्तच होता. परंतु नंदनच्या मनात वेगवेगळ्या कुशंका निर्माण झाल्या होत्या. बाहेरील पोलिसांची गाडी खऱ्या पोलिसांची नसली तर हा मुख्य संशय होता.
नंदनने अजून एका सुरक्षित घराची तरतूद करून ठेवलेलीच होती. तिथे शिरल्यावर त्याने दिल्लीतील केंद्रीय गुप्तहेर खात्यातील आपल्या माणसाशी, सोमणशी संपर्क साधला. तिथली बातमी चिंताजनक होती. ह्या एकंदरीत चौकशीला थोड्या धीम्या गतीने घेण्याचे वरून आदेश आले होते. सोमणही संतापला होता परंतु त्याचा नाईलाज होता. नंदन आता बराच चिंताग्रस्त झाला होता. बालीत एक दोन दिवस लपून काढले की तोवर भारतीय पोलिसांची आणि इंटरपोलची मदत पोहोचेल हा त्याचा अंदाज चुकीचा ठरू लागला होता. बोलणं संपता संपता सोमण म्हणाला, "अगदीच गरज पडली तर माझा मित्र जोशी त्याची पर्यटन यात्रा घेऊन बालीत आला आहे, त्याला संपर्क कर!"
"काका, तुम्हांला कितपत जेवण बनविता येते?"  साधा कांदाही चिरू न शकणाऱ्या नंदनने भोसलेकाकांना प्रश्न केला. "अरे, बल्लवाचार्य सुद्धा माझ्यापुढे हार मानेल!" भोसले काकांनी दर्पोक्ती केली. "उगाच मोठ्या फुशारक्या मारू नका! ५० जणांना एका वेळी जेवण बनविण्याची तयारी ठेवा! जिवंत राहायचं असेल तर हाच एक मार्ग आहे" नंदनचा प्लान D  तयार होता.
मुलकानीच्या खुनाची बातमी बाहेर पडल्यावर गटातील सर्व सदस्य अगदी हवालदिल झाले होते. त्याच्या बायकोच्या शोकाला तर पारावार उरला नाही. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात सुद्धा आता बऱ्याच अडचणी होत्या. बनावट कागदपत्र तिवारीच्या नावाने बनविली गेली होती. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून हे सारे ह्यातून कसे बाहेर पडायचं ह्याचाच विचार करीत होते. सुप्रीमला संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. मुलकानीच्या घरची बैठक आटपून सर्व मंडळी आपल्या घरी परतू लागली होती. वर्माची पत्नी मुलकानीच्या पत्नीसोबत  मुक्कामाला राहिली होती. वर्माने  अगदी चिंताग्रस्त मुद्रेतच आपल्या घराचे दार उघडले. आणि दिवा लावला. सोफ्यासमोरील टीपॉयवरील फुलदाणी टीपॉयच्या मध्यावरून एका कोपऱ्यात आल्याचे पाहून तो थरारला. पटकन मागे वळून घराबाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न मानेभोवती आवळल्या गेलेल्या नायलॉनच्या दोरीने फोल ठरविला. ह्या नाट्यातील बालीतील दुसरा बळी गेला होता.
जोशीच्या सहलीतील पर्यटक रात्रीच्या जेवणाच्या नावाने खडी फोडत होते. "जाहिरात करताना मोठमोठी आश्वासने देतात, अगदी पंचतारांकित हॉटेलसारखे जेवण असेल वगैरे वगैरे! आणि आता समोर करपलेली भाजी! त्यांच्या संतापाला तोंड देता देता जोशीच्या नाकी नऊ आले होते. त्यांना सामोरे जाऊन मुद्पाकखान्यात शिरताना त्याला प्रथम भांड्यांचे करपलेल्या भाजीने खराब झालेले गज घासण्याचा प्रयत्न करणारा नंदन दिसला. आपला सगळा राग त्याने नंदनवर काढला. जोशीची मुद्रा पाहून भोसलेंनी बाहेर न येणेच पसंत केले.
जोशी थोडा शांत झाल्यावर त्याला भोसले आणि नंदनने समजावले. उद्यापासून कामगिरीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
भोसलेकाकांची करपलेली भाजी खाण्याची अजिबात इच्छा नसलेल्या नंदनने मागच्या दरवाज्याने बाहेर जाऊन जेवण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. "आयुष्यात कधी मागच्या दाराने बाहेर पडलो नाही आणि आता तू किती दिवस हे माझ्या नशिबी आणणार आहेस?" भोसलेकाका कुरकुरले. मागच्या दारापाशी जाताना नंदनला आवाज आला. नंदन आणि भोसलेकाका कोपऱ्यात जाऊन लपले. जोशीच्या सहलीत आलेले दोन  तगडे जवान परत त्या बंगल्यात शिरत होते. "ह्यांना मागच्या दाराने शिरायची काय गरज?" असा प्रश्न नंदन विचारणार तितक्यात त्याचे लक्ष त्या दोघातील एकाच्या पैंटमधून लोंबकणाऱ्या नायलॉनच्या दोरीकडे गेले!


Saturday, March 1, 2014

थरार भाग १०..

तिवारीला आता आपल्या नशिबाला दोष द्यायची वेळ आली होती. आता रामलालचा कोठेच पत्ता नव्हता. पण त्याच्या बदली आलेले दोघेजण मार देण्याच्या बाबतीत अगदी तज्ञ होते. तिवारीचे अंग अगदी काळेनिळे पडले होते. आणि अशाच एका कमकुवत क्षणी त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली ह्या दोघांना दिली होती. ह्या एकंदर कारस्थानाची व्याप्ती पाहून नंदन आणि भोसलेकाका अगदी अवाक झाले होते. मुलकानीने  केलेल्या १२० कोटीच्या अफरातफरी मध्ये तो केवळ एक प्यादे होता. तो आणि त्याच्याचसारख्या पाच सहाजणांनी 'सुप्रीम' च्या सांगण्यावरून आणि मार्गदर्शनाखाली अशा संघटीत अफरातफरीच्या अनेक गोष्टी केल्या होत्या. 'तुमचे आम्ही पूर्ण संरक्षण करू, पूर्ण काळजी घेऊ' असे सुप्रीमने त्यांना सांगितले होते. परंतु मुलकानी अडकला आणि सर्वत्र बदनाम झाला तसे ह्या लोकांची बेचैनी वाढली होती. पैसा तर भरपूर होता पण मुलकानीपाठोपाठ अजून कोण अडकणार ह्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे जसजसे अजून पुरावे बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली तसतसे सर्वांनी 'सुप्रीम' ला देशाबाहेर एका सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याची गळ घातली होती. मुलकानीच्या कुटुंबियांना त्याची ह्या सर्व प्रकरणात झालेली बदनामी अजिबात पसंत नव्हती आणि त्यामुळे त्याने एखादे नवीन व्यक्तिमत्व / रूप धारण करावे अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. परंतु त्यासाठी सुप्रीमने अवलंबिलेला मार्ग पाहून त्यांचे धाबे दणाणलेले होते. हा सुप्रीम नक्की कोण हे ह्यातील कोणालाच माहित नव्हते. त्याने दिलेल्या आज्ञा पाळायच्या आणि लगेच बँकेत पैसा जमा झालेला पाहायचा ह्याचीच त्यांना सवय होती. बालीत येऊन रहायची सुप्रीमची आज्ञा / योजना सर्वांनाच पसंत होती असे नव्हे. परंतु आता नाईलाज होता.


तिवारी गायब होऊन तिसरा दिवस झाला होता आणि तिवारीच्या बायकोच्या सोबतीला दोन कुटुंबे येऊन राहिली होती. तिवारीच्या बायकोची राजवाडे थिअरी कोणालाच पटत नव्हती. इतक्यात त्यातील एकाला भारतातील संकेतस्थळावर एक बातमी दिसली. त्याने मोठ्या खुशीने ती सर्वांना दाखविली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गुप्तहेर राजवाडे जे मागील आठवड्यातील अपघातात मरण पावले असा सर्वांचा समज झाला होता ते जखमी अवस्थेत त्या दरीतल्या एका कुटुंबांच्या घरी पोहोचले होते. आणि त्या कुटुंबाने त्यांना स्थानिक पोलिसांपर्यंत सोपवले होते. नंदन आता चांगलाच सक्रिय झाल्याने राजवाडे लगेचच त्यांच्या घरी पोहोचले होते.


मुलकानीची माहिती ऐकून नंदनने लगेचच आपल्या वरिष्ठांना सर्व खबर दिली होती.  आणि केंद्रीय गुप्तहेरांचे पथक तातडीने बालीत बोलावले होते. हा आंतरराष्ट्रीय मामला असल्याने इंटरपोलला सुद्धा सहभागी करून घेण्यात आले होते.


थकलेभागले नंदन आणि भोसलेकाका बिछान्यावर पडल्या पडल्या झोपेच्या आधीन झाले होते. भोसलेकाकांची सकाळी उठण्याची सवय इथेही कायम राहिली होती. सकाळी पाचच्या सुमारास त्यांना जाग आली. मुलकानीच्या खोलीत एक नजर टाकायला म्हणून ते गेले आणि ते दृश्य पाहून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मुलकानी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची अगदी निष्ठूरपणे हत्या करण्यात आली होती. भोसले काका इतके अनुभवी पण ते ही हादरले होते. "नंदन, नंदन उठ लवकर!" "काय आहे काका! जरा झोपू द्या आता!" असे म्हणणाऱ्या नंदनला त्यांनी तत्काळ मुलकानीच्या खोलीत नेले. तिथले दृश्य पाहून नंदनही हादरला. पण लगेच त्याचा मेंदू सक्रिय झाला. पटकन त्याने भोसलेकाकांना खुण केली. दोघांनी मिळून सर्व घराची तपासणी केली. घर सुरक्षित आहे ह्याची खात्री करून घेतली. आपल्या फोनवरच्या बोलण्यातून कोणाला तरी सुगावा लागला हे त्या ही परिस्थितीत नंदनने जाणले. दोघेजण सुन्न होऊन बसले असतानाच बाहेर कसला तरी आवाज झाला. नंदनने खिडकीजवळ जाऊन पाहिले त्यांच्या घराला बाली पोलिसांच्या गाड्यांनी घेरले होते!